Climate Change, Heatwave And Viral Infection: जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून ताप, तीव्र डोकेदुखी आणि पोटाच्या समस्या जाणवत असतील, तर तुम्ही एकटे नाही आहात. सध्याच्या वातावरणानुसार अन्न आणि दूषित पाण्याद्वारे होणाऱ्या आजारांचा हा ‘पीक सीझन’ म्हणजेच उच्चांकाचा काळ आहे. हे केवळ तुमचे दुर्दैव नसून त्यामागे एक विशिष्ट वैज्ञानिक कारण आहे.

बॅक्टेरियासाठी पोषक वातावरण

प्रसिद्ध डॉ. सुरादीप चौधरी यांनी या परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. ते म्हणतात की, “उष्णता आणि आर्द्रता (ओलावा) यांचे मिश्रण बॅक्टेरिया आणि व्हायरससाठी प्रजनन केंद्र ठरते. हे हवामान केवळ आपल्याला अस्वस्थ करत नाही, तर रोगजनकांच्या वाढीसाठी पूरक ठरते. जेव्हा हे जंतू शरीरात शिरतात, तेव्हा तुमची पचनसंस्था एका युद्धभूमीसारखी होते आणि शरीर या संसर्गाशी लढू लागते.”

लक्षणे आणि धोके

सुरुवातीला मळमळणे, उलट्या, पोटात पेटके येणे, जुलाब आणि गॅस होणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे केवळ वेदनादायक नसून ती शरीराला कमकुवत करतात.

डिहायड्रेशन (पाणी कमी होणे): उलट्या आणि जुलाबावाटे शरीरातील पाणी वेगाने कमी होते.

ताप आणि डोकेदुखी: शरीरात संसर्ग झाल्यामुळे प्रतिकारशक्ती कार्यरत होते, त्यामुळे ताप येतो. मात्र, आधीच पाणी कमी झाल्यामुळे डोकेदुखी दीर्घकाळ टिकते आणि व्यक्ती पूर्णपणे गळून जाते.

कोणाला अधिक धोका?

  • लहान मुले, वृद्ध आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना या आजारांचा सर्वाधिक धोका असतो.
  • रस्त्यावरील उघड्यावरचे अन्न खाणारे लोक.
  • सतत प्रवास करणारे आणि अनिश्चित ठिकाणचे पाणी पिणारे.
  • ज्यांचे पोषण नीट झालेले नाही किंवा जे आधीच डिहायड्रेशनने त्रस्त आहेत.

बचावासाठी तज्ज्ञांची मार्गदर्शक तत्त्वे

१. पाण्याबाबत कडक नियम: केवळ उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच प्या. पाणी पिण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका.

२. बाहेरचे अन्न टाळा: घराबाहेरचे कच्चे किंवा उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा. नेहमी ताजे आणि गरम अन्न खाण्याला प्राधान्य द्या. कारण उष्णतेमुळे अन्नातील जंतू नष्ट होतात.

३. स्वच्छता पाळा: जेवणापूर्वी आणि प्रसाधनगृहाचा वापर केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुण्याची सवय लावा.

४. ओआरएसचा वापर: आजारी पडल्यास केवळ साधे पाणी न पिता ओआरएस (ORS) किंवा शहाळ्याचे पाणी प्या. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी टिकून राहते.

५. प्रोबायोटिक्स: आहारात दही किंवा ताकाचा समावेश करा. यामुळे आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि रिकव्हरी वेगाने होते.

दूषित अन्न आणि पाण्यामुळे होणारे हे आजार पूर्णपणे टाळता येण्यासारखे आहेत. सतर्क राहणे, स्वच्छ पाणी पिणे आणि हात धुणे हे साधे उपाय तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवू शकतात. लक्षात ठेवा, डिहायड्रेशनकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.