उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर फळे खायला हवीत. विविध प्रकारची फळे नियमित खाणे शरीरासाठी फायद्याचे ठरते. फळे चवीलाही छान असतात आणि पौष्टिकही असतात.अनेक फळांमध्ये महत्त्वाचे गुणधर्म असतात. असेच एक फळ म्हणजे डाळिंब. हे फळ खूपच चविष्ट आणि गोड आहे, जे अनेक आजारांवरही फायदेशीर आहे. डाळिंब हे सर्वांत आरोग्यदायी आणि पौष्टिक फळांपैकी एक आहे. पण, दररोज सकाळी ते खाणे योग्य आहे का? असे मानले जाते की, दररोज एक वाटी डाळिंब खाऊन दिवसाची सुरुवात केली पाहिजे. “ते अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व पोषक घटकांनी भरलेले फळ आहे. डाळिंब आतड्यांसाठीही एक वरदान आहे. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने ते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते आणि सर्दी व संसर्गापासूनही दूर ठेवते.
अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध असलेले डाळिंब त्वचेवरही जादू करते आणि ती चमकवते. “त्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने, ते आतड्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. डाळिंब शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्सनी भरलेले असून डाळिंब शरीराचे मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते. दरम्यान, याच संदर्भात दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट जनरल फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ डॉ. रंगा संतोष कुमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
डाळिंबाचे पॉलीफेनॉल शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात, जळजळ कमी करतात आणि पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. “डाळिंबाचा रस रक्तप्रवाह सुधारू शकतो आणि त्याच्या दाहकविरोधी गुणधर्मांमुळे धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतो,” असे न्यूट्रेसी लाइफस्टाईलच्या संस्थापक, एमबीबीएस व पोषणतज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील म्हणाल्या.
डॉ. कुमार यांच्या मते, “डाळिंब कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारून, रक्तदाब कमी करून आणि धमनीतील प्लेक जमा होण्यास प्रतिबंध करून हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात. तुमच्या आहारात जीवनसत्त्वे सी व के, पोटॅशियम आणि आहारातील फायबरसह आवश्यक पोषक घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे. “म्हणून तुम्ही सकाळी एक वाटी डाळिंब खाऊ शकता. त्यातील फायबरचे प्रमाण चांगले पचन होण्यास मदत करते, ज्यामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते”.
डाळिंबातील फायबर जळजळ कमी करून आणि पचनास मदत करून आतड्यांच्या आरोग्यास मदत करते. तसेच चांगली प्रतिकारशक्ती आणि दीर्घायुष्यासाठी संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहारावर भर दिला पाहिजे, असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले.