मुख दुर्गंधी किंवा श्वासाची दुर्गंधी रोखण्यासाठी काही छोटे उपाय करता येतात. त्यासाठी या मागची मूळ कारणे ओळखून ती दूर करता येतात. तोंडात जिवाणूंच्या वाढीमुळे दुर्गंध येतो. पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे, सतत खात राहणे, पोटाचे आरोग्य चांगले नसणे, दीर्घकाळ बद्धकोष्टतेचा त्रास, आप्लपित्ताचा तीव्र त्रास व झोपेत तोंड उघडे पडून त्याद्वारे श्वासोच्छ्वास होणे आदी कारणांमुळे ही दुर्गंधी निर्माण होते, असे तज्ज्ञ सांगतात. खरे तर याचे मूळ कारण शोधून ते घालवणे गरजेचे असते. तरीही तज्ज्ञांच्या मतानुसार हा दुर्गंध रोखण्यासाठी काही उपाय करता येतात. दिवसातून दोनदा ब्रशने दात घासणे. तसेच जीभ सकाळी साफ करण्याने तोंडातील अशुद्धी दूर होते. रात्री झोपतानाही हे नियमित केल्यास निद्रावस्थेत जाताना तोंड स्वच्छ राहते. त्यामुळे आपल्या पोटाचे आरोग्यही चांगले राहते. जेवल्यानंतर बडीशेप खाण्याने मुखशुद्धी होते. ती पाचक असते व सुगंधीतही असते. त्यामुळे चांगली लाळनिर्मिती होऊन तोंडाचा कोरडेपणा जातो. कोरडेपणाने येणारा दुर्गंध कमी होतो व बडिशेपेच्या सुगंधानेही तो निघून जातो. जेवणानंतर किंवा कोणताही आहार घेतल्यानंतर खळखळून चूळ भरल्यास तोंडातील अन्नकण निघून जातात व दुर्गंध दूर होतो. त्यामुळे दातांचे आरोग्यही चांगले राहते. सारखे खाण्यापेक्षा नियमित जेवण घ्यावे. सारखे खाल्ल्याने अन्नकण तोंडात राहतात. दरवेळी ब्रशने तोंड साफ करता येत नाही. योग्य प्रमाणात पाणी पिणे फार गरजेचे आहे. त्यामुळे मुखारोग्यही चांगले राहते.