सुहास जोशी आणि विश्वजीत पुजारी
“वाढत्या उन्हाळ्यात सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी स्थिती कामाच्या ठिकाणी असते. त्रास होत असला तरी काम करावेच लागते. आपण काम केले नाही तर घर कसे चालणार?” मुंबईच्या डबेवाल्यांची ही सामूहिक व्यथा आहे. आणि थोड्याफार फरकाने विविध प्रकारच्या डिलिव्हरी क्षेत्रातील कामगारांची हीच व्यथा आहे.
ऋतू कोणताही असो, कितीही समस्या असोत नेमक्या वेळी नेमक्या ठिकाणी जेवणाचा डबा पोहोचवण्यात प्रवीण (९९.९९९९% अचूकता) असणारे, जागतिक पातळीवरदेखील गौरविले गेलेले मुंबईचे डबेवाले सध्या बदलत्या वातावरणात वाढत्या उन्हाळ्याचा चटका सहन करत आहेत. मुंबई डबावाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके सांगतात की, मुंबईच्या पावसाळ्यात कधी कधी जनजीवन ठप्प होत असले तरी उन्हाळ्यात कामावर आम्हाला सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो.
डबेवाल्यांचा कामाचा कालावधी साधारण सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंतचा. नेमके याच कालावधीत मार्च ते मे दरम्यान पारा ३४ अंशाच्या वरखाली असतो. मुके सांगतात की, प्रत्येक डबावाला किमान ७०-८० किलो वजन उचलतो. वाढत्या गर्दीतून प्रवास केल्यावर रेल्वे स्थानकापासून सायकलने यांचा प्रवास सुरु होतो. एखाद्या कार्यालयात डबा देऊन येईपर्यंत सायकल इतकी तापते की सायकलला हात लावणे, सीटवर बसणे पण मुश्किल होते. बरोबर असलेले एकदीड लिटर पाणी कधीच संपून जाते. उन्हाळ्यात अंगदुखी, डोकेदुखी, ताप येणे असे आजार वाढतात. पण कामावर खाडे झाले की पैसे कापले जातात. त्यामुळे काम करण्याशिवाय पर्याय नसतो. तापलेल्या उन्हाळ्याची ही कथा तर सध्या मुंबईत केव्हा कोणता ऋतू सुरु असतो हेच सांगता येत नाही अशी स्थिती झाल्याचे ते नमूद करतात. कोव्हिडनंतरच्या काळात डब्यांची संख्या कमी झाली तसे रोजगारात सुमारे ६० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यात पुन्हा या वाढत्या तापमानाचा जाच वाढत आहे.
सतत फिरतीचे काम करणारे डबेवाले, घरपोच विविध सामान, जेवण पोहोचवणारे डिलिव्हरी कामगार, टॅक्सी-रिक्षा चालक यांनादेखील वाढत्या उष्म्यात तळपत्या सूर्याला, घामाच्या धारांना सामोरे जाण्याशिवाय पर्यायच उरत नाही. एकीकडे मुंबईच्या तापमानात गेल्या पंधरा वर्षात जाणवण्याइतपत वाढ होत असल्याचे दिसून येत असताना अशा अनेक कामगारांच्या प्राथमिक सुविधांची सोयदेखील होत नसल्याचे दिसून येते. कमी होत जाणारे हरित आच्छादन ही तर सध्याची सर्वात मोठी समस्या असल्याचे डिलिव्हरी क्षेत्रातील सर्वच कामगार सांगतात. महत्वाच्या रेल्वे स्थानकाबाहेरील निवारा शेडची अद्याप पूर्ण न झालेली डबेवाल्यांची मागणी तर सर्वात जुनी आहे. इतर कोणत्याही सावलीपेक्षा झाडाखाली थोडावेळ जरी उभे राहिलं तर खूप फरक पडतो असे सर्वच डिलिव्हरी कामगार सांगतात. विशेषत: उपनगरीय भागात कार्यालयीन परिसरात झाडांचे प्रमाण कमी असल्याचे ते नमूद करतात. एकीकडे हरित आच्छादन कमी आणि दुसरीकडे काळ्या काचांच्या इमारतींची वाढती संख्या असे विपरित चित्र सध्या मुंबईत आहे.
लास्ट माईल डिलिव्हरी क्षेत्रात तर सध्या कमीत कमी वेळेत, सर्वाधिक वेगाने वस्तू घरपोहोच देण्याची जीवघेणी स्पर्धाच सुरु आहे. परिणामी गेल्या काही वर्षात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगार वाढत असून तेथील स्पर्धेबरोबरच वातावरण बदलाशी जुळवून घेताना त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
पण हे सर्व अचानक झाले आहे का? वातावरणात नेमका काय बदल झालाय हे जाणून घेण्यासाठी आकडेवारी खूप महत्वाची ठरते. साधारण पन्नास वर्षांची आकडेवारी पाहिली तर लक्षात येते की नजीकच्या पंधरा वर्षात तापमानात अधिक वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार १९७३ ते २०२० दरम्यानच्या प्रत्येक दशकात मुंबईच्या तापमानात ०.२५ अंश सेल्सियसने वाढ दिसून येते. यामध्ये १९९८ पर्यंतची तापमानातील वाढ प्रतिवर्ष सरासरीपेक्षा ०.००४ अंशवरुन ०.०११ अंश अशी वाढली असून २००९ नंतर ही वाढ प्रतिवर्ष सरासरीपेक्षा ०.०४२ अंश या वेगाने झाली आहे. मुंबईत आलेल्या उष्णतेच्या लाटांची ४५ वर्षांतील (१९७७ ते २०२२) आकडेवारी पाहता निम्म्याहून अधिक (एकूण १३ पैकी ८) उष्णतेच्या लाटा या २०२२ नजीकच्या पंधरा वर्षात आलेल्या दिसतात.
‘इम्पॅक्ट ऑफ लॅण्ड-युज डायनामिक्स ऑन लॅण्ड सरफेस टेम्परेचर इन मुंबई सिटी, इंडिया अ जिओस्पेशल अॅप्रोच’ या शोधनिबंधातील निष्कर्सानुसार उपग्रह इमेजरीचा डेटा सांगतो की, २००५ ते २०१० या काळातील मार्च ते मे दरम्यान मुंबईच्या काही भागातील जमिनीवरील पृष्ठभागाच्या सरासरी तापमानातील वाढ ३३.६४ अंश सेल्सियस वरुन २०१५ ते २०२० या काळात थेट ३८.८३ अंश सेल्सियस एवढी झाली आहे. यामागे उष्णतेच्या शहरी बेटांमुळे (अर्बन हिट आयलॅण्ड इफेक्ट) ही तापमान वाढ होत असल्याचे हा अभ्यास सांगतो. वातावरण बदल ही जागतिक घटना आहे तर उष्णतेची शहरी बेटे ही स्थानिक घटना आहे.
अनियोजितपणे जमिनीचा विकास यामुळे शहरातील हरित आच्छादन कमी होणे आणि बांधकाम क्षेत्र वाढले असून शहरात अनेक ठिकाणी उष्णतेच्या बेटांचा प्रभाव वाढत आहे. आधीच वातावरण बदलामुळे तापमानात वाढ होत असून उन्हाळ्यातील तापमानात आणखी भर पडत असल्याचे हे संशोधन दाखवून देते.
यावर्षी फेब्रवारीपासून तीव्र झळांचा सामना तर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचा सामना मुंबईला करावा लागला. कमाल तापमान तब्बल ३९.२ अंशापर्यंत नोंदविले गेले. हवामान विभागानुसार हिवाळ्यानंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीस ऋतू बदलताना सर्वसाधारणपणे तापमानात वाढ दिसून येते. पण यंदाच्या मार्चमध्ये कमाल आणि किमान दोन्ही तापमानाच्या नोंदी सरासरीपेक्षा एक ते दोन अंशाने अधिक नोंदविण्यात आल्या.
भारतीय हवामान विभागाने एप्रिल-मे-जून या महिन्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज मार्चच्या आधी वर्तविला. एप्रिलच्या सुरुवातीच्या आणि अखेरच्या आठवड्यात पारा ३४ अंशाच्या आसपास स्थिरावला असला तरी आर्द्रतेमध्ये कमालीची (८० पर्यंत) वाढ झाल्याने मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या.
वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी शहर, राज्य पातळीवर उष्णता कृती योजना (हिट अक्शन प्लान – HAP) तयार केलेली आहे. सस्टेनेबल फ्युचर्स कोलॅबरेटिव्ह या नवी दिल्ली स्थित संस्थेने देशातील महत्वाच्या नऊ शहरांतील उष्णता कृती योजनांचे नुकतेच विश्लेषण केले आहे. या सर्वच शहरांमध्ये उष्णतेच्या लाटांवर तात्काळ उपाययोजनांवर अधिक भर दिला जात असून दीर्घकालिन उपाययोजनांकडे पुरेशा गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा निष्कर्ष त्यातून समोर आला आहे.
दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेल्या उष्णता कृती योजना पुरेशा संस्थात्मक स्वरुपात नसल्याने उष्णताविषयक कृतींना आकार देण्यासाठी त्या अपुर्या पडतात. अनेक महत्वाच्या दीर्घकालीन उपाययोजना उपलब्ध नाहीत. शहरातील हिरव्या आच्छादनाचा विस्तार, उष्णता नष्ट करणाऱ्या खुल्या जागांची निर्मिती आणि सक्रिय शीतकरणात मदत करू शकणाऱ्या छतावरील सौरऊर्जेचा वापर यांसारख्या इतर कृती, उष्णतेचा सर्वाधिक धोका झेलणाऱ्या लोकसंख्येकडे आणि क्षेत्रांकडे पुरेसे लक्ष न देता अंमलात आणल्या गेल्याचे या अभ्यासात दिसून आले.
शहरी नियोजन विभागांसारख्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन उष्णतेच्या समस्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम फारच कमकुवत पातळीवर असल्याचे दिसून आले. अल्पकालीन उपाययोजना कमी खर्चिक असल्याने त्या तात्पुरत्या योजनांवरच लक्ष केंद्रित असल्यामुळे निधी पुरेसा असल्याचे सर्वेक्षणातील अधिकारी नमूद करतात. पण संरचनात्मक बदलासाठी समर्पित निधीची गरज असून तात्कालिक योजनांबरोबच दीर्घकालीन योजना नसतील तर भविष्यात उद्भवणाऱ्या तीव्र आणि दीर्घ कालावधीच्या उष्णतेच्या लाटांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढू शकते असे हा अहवाल नमूद करतो.
गेल्या काही वर्षात लास्ट माईल डिलिव्हरी क्षेत्रातील कामगारांची संख्या वाढत आहे. टिम लिझ सर्व्हिसेसच्या अभ्यासानुसार अत्यंत कमी वेळात वस्तू पोहोचवण्याच्या व्यापाराची (क्विक कॉमर्स) देशात वाढ होत असून या वर्षाअखेरपर्यंत या क्षेत्रातील सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी वाढणार आहे. वस्तू पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी कामगारांची सध्याची संख्या अडीच ते तीन लाख इतकी आहे. महाराष्ट्रातील त्यांची संख्या १९ टक्के आहे. मुंबई आणि परिसर हे या क्षेत्रातील मोठे केंद्र आहे.
उष्णता कृती आखताना त्यामध्ये अशा बदलत्या रोजगार पर्यायांचा विचार करण्याची गरज यातून अधोरेखित होते. त्याशिवाय दिवसभर कार्यरत असणारे बांधकाम कामगार, वाढते टॅक्सी-रिक्षा चालक अशा सर्वांचा विचार करुन उष्णता कृती योजनांमध्ये कामाच्या विविध क्षेत्रानुसार (विशेषत: दीर्घकाल बाहेर काम करणारे घटक) दीर्घकालिन उपाययोजनांचा समावेश करावा लागेल. वातावरण बदलाचा सामना करताना दीर्घकालिन उपाययोजनांची गरज असते. मात्र बऱ्याचदा लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या विहीत अल्प काळातच मोठे काम दाखवायचे असल्यामुळे तात्कालिक उपायच अधिक केले जातात. पण वातावरण बदलाचा सामना करण्यासाठी अंशकालिन, तात्कालिक उपयांबरोबरच दीर्घकालिन विचार आणि योजनांची गरज असते याची या वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गांभीर्यांने नोंद घ्यावी लागेल.
हिट वेव्ह म्हणजे काय? कशी जाहीर करतात?
उष्णतेची लाट जाहीर करण्याची सार्वत्रिक व्याख्या नसून सामान्यत: दीर्घकाळ उष्णता असा अर्थ लावला जातो. किनारपट्टी, डोंगराळ आणि मैदानी प्रदेशासाठी भिन्न कमाल तापमानाचा आधार घेतला जातो. किनारपट्टी प्रदेशासाठी प्रत्यक्ष कमाल तापमान (Actual maximum temperature) ३७ अंश सेल्सियसपेक्षा अधिक असणे, तर डोंगराळ प्रदेशासाठी ३० अंश सेल्सियसपेक्षा अधिक असणे, मैदानी प्रदेशासाठी ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक असणे प्रमाण मानले जाते. तापमानातील वाढ सरासरीपेक्षा ४.५ ते ६.४ अंश सेल्सियस असेल तर उष्णतेची लाट आणि ही वाढ सरासरीपेक्षा ६.४ वाढ असेल तीव्र उष्णतेची लाट जाहीर केली जाते.
वाढत्या उष्म्याचे आरोग्यावर परिणाम
उष्माघातामुळे जलद नाडी आणि बेशुद्ध पडणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. निर्जलीकरणामुळे (डिहायड्रेशन) अधिक घाम येऊन तोंड कोरडे पडणे, अशक्तपणा, चक्कर येणे वाढते. तीव्र निर्जलीकरणामुळे मुत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. अति उष्णतेच्या काळात शरीरात रक्तपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हृदयाला अधिक काम करावे लागू शकतो. अधिक वयाच्या वितरण कामगारांसाठी ते आव्हानात्मक असते.
(सुहास जोशी मुक्त पत्रकार आहेत तर विश्वजीत पुजारी वातावरण बदलाचे अभ्यासक आहेत.)