Morning High Blood Sugar Reasons: मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. दिवसभरात अनेकदा साखरेची पातळी वाढत-घटत असते, परंतु काही लोकांमध्ये एक वेगळीच समस्या दिसून येते; ती म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी रक्तातील साखर जास्त असणे. अनेकांना प्रश्न पडतो की रात्री काहीही न खाल्ल्यावरही सकाळी साखर का वाढते?
साधारणपणे जेव्हा आपण अन्न सेवन करतो, तेव्हा शरीर त्याचे पचन करून त्यातील कर्बोदकांपासून ग्लुकोज तयार करते. हे ग्लुकोज रक्ताद्वारे शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचते आणि ऊर्जा म्हणून वापरले जाते, त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर थोडी वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. मात्र, काही व्यक्तींमध्ये अन्न न खाल्ल्यावरही सकाळी साखरेची पातळी जास्त आढळते. यालाच ‘रिकाम्या पोटी साखर वाढणे’ असे म्हणतात.
तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीमागे काही ठराविक कारणे असू शकतात. मधुमेह, जीवनशैलीशी संबंधित आजार आणि आहार यावर अभ्यास करणारे काही तज्ज्ञ सांगतात की, जगभरातील अनेक मधुमेही रुग्णांमध्ये रिकाम्या पोटी साखर वाढण्याची समस्या आढळते. यामागे शरीरातील काही प्रक्रिया आणि सवयी कारणीभूत ठरू शकतात.
१. इन्सुलिन प्रतिकार हे त्यातील एक प्रमुख कारण मानले जाते. जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत, तेव्हा रक्तातील साखर पेशींमध्ये जाण्याऐवजी रक्तातच राहते, त्यामुळे साखरेची पातळी वाढण्याची शक्यता निर्माण होते.
२. याशिवाय अपुरी झोप किंवा रात्री वारंवार जाग येणे या समस्येला कारणीभूत ठरू शकते. झोप अपुरी झाल्यास शरीरातील संप्रेरकांचे संतुलन बिघडू शकते, ज्याचा परिणाम रक्तातील साखरेवर होऊ शकतो.
३. काही वेळा शरीरातील नैसर्गिक जैविक प्रक्रियेमुळेही सकाळी साखर वाढू शकते. पहाटेच्या सुमारास शरीर काही संप्रेरके स्रवते, ज्यामुळे ऊर्जा निर्माण करण्यासाठी साखरेची पातळी थोडी वाढण्याची शक्यता असते.
४. रात्रीच्या जेवणात जास्त प्रमाणात कर्बोदके असलेले पदार्थ खाणे किंवा उशिरा स्नॅक्स खाणेही सकाळी साखर वाढण्यामागील एक कारण ठरू शकते.
तज्ज्ञ सांगतात की, काही साध्या सवयी अंगीकारल्यास ही समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, रात्रीचे जेवण हलके आणि संतुलित असावे. कमी ग्लायसेमिक निर्देशांक असलेल्या भाज्या, तसेच प्रथिनयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करणे उपयुक्त ठरू शकते.
रात्रीचे जेवण वेळेवर करणे आणि त्यानंतर थोडेसे चालणे ही सवयही लाभदायक मानली जाते. जेवणानंतर १० ते १५ मिनिटे हलके चालल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
उशिरा रात्री खाण्याची सवय टाळणे, पुरेशी झोप घेणे आणि तणाव कमी ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. ध्यान, श्वसनाचे व्यायाम किंवा मन शांत ठेवणाऱ्या सवयी अंगीकारल्यास शरीरातील संतुलन राखण्यास मदत मिळू शकते.
योग्य आहार, नियमित हालचाल आणि संतुलित जीवनशैली यांचा अवलंब केल्यास रिकाम्या पोटी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे अधिक सोपे होऊ शकते.
(टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिलेला आहे. यातील माहिती वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांना पर्याय नाही. अधिक तपशिलासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी ‘लोकसत्ता’ घेत नाही.)
