अंड्याचे आरोग्याला अनेक फायदे असतात. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांसाठीच अंडे खाणे फायदेशीर असते. बऱ्याचदा शरीरातील ताकद वाढण्यासाठी डॉक्टर आणि आहातज्ज्ञही आहारात अंड्याचा समावेश करण्यास सांगतात. याशिवाय अंड्यापासून एखादा पदार्थ सहजपणे तयार करता येऊ शकतो, त्यासाठी वेळही कमी लागतो. अंडी हा प्रोटिन्स मिळवण्याचा सर्वात स्वस्त पर्याय आहे. अंड्यामधून भरपूर प्रोटिन्सचा पुरवठा होत असल्याने स्नायू बळकट होतात व उतींचे कार्य सुधारून शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अंड्यामुळे पुरुषांची ११ टक्के तर स्त्रियांची १४ टक्के प्रोटिन्सची गरज भागते. एका अंड्यामधून शरीराला ६ ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. अंडे आपण कोणत्याही स्वरूपात खाऊ शकतो. मात्र उकडलेले अंडे हा जास्त पोषक प्रकार आहे. तेलकट किंवा तळलेल्या अंड्याचे खाद्यपदार्थ आरोग्याला अपायकारक असतात.
दूध नेमके कधी प्यायलेले चांगले?
सकाळच्या वेळी घाई होते म्हणून काही जण आधीच अंडी उकडून ठेवतात. किंवा मुलांना डब्यात देण्यासाठीही काही गृहिणी उकडलेल्या अंड्यांचा पर्याय स्विकारतात. हल्ली हॉटेलमध्ये किंवा अगदी रस्त्यावरही उकडलेली अंडी विकणारे लोक दिसतात. आता आधीच उकडून ठेवलेली अंडी आरोग्यासाठी कितपत चांगली असतात? त्यातून योग्य तेवढे पोषण मिळते का? अशाप्रकारे अंडी किती वेळ चांगली राहू शकतात? ती फ्रिजमध्ये ठेवावीत की बाहेर? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडतात. काय आहेत या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया…
उकडलेली अंडी किती दिवस टिकतात ?
उकडलेली अंडी फ्रीजमध्ये ठेवल्यास ती जवळपास आठवडाभर चांगली राहतात. मात्र, त्यासाठी ती बाहेरच्या कवचासकट ठेवलेली चांगली. पण हे उकडलेले अंडे साल काढलेले असेल तर ते ३ ते ४ दिवसांत खावे. अंडे पाण्यात उकडल्याने त्याच्या कवचावर असणारे विषाणू नष्ट होतात. त्यामुळे त्याचा धोका नसतो. उकडलेले अंडे हवाबंद डब्ब्यामध्ये ठेवावे. कारण आर्द्रता जास्त झाल्यास फ्रिजमध्येही ते खराब होण्याची शक्यता असते. असे ठेऊनही हे अंडे खराब झाले तर ते आपल्या लक्षात येते. त्याच्या दुर्गंधीवरून तुम्ही ते ओळखू शकता. अंड्याला उग्र वास येत असल्यास ते अंडे अजिबात खाऊ नये.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)