हेपॅटिटिस सी संसर्गामुळे देशात १२ दशलक्ष लोकांना यकृताचे विकार होतात, या संसर्गाबाबत अद्याप पुरेसे संशोधन झालेले नाही, असे इंडियन सोसायटी ऑफ क्लिनिकल रिसर्च या संस्थेने म्हटले आहे. हिपॅटिटिसचे ए,बी,सी,डी,ई असे प्रकार असतात. त्यातील तीन प्रकारच्या संसर्गात सध्या कुठलाही उपाय नाही, असे आयएससीआर या संस्थेच्या अध्यक्षा सुनीला थत्ते यांनी सांगितले. हेपॅटिटिसचे काही प्रकार घातक व जीवघेणे आहेत. त्याबाबत वैद्यकीय क्षेत्रात पुरेसे संशोधन झालेले नाही. त्यावर फार कमी उपचार प्रभावीपणे काम करतात व ते सहनीय व परवडणारे असले पाहिजेत असे त्या म्हणाल्या. जगातील १७ टक्के लोकसंख्या भारतात असून जगातील या रोगाचे वीस टक्के प्रमाण भारतात आहे, पण जगातील केवळ १.४ टक्के वैद्यकीय चाचण्या भारतात होतात अशी स्थिती आहे. जगाच्या इतर भागांत जेवढय़ा वैद्यकीय चाचण्या या रोगावर होतात त्या तुलनेत भारताचे प्रमाण फार कमी आहे. यात जागतिक चाचण्यांत भारताने क्रमांक एकवर असावे असे आमचे म्हणणे नाही, पण या रोगाचे प्रमाण भारतात वाढत आहे त्या तुलनेत चाचण्या होणे गरजेचे आहे. कारण लोकांच्या आरोग्य गरजा फार आहेत. ज्या लोकांमध्ये यकृताला या विषाणूची लागण झाली आहे त्यांची संख्या जास्त असून त्यांना सुरक्षित, प्रभावी वैद्यकीय उपाययोजना मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. जागतिक हिपॅटिटिस दिन २८ जुलैला साजरा झाला. त्यात जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाचा प्रसार २०३० पर्यंत पूर्णपणे कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नवीन सहन करता येण्यासारखी उपचारपद्धती व औषधे शोधून काढणे गरजेचे आहे. भारतात हेपॅटिटिस बी व सी यांची लागण जास्त प्रमाणात झाली आहे. (टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)