आपले वय जसे वाढत जाते तसे आपले शरीर थकत जाते. त्यामुळे जास्त काळजी घेणे आवश्यक असते. वयोमानानुसार आहारात बदल केल्यास तुमचे आरोग्य नक्कीच जास्त चांगले राहू शकते. वयानुसार शरीराच्या गरजा, त्याला आवश्यक असणारे पोषण हे वेगवेगळे असते. २०व्या वर्षी खात असलेले पदार्थ आपण ६०व्या वर्षी खाऊ शकूच असे नाही. त्यामुळे त्यामुळे विशिष्ट वयानुसार आपल्याला आहारात बदल करावा लागतो. पाहूयात कोणत्या वयात कोणते पदार्थ खाल्लेले चांगले ठरतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वय वर्षे २०

या वयात आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती अतिशय चांगली असते. त्यामुळे या वयात आरोग्याच्या काही समस्या उद्भवल्याच तर हे तरुण शरीर त्यातून बरे होण्याची शक्यता जास्त असते. या काळात हाडे आणि मांसपेशी वेगाने तयार होत असल्याने या काळातील आहार अतिशय महत्त्वाचा असतो. या वयात आपले शरीर सुपर अ‍ॅक्टीव्ह असल्याने शरीराला प्रथिने, कॅल्शियम, लोह, कार्बोहायड्रेट यांची आवश्यकता असते. त्यामुळे दाणे, सुकामेवा, फळे, पालेभाज्या, दूध, दही, ताक यांचा आहारात आवर्जून समावेश ठेवावा.

वय वर्षे ३०

या वयात करिअर, नोकरी, लग्न अशा अनेक जबाबदाऱ्या व्यक्तीवर आलेल्या असतात. यामध्ये मानसिक आणि शारीरिकही अनेक बदल होतात. या काळात आपण जीवन स्थिरस्थावर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो. या काळात आपले प्राधान्यक्रम बदललेले असल्याने आपल्यावर बराच ताण असतो. अशा काळात शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असणारे पदार्थ म्हणजेच अंडे, शहाळे, ऑलिव्ह ऑईल, पालेभाज्या, फळे, कमी स्निग्धता असलेले दुग्धजन्य पदार्थ खावेत.

World Hypertension Day 2022 : उच्च रक्तदाबाच्या ‘या’ ६ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

वय वर्षे ४०

या काळात आपल्या आयुष्याचा अर्धा टप्पा आपण गाठलेला असतो. जीवनातील बरेच चढ-उतार पाहिलेले असतात. यानंतर आरोग्याच्या काही तक्रारी निर्माण होण्यास सुरुवात होते. मेटाबॉलिझम, लोहाची कमतरता, रक्तदाब, मधुमेह, हाडांचे दुखणे अशा तक्रारी कमी जास्त प्रमाणात सुरु झालेल्या असतात. या काळात व्यक्तीची पचनशक्ती काही प्रमाणात बिघडलेली असते. तसेच वजन नियंत्रणात राखणे हे एक आव्हान झालेले असते. त्यामुळे या काळात कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली आणि इतर सगळ्या भाज्या खाव्यात. तसेच आहारात लसूण, कांदा, हळद, ऑलिव्ह ऑईल असे हृदयाला तंदुरुस्त ठेवणारे पदार्थ खावेत. ओमेगा ३ या काळात अतिशय उपयुक्त ठरते.

वय वर्षे ५०

मागची इतकी वर्षे धावपळ केल्यानंतर या काळात शरीर बोलायला लागलेले असते. या काळात हाडे आपले अस्तित्त्व दाखवायला लागतात. तसेच आपल्या आवडीच्या गोष्टी खाल्ल्यानंतर अचानक जळजळायला लागते. दात दुखतात, केस पांढरे होतात. त्यामुळे या काळात आहाराकडे लक्ष देणे आवश्यक असते. त्यामुळे या काळात फायबर, झिंक, प्रोटीन, व्हीटॅमिन बी, अंडी, कडधान्ये जास्त प्रमाणात खायला हवे. बाहेरचे खाणे टाळलेलेच बरे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make this changes in diet according to age find out which foods will be useful at which age pvp
First published on: 17-05-2022 at 21:21 IST