केंद्र सरकारची संसदेत माहिती ’ डब्ल्यूएचओच्या अहवालाची दखल जगातील सर्वाधिक क्षयरोग रुग्ण भारतात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी लोकसभेत दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ)च्या अहवालानुसार ही माहिती देत असल्याचे त्यांनी सांगितले. डब्ल्यूएचओने क्षयरोगाविषयी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार २०१४मध्ये भारतात २२ लाख क्षयग्रस्त रुग्ण आहेत. ही संख्या इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त असल्याची माहिती नड्डा यांनी दिली. क्षयरोगाच्या वाढत्या प्रभावाला सातत्याने वाढणारी लोकसंख्या त्याचबरोबर क्षयरोग नियंत्रणात आलेले अपयशही कारणीभूत आहे. त्यामुळेच गेल्या १५ वर्षांत भारतातील क्षयग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. १९९०च्या तुलनेत भारताने गेल्या दक्षकभरात क्षयरोगाचा वाढता प्रभाव आणि त्यातून होणारे मृत्यू यांच्यावर नियंत्रण मिळवण्याची किमया साध्य केली आहे. क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने आखलेले विविध कार्यक्रम, औषधे व उपचार पद्धती यामुळे २०१३ ते २०१५ या काळात क्षयरुग्ण वाढण्याच्या संख्येवर बरेच नियंत्रण मिळविण्यात आले, असे नड्डा यांनी सांगितले. ‘सात कोटी जणांना गलगंड’ नवी दिल्ली : भारतातील सात कोटीपेक्षा जास्त जणांना गलगंड आणि आयोडिनची कमतरता असल्यामुळे होणाऱ्या विकाराने ग्रस्त आहेत, असे नड्डा यांनी सांगितले. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी प्रत्येक घरात आयोडिनयुक्त मीठ पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य विभागातर्फे आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम आखण्यात येणार आहे, असे नड्डा यांनी सांगितले.