नवी दिल्ली : ‘सोरायसिस’ या त्वचाविकाराविषयी खूप गैरसमज आहेत. त्यातही हा विकार संसर्गजन्य असतो, हा सर्वात मोठा गैरसमज. मात्र, हा अजिबात संसर्गजन्य नाही, असे वैद्यकीयतज्ज्ञ स्पष्ट करतात. ‘सोरायसिस’ विकारात गुडघे, कोपर, घोटा आणि डोक्याच्या त्वचेवर पुरळ आणि चट्टे उमटतात. येथे असह्य खाज सुटते. हा एक सामान्यपणे आढळणारा व दीर्घ काळ टिकणारा आजार आहे. हा विकार पूर्ण बरा होईल, असा कोणताही इलाज नाही. या आजाराविषयी वैद्यकीय माहिती असली, तरीही ‘सोरायसिस’बद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत. केवळ संसर्गजन्यतेबाबतच नाही, तर या विकाराबाबत इतर बाबतीतही गैरसमज आढळतात. हा विकार फक्त प्रौढांनाच होतो, असा एक गैरसमज आहे. मात्र, हा वयाच्या कुठल्याही टप्प्यावर होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. या विकारावर उपचार असतात का, असे विचारले जाते. या विकारास नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे आहेत. या विकारात केवळ खाज सुटते, की बाकी काही गंभीर असू शकते, असे विचारले जाते. या विकारामागे मधुमेह, यकृताचे विकार किंवा हृदयविकार असू शकतो. सांध्यावर दुष्परिणाम होऊन संधिवाताचाही धोका असू शकतो. याला ‘सोरायसिस संधिवात’ म्हणून ओळखले जाते. हा विकार आनुवंशिक असू शकतो व पुढील पिढीत संक्रमित होऊ शकतो. विविध प्रकारच्या ‘सोरायसिस’ची वेगवेगळी लक्षणे आढळतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यावर उपचार करून, नियंत्रण ठेवता येते.