नवी दिल्ली : जागतिक निद्रा दिन नुकताच शुक्रवारी (१८ मार्च) झाला. जागतिक निद्रा सोसायटीच्या निद्रा दिन समितीतर्फे झोपेचे महत्त्व सर्वदूर समजावे, यासाठी हा दिन साजरा केला जातो. निद्रानाशामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या कशा दूर कराव्यात व तिचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, याविषयी यानिमित्त जागृती केली जाते. यंदा या दिनाचे घोषवाक्य होते, ‘सुयोग्य निद्रा, निरोगी मन आणि आनंदी जग’. चांगल्या झोपेसाठी तज्ज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत. ते असे : संतुलित आहार, निद्रेला पोषक सवयी, वातावरण, उत्तेजके अथवा उत्तेजक पेयसेवन न करणे, झोपेची वेळ निश्चित करणे आणि शारीरिक व्यायाम, इतर सक्रियता राखल्यास चांगली झोप येऊ शकते. झोपेच्या ठिकाणी शांतता असावी. कॅफेनचा समावेश असलेली पेयांचे सेवन (चहा-कॉफी) कमी करणे, वैद्यकीय सल्ल्याने सुयोग्य आहार घ्यावा, चिंता, निराशा सतावत असेल तर त्यावर वेळीच तज्ज्ञांकडून मानसोपचार करावेत. योग्य श्वसनतंत्र, ध्यान, अश्वगंधासह इतर आयुर्वेदिक औषधेही निद्रानाशावर प्रभावी ठरतात. संबंधित तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांचे सेवनही उपयोगी ठरते. हार्मोनल असंतुलन असेल तर वैद्यकीय सल्ल्याने ते दूर करणारी औषधे घेतल्याने निद्रानाश दूर होऊ शकतो. काहींच्या बाबतीत अॅक्युपंक्चर उपचार प्रभावी ठरतो. याद्वारे शरीरातील विशिष्ट बिंदूंना उद्दीपित केल्यास निद्रेस पोषक द्रव्य शरीरात निर्माण होऊन गुंगी येऊन रुग्ण निद्राधीन होतो. विशेषत: चिंता, निराशा आणि गंभीर मानसिक विकारांनी (स्किझोफ्रेनिया) ग्रासलेल्यांना निद्रानाश सतावतो. त्यांच्यावर अॅक्युपंक्चर उपचार परिणामकारक ठरून त्यांना झोप येण्यास मदत होते. ५०० मनोरुग्णांवर अॅक्युपंक्चर उपचार केल्यानंतर त्यांची झोप सुधारली, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.