आयुष्मान भारत योजनेअंतर्गत (PM-JAY) पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवावे लागेल. हे आयुष्मान कार्ड बनवणं आता आणखी सोपं झालंय. खरं तर, लाभार्थी UTIITSL केंद्रांवर PM-JAY अंतर्गत त्यांचे 'आयुष्मान कार्ड' बनवून घेऊ शकतात. तसेच तुम्ही या योजनेसाठी आणि कार्डसाठी पात्र आहात की नाही, हे तपासण्यासाठी जवळच्या UTIITSL केंद्राला भेट देऊ शकता किंवा त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी 14555 वर कॉल करू शकता. आयुष्मान भारत योजनेसाठी कोणतीही विशेष नोंदणी प्रक्रिया नाही. RJBY योजनेअंतर्गत SECC द्वारे ओळखल्या गेलेल्या सर्व लाभार्थ्यांना PMJAY लागू आहे. तुमची पात्रता तपासण्यासाठी, PMJAY पोर्टल ला भेट द्या आणि “अम आय एलिजिबल' (मी पात्र आहे का?) या ऑप्शनवर क्लिक करा. पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर भरावा लागेल, त्यानंतर कॅप्चा कोड येईल आणि नंतर तुम्हाला ओटीपी (वन टाइम पासवर्ड) जनरेट करावा लागेल. पुढे, आपले राज्य निवडल्यानंतर, आपले पूर्ण नाव, HHD क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे तुमच्याबद्दलची माहिती शोधा. हा शोध घेतल्यानंतर जी माहिती समोर येईल, त्या आधारावर तुम्ही आणि तुमचे कुटुंब या योजनेत समाविष्ट आहे की नाही, हे तुम्ही पाहू शकाल. एकदा तुम्ही PMJAY चा लाभ मिळवण्यास पात्र झालात की, तुम्ही योजनेशी संबंधित ई-कार्ड सहज मिळवू शकता. तुमचे आधार किंवा रेशन कार्ड PMJAY Kiosk वर पडताळले जाईल, त्यानंतर तुम्हाला आयुष्मान कार्ड देण्यात येईल. या कार्डचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीला आधार कार्ड किंवा कोणत्याही शासकीय ओळखपत्र (मतदान कार्ड, पॅन कार्ड इ.) तसेच कौटुंबिक ओळखपत्र (रेशन कार्ड, राज्य-मान्यताप्राप्त ओळखपत्र इ.) सोबत ठेवावे लागते. आयुष्मान भारत योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणूनही ओळखली जाते आणि या योजनेचे उद्दीष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्य सेवा आणि सुविधा प्रदान करणे आहे. या योजनेची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ रोजी केली होती. या आरोग्य विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील सुमारे ५० कोटी नागरिकांना संरक्षण देण्यात आले आहे.