वैवाहिक आयुष्यात आनंदी जोडीदार मिळाला, तर विवाहबंध प्रदीर्घ काळ टिकतात, शिवाय पती-पत्नीचे आयुष्य वाढविण्यासही ही बाब प्रामुख्याने कारणीभूत ठरू शकते, असा दावा अभ्यासकांनी केला आहे. याबाबतचा अभ्यास ‘सायकॉलॉजिकल सायन्स’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. एखाद्या व्यक्तीची सामाजिक-आर्थिक स्थिती आणि शारीरिक आरोग्य कसे असले तरी, तो त्याच्या जोडीदाराबाबत आयुष्यात कितपत समाधानी आहे, याचा तो किती काळ जगतो याच्याशी संबंध असतो, असे या अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. एखादी व्यक्ती आयुष्यात कितपत समाधानी आहे, यापेक्षाही तिचा जोडीदार जीवनात किती समाधानी आहे, ही बाब त्या माणसाचा जीवनकाल किती असेल, याचे चांगले निदर्शक ठरू शकते. हा अभ्यास करताना आनंदी जोडीदार असलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या तुलनेत तितकासा आनंदी जोडीदार नसलेल्या व्यक्ती अशी गटनिहाय पाहणी करण्यात आली. अभ्यासाच्या प्रारंभी ज्यांचे जोडीदार आनंदी होते, अशा व्यक्ती पुढील आठ वर्षांत मृत्यू पावण्याची शक्यता दुसऱ्या गटाच्या तुलनेत कमी आढळून आली. याबाबत नेदरलॅण्डसमधील टिलबर्ग विद्यापीठातील संशोधक ओल्गा स्टॅव्हरोव्हा यांनी सांगितले की, एखाद्याच्या आयुष्यात त्याच्या आरोग्यावर परिणाम करण्यात निकटवर्तीयांची भूमिका कशी महत्त्वाची ठरते, हे या अभ्यासातून अधोरेखित होते. व्यक्तीची सामाजिक स्थिती समजून घेण्यासाठी तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि भावविश्व समजून घेणे कसे आवश्यक ठरते, हेही या अभ्यासातून दिसून आले आहे. आरोग्यावर परिणाम करू शकणारी वर्तणूक, आहार आणि व्यायाम, आनंदी- कार्यशील जोडीदार यांच्याशी समाधानी वृत्तीचा संबंध दिसून येतो.