भारतात विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यात प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाहनांची वाढती संख्या आणि इतर अनेक गोष्टींमुळे हे प्रदूषण गंभीर रुप धारण करत आहे. त्याचा आरोग्यावरही अतिशय वाईट परिणाम होतो. नुकत्याच समोर आलेल्या एका सर्वेक्षणानुसार वाहनांतून येणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण आणि साबण, डिओड्रंट आणि पर्फ्युममुळे होणारे प्रदूषण हे सारखेच असते. विशेष म्हणजे या गोष्टींमुळे हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते. सध्या कार आणि ट्रकमधून जितका धूर हवेत पसरतो तितकेच प्रदूषण या तीन गोष्टींमुळे होत असल्याचे म्हटले आहे.

साबण आणि डिओ यांसारख्या पेट्रोलियम असणाऱ्या वस्तूंमध्ये पेट्रोलियम असणारी रसायने असतात. ही रसायने हवा प्रदूषित करतात, हवेत असणाऱ्या कणांत ही रसायने मिसळल्याने धुर आणि धुके यांचे मिश्रण म्हणजेच धुरके तयार होते. या धुरक्यामुळे दमा, फुफ्फुसांचा कर्करोग, हृदयरोग यांसारखे आजार होतात. कधी हे आजार जास्त गंभीर रुप धारण करण्याचीही शक्यता असते. त्यामुळे हवेतील प्रदूषणाबरोबरच हे प्रदूषणही आरोग्यासाठी अतिशय घातक असते. त्यामुळे या उत्पादनांचा वापर करत असताना काळजी घेणे आवश्यक आहे. वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण कमी व्हावे यासाठी काही नियम आहेत. मात्र साबण आणि डिओमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत जनजागृती नसल्याने त्याची कुठेच नोंद केली जात नाही.