पावसाळा सुरु होताच ज्याप्रकारे आजारांचे प्रमाण वाढते, तसेच डासांचा धोकाही वाढू लागतो. मात्र आता लवकरच डेंग्यू मलेरिया सारख्या धोकादायक डासांपासून दिसला मिळण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांनी डेंग्यू पसरवणाऱ्या डासांचा नायनाट करण्यासाठी खास डासांची रचना केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) अशी खास मादी डास तयार केली आहेत, जिने जन्माला घातलेल्या अळ्यांमध्ये डेंग्यु-मलेरियाचे विषाणू नसतील.

आयसीएमआर-व्हीसीआरसीचे संचालक डॉ. अश्वनी कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, शास्त्रज्ञांनी एक विशेष प्रकारचा डास विकसित केला आहे जो हळूहळू डेंग्यू आणि चिकनगुनियाचा नायनाट करेल. ते म्हणाले, “आम्ही अशा मादी डासांना सोडणार आहोत, जे नर डासांच्या संपर्कात येतील आणि अशा अळ्या तयार करतील, ज्यात हे विषाणू नसतील. आम्ही डास आणि अंडी तयार केली असून ती कधीही सोडली जाऊ शकतात.”

डेंग्यूशी लढण्यासाठी औषध नाही

आयसीएमआर-व्हीसीआरसीच्या संशोधकांनी एडिस अ‍ॅप्टिसच्या दोन प्रजाती विकसित केल्या आहेत. या दोन्ही प्रजाती डेंग्यूचा नायनाट करतील. या वर्षी भारत सरकारने डेंग्यूचा सामना करण्यासाठी टीएचएसटीआय, जैवतंत्रज्ञान विभागाच्या ड्रग्ज फॉर नेग्लेक्टेड डिसीजेस इनिशिएटिव्ह (DNDI) इंडिया फाउंडेशनशी करार केला आहे. सध्या डेंग्यूशी लढण्यासाठी कोणतेही औषध नाही. या करारानुसार येत्या पाच वर्षांत डेंग्यूवर प्रभावी औषध विकसित केले जाणार आहे.

डेंग्यूची लक्षणे

भारतात हा रोग पावसाळ्यात झपाट्याने पसरतो. यामध्ये ताप, अस्वस्थता, उलट्या आणि शरीरात तीव्र वेदना सुरू होतात. रुग्णांमध्ये रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात. कधीकधी रुग्णामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव सुरू होतो. अशा स्थितीत अनेक अवयव काम करणे बंद करतात. शेवटी रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.