नवी दिल्ली : चालण्याचा व्यायाम हा कमी दमछाक करणारा. तितकाच सोपा आहे. पण, या व्यायामात सातत्य राखल्यासच त्याचा फायदा होतो. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात अशा आजारांना प्रतिबंध करण्यास रोजचे चालणे उपकारक ठरते. पण, असे असूनही, या व्यायामाचा अनेकांना अपेक्षित लाभ मिळत नाही. त्याचे मुख्य कारण चालण्याच्या चुकीच्या पद्धती. त्या टाळणे आवश्यक आहेत. मित्र किंवा समूहाद्वारे गटात चालणे लाभदायी ठरत नाही. तसेच संगीत ऐकताना, मोबाईलमध्ये गुंतलेले असताना, चालताना चंचल अवस्था ठेवल्यास नुसते चालून काही उपयोग होत नाही. खूप घट्ट कपडे किंवा खूप सैल कपडे परिधान केल्याने योग्य प्रकारे चालता येत नाही. आपल्या बुटांचाही चालण्याच्या गतीवर परिणाम होतो. योग्य बुट नसतील तर पायाची हाडांसह स्नायूंवरही परिणाम होतो. चालणे म्हणजे फक्त पावलांची संख्या मोजणे असाही एक अपसमज आहे. पण, चालण्याचे आरोग्यकारी फायदे मिळवण्यासाठी किती कॅलरी जाळता हे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मान खाली घालून चालणे योग्य नाही. डोके सरळ आणि मान, पाठ आणि खांदे सरळ रेषेत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे योग्य प्रकारे श्वास घेता येतो. चालताना हात शरीराप्रमाणेच वेगाने फिरवणे महत्त्वाचे. लहान आणि जलद पावले टाकणेही उपयोगी. विशेष म्हणजे मार्ग नियमित बदलत राहणे आवश्यक. चालल्यानंतर पायाचे स्नायू थोडे ताणल्यास त्याचाही लाभ होतो.