संशोधकांनी नवीन प्रणाली विकसित केली असून, त्याद्वारे भारतातील विविध भागांमध्ये पसरलेल्या डेंग्यूचा प्रसार ओळखणे शक्य होणार आहे. त्यामुळे या प्राणघातक आजाराच्या होणाऱ्या संक्रमणाविरुद्ध आगाऊ प्रतिबंधात्मक उपाय करणे शक्य होणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

ब्रिटनमधील लिव्हरपूर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी देशामध्ये डेंग्यूचा प्रसार होणाऱ्या हवामानातील जोखीम ओळखली असून, पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात आणि केरळ या राज्यांमधील भिन्न हवामानाचे झोन समोर आणले आहेत.

हैदराबादमधील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (एनआयपीईआर) गुवाहाटी येथील संशोधकांच्या सहकार्याने डेंग्यू विषाणूच्या वाढीसाठी आवश्यक असणारे या भागातील बाह्य़ इनक्युबेशन काळ (ईआयपी) तपासण्यात आला. या भागामधील तापमानाची पातळी नियमित आणि मासिक पद्धतीने मोजण्यात आली.

ईआयपी म्हणजे डासामधील विषाणूच्या इनक्युबेशनसाठी (रोगजंतूंनी शरीरात प्रवेश मिळविल्यानंतर प्रत्यक्ष रोगास आरंभ होईपर्यंतचा काळ) लागणारा वेळ होय. या वेळेमध्ये विषाणूयुक्त रक्त डास शोषून घेतो. त्यानंतर ते लाळग्रंथीत पोहोचले जाते. असे झाल्यानंतर डास हा विषाणू मानवी होस्टकडे प्रसारित करण्यास सक्षम होतो.

जर कमी तापमान असेल तर (१७ ते १८ अंश) विषाणू संक्रमण होण्याचे प्रमाण कमी असते. जसजसे तापमान वाढते तसतसे डासांची चयापचय क्रिया वाढत जाते. त्यामुळे विषाणू संक्रमण होण्याचे प्रमाण वाढते.