Why Do Mosquito Bite Only Few People: डेंग्यू, मलेरिया सारखे रोग बळावत असताना डासांपासून रक्षण करणे हे खुप महत्त्वाचे झाले आहे. तुम्ही कधी नीट लक्ष देऊन पाहिल्यास आपल्या आजूबाजूच्या अनेकांना डास चावण्याचे प्रमाण अगदी कमी असते. तर काहींना दहा वीस लोकांच्या गर्दीतही डास लक्ष्य करतात. याबाबतच्या अनेक अभ्यासांमध्ये समोर आले आहे की लोकसंख्येपैकी २० टक्के व्यक्तींना सरासरीपेक्षा जास्त डास चावतात. डास आकर्षित होणे ही गोष्ट सुमारे ८५ टक्के अनुवांशिक असते. अनेकदा अस्वच्छता हे डास चावण्यामागे मुख्य कारण मानले जाते, पण मंडळी, कितीही टापटीप राहूनही तुमच्या शरीरातील काही घटक डासांना आकर्षित करू शकतात. हे घटक नेमके कोणते आणि त्यात काय बदल करणे आपल्या हातात आहे हे आज आपण पाहणार आहोत, चला तर मग..

रक्तगट

मादी डास चावण्याचे मुख्य कारण म्हणजे रक्तगट. अंडी घालणाऱ्या माद्यांना शरीरात पोषक द्रव्य मिळवण्यासाठी रक्ताची गरज असते, त्यातही ओ रक्तगट हा अधिक पोषक असल्याने डास अशा व्यक्तींना मुख्यतः चावतात. (Brain Stroke Study: ६० वर्षाखालील व्यक्तींनाही ब्रेन स्ट्रोकचा धोका; ‘या’ एका रक्तगटात आढळले सर्वाधिक रुग्ण)

घाम

अल्कोहोल सेवन केलेल्या, नुकताच व्यायाम केलेल्या व्यक्तींचा चयापचयाचा दर आणि उच्छवासातून कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याचे प्रमाण अधिक असल्यास त्यांना जास्त डास चावतात. ज्यांना घाम जास्त येतो, त्वचेवरील छिद्रांद्वारे लॅक्टिक ॲसिड, युरिक ॲसिड आणि ऑक्टेनॉल स्रवण्याचे प्रमाण जास्त असेल तर डास चावण्याचे प्रमाण जास्त असते

बॅक्टेरिया

अनेकदा तुम्ही पाहिले असेल की पायाजवळ डास अधिक चावतात. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील सर्वाधिक बॅक्टेरिया हे पायाजवळ असतात. परिणामी ते डासांना अधिक आकर्षित करतात..

सतत जांभई येत असल्यास..

ज्या व्यक्तींच्या शरीरात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण अधिक असतं, त्यांना अधिक डास चावतात. अशा व्यक्तींना सतत जांभई येत असते. (मीटिंग, लेक्चर मध्ये सतत येतेय जांभई? ‘हे’ उपाय चटकन देतील आराम )

गडद रंग

दिवसा उजेडात डास कमी चावतात पण रात्री किंवा थोडा अंधार पडू लागल्यावर डासांचा हल्ला आक्रमक होतो. याचे कारण म्हणजे डास गडद रंगाकडे अधिक आकर्षित होतात. जर आपल्याला असे कपडे घालण्याची सवय असेल तर डास अधिक चावण्याचा धोका असतो.

दरम्यान पर्फ्युमचा वापर, आहारातील खारट पदार्थांचे किंवा पोटॅशियमचे प्रमाण यांमुळे डास चावण्याचा धोका वाढतो असा एक समज आहे, मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.