राज्य शासनाच्या सैनिक कल्याण विभागामार्फत ७ डिसेंबर हा दिवस सशस्त्र दल ध्वजदिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताने स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर लगेचच सरकारला सैनिक कल्याणाचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज भासू लागली. त्यासाठीच तत्कालीन संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने दरवर्षी ७ डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यामागील संकल्पना अशी होती की, देशाच्या नागरिकांना सैनिकांचे स्मरण म्हणून एक छोटा ध्वज भेट द्यायचा आणि त्यांच्या बदल्यात नागरिकांकडून देणगी स्वीकारायची. हा दिवस आपल्या देशातील सर्व सैनिकांसाठी आहे. देशवासी या दिवशी शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. सैनिक म्हणजे, कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती असतात आणि देशाला सुरक्षित आणि अखंड ठेवण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका निभावतात. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाचा इतिहास २८ ऑगस्ट १९४९ मध्ये भारताच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्त्वात एक कमिटी तयार करण्यात आली होती. समितीने निर्णय घेतला की, ध्वज दिन दरवर्षी ७ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येईल. नागरिकांमध्ये लहान झेंड्यांचं वितरण करून त्या बदल्यात सौनिकांसाठी निधी (डोनेशन) जमा करणं हा भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यामागील मूळ हेतू होता. गेल्या अनेक वर्षांपासून या दिवसाला महत्त्व आहे. त्यामागील कारण म्हणजे, जवानांच्या कुटुंबाची काळजी घेणं ही भारतातील सर्व जनतेची जबाबदारी आहे. भारतीय सशस्त्र दल ध्वज दिनाचें महत्त्व देशातील नागरिकांचं कर्तव्य आहे की, त्यांनी केवळ शहीदांची प्रशंसा न करता त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची काळीजी घ्यावी. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन मुख्यतः सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचं कल्याण, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी आहे. हा दिवस युद्धात शहीद आणि जखमी सैनिकांच्या पुर्वसनासाठी साजरा केला जातो. याचं महत्त्व आहे कारण हे युद्धात जखमी सैनिक, वीर स्त्रिया आणि शहीदांच्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या आपल्या कर्तव्याची आठवण करुन देतो. हा निधी शासनातर्फे पुढील गोष्टींसाठी वापरला जातो कल्याणकारी निधीच्या एकूण ४४ प्रकारच्या योजनांसाठी आर्थिक मदत. या समितीचे अध्यक्ष माजी सैनिक कल्याण मंत्री असतात. विशेष निधीमधून सैनिकी मुलां/मुलींचे वसतीगृहे व माजी सैनिक विश्रामगृहे माफक दरात चालविली जातात. सशस्त्र सेना दल देशाचे रक्षण करण्यास सदैव सुसज्ज असते त्याचप्रमाणे नैसर्गिक तथा मानवनिर्मित आपत्तीच्यावेळी देखील बहुमोल कामगिरी करीत असते. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, यासाठी त्याचप्रमाणे युद्धात अपंगत्व आलेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. माजी सैनिकांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वजदिन निधीपैकी बहुतांशी रक्कम उपलब्ध करून दिली जाते.