मुंबई : जागतिक कंपवात दिन (वल्र्ड पार्किन्सन्स डे) दरवर्षी ११ एप्रिलला साजरा केला जातो. कंपवात हा मज्जासंस्थेला परिणाम करणारा विकार असून, त्यामुळे हालचालींवर परिणाम होतो. मेंदुविकारतज्ज्ञांच्या मतानुसार एक किंवा त्यापेक्षा अधिक अवयवांना कंप सुटणे, अवयवाची सहज हालचाल करता न येणे अथवा त्यात कडकपणा येणे ही कंपवाताची पूर्वलक्षणे असू शकतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नये. मेंदूतील डोपामिन हे चेतारज्जूद्वारे मेंदूला संदेश पोहोचणावारे रासायनिक द्रव्य घटू लागल्याने कंपवाताची ही पूर्वलक्षणे दिसू लागतात. कंपवाताचे निदान जर वेळीच झाले नाही तर बरीच गुंतागुंत होऊन आरोग्य बिघडते. त्यामुळे जिवालाही धोका संभवतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कंपवाताच्या रुग्णांना विचार, स्मरण, निर्णय घेणे, समस्यापूर्ततेत अडचणी येतात. विस्मरण होऊ लागते. शब्द सुचत नाहीत. निर्णयक्षमतेवर परिणाम होतो. लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. कंपवात स्नायूंवर परिणाम करत असल्याने अन्न गिळताना त्रास होतो. जर दुर्लक्ष केले तर अन्न अजिबात गिळता येत नाही. या विकाराला ‘डिस्फाजिया’ म्हणतात. तसेच आवाज बदलतो. सतत कफाचा त्रास होतो. प्रसंगी गुदमरण्याचा त्रास होतो. हा विकार निद्राविकारांना आमंत्रण देतो. श्वासोच्छवासात अडथळे आल्याने खंडित निद्रा (स्लिप अॅप्निआ), दिवसा झोप येणे, भीतीदायक स्वप्ने पडणे, निद्रानाश किंवा अतिनिद्रा असे दोन्ही त्रास होतात. दीर्घकाळ कंपवाताने वर्तणुकीत टोकाचे बदल घडतात. ते निराशाग्रस्त होतात. चिंताग्रस्त, तणावग्रस्त, चिडचिडेपणा, हिंसक, अस्वस्थ, संयमाचा अभाव, आत्मविश्वासाची कमतरता अशीही लक्षणे त्यांच्यात आढळतात. डोपामिन स्तर घटल्याने त्यांच्यातील कामभावनाही संपते. गंध, दृष्टी मंदावणे, हालचाली करताना वेदना, तोल जाणे, बद्धकोष्ट, मूत्रविसर्जनातही अडथळे येतात. बहुतांश रुग्णांना स्मृतिभ्रंश, भास व भ्रमही होतात. सध्या तरी हा विकार पूर्णपणे बरा होऊ शकेल, असा वैद्यकीय उपचार उपलब्ध नाही. त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याची तीव्रता वाढते. वरील लक्षणे दिसू लागल्यावर डॉक्टरांच्या नियमित संपर्कात राहून त्यांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य उपायांनी या विकाराचे व्यवस्थापन करावे. या विकारासह जगताना जीवनाचा दर्जा सुधारणे हे उद्दिष्ट असले पाहिजे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.