‘‘अशोकस्य त्वचा रक्तप्रदरस्य विनाशिनी।’’ (शोढल:) समस्त भारतवासीयांना अशोक वृक्षाचा इतिहास लहानपणापासूनच माहीत असतो. लंकाधिपती श्री रावणाने जवळपास एक वर्ष; श्रीलंकेमध्ये सीतामाईला अशोक वृक्षाच्या खाली ठेवले होते, अशी कथा आहे. त्यामुळे तिची रामापासून ताटातूट झाल्याने; विरहव्यथेतील शोकाची बाधा तिला झाली नाही. त्यामुळेच प्राचीन काळापासून विविध वृक्ष-वनस्पती उद्यानांत अशोक वृक्षाला खूप अग्रक्रमाचे स्थान असते. आपल्या समाजात एक असा विश्वास आहे की; चैत्र शुद्ध अष्टमीला अशोक वृक्षाची कोवळी पाने श्री भगवानांची पूजा करून खाल्ल्यास वर्षभर कसलाच शोक करावा लागत नाही. असा निर्देष तुलसीरामायणात आहे. ‘‘सुनहु विनय मम् विटप अशोका। सत्य नाम करू हरू मम लोका॥’’ - रामायण अशोक वृक्षाला रक्तपल्लव, हेमपुष्प, अंगणाप्रिय अशा विविध नावांनी ओळखतात. खूप बहरत आलेल्या अशोकाची पाने देखणी लाल रंगाची असतात, म्हणून रक्तपल्लव हे नाव आहे. मायबहिणींच्या मासिक पाळीच्या विकारात अशोक सालीचा उपयोग खात्रीने होतो, म्हणून त्याला अंगणाप्रिय असे नाव आहे. दिवसेंदिवस खऱ्या अशोकाचे वृक्ष दुर्मीळ होत चाललेले आहेत. त्यामुळे औषधी वनस्पतींचा बाजार करणारे व्यापारी दणकून खोटय़ा अशोकाची- शोभेच्या अशोकाची साल आयुर्वेदीय औषधी निर्माण करणाऱ्यांच्या गळ्यात मारत असतात. भारतात पूर्व व मध्य हिमालय, बंगाल, ब्रह्मदेशातील आराकान पर्वत, दक्षिण भारतातील मलबार, उत्तर भारतातील कुमाऊन प्रदेशात दोन हजार फूट उंचीवर, तसेच महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात खऱ्या अशोकाचे वृक्ष बघावयास मिळतात. तुम्हा-आम्हाला विविध शहरांतील मोठय़ा रस्त्यांच्या कडेला खूप उंच वाढलेल्या खोटय़ा अशोक वृक्षाचे दर्शन होत असते. याच खोटय़ा अशोकाला काही जण देवदार असेही संबोधतात. त्याच्या सुखद छायेकरिता याची जाणीवपूर्वक लागवड केली जाते. याला येणारी फुले अशोक वृक्षाच्या फुलांसारखी आकर्षक अजिबात नसतात. खऱ्या अशोकाच्या जून खोडातून पांढऱ्या रंगाचा डिंक पावसाळ्यानंतर साल फोडून येत असतो. वाऱ्यामुळे तो नंतर लाल रंगाचा होतो. अशोक वृक्षाला वसंत ऋ तूत जी फुले शोभा देतात, ती लालचुटूक वर्णाची पावसाळ्यापर्यंत टिकतात. खऱ्या अशोकाची साल बाहेरून पांढरट, धूसर, स्पर्शाने खरखरीत आणि आतून लाल रंगाची व तुरट चवीची असते. ही साल पौष किंवा माघ महिन्यात गोळा करून, सुकवून छायेमध्ये ठेवल्यास दीर्घकाळ उत्तम गुण देते. अशोकाची साल प्रामुख्याने तुरट आणि किंचित कडसर चवीची, थंड गुणाची आहे. शरीराचा वर्ण उजळण्याचे कार्य, ती रक्तसंग्राहक असल्यामुळे खात्रीने करते. स्त्रियांच्या रक्तप्रदर विकाराकरिता सालीपासून तयार केलेले ‘अशोकारिष्ट’ सर्व भारतभर अग्रक्रमाने वापरात आहे. बाळंतपणानंतर गर्भाशयाला शैथिल्य येते. ते दूर व्हावे म्हणून बाळंतकाढय़ात अशोकारिष्ट वापरले जाते. भारतात महिलांच्या विविध विकारांत आधुनिक वैद्यकाची अनेकानेक औषधे घेतली जात असतील तरी, अशोकारिष्ट व अशोकघृताचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो.