|| वैद्य विक्रांत जाधव मधुमेही व्यक्तींनी गहू, नाचणी यांचे सेवन यथेच्छ करावे. उपवासाची भगर, वरीचे तांदूळही काही वेळा खायला हरकत नाही. (पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी मात्र वरीचे तांदूळ खावे.) सातूचे पीठ व त्याचे पदार्थ मधुमेहींना चांगले बल प्राप्त करून देतात. ज्वारीची भाकरी मधुमेही व्यक्तींची रुची वाढवते. बांबूच्या बियांचा भात सेवन करण्याचा आग्रह शास्त्रकारांनी केलेला दिसतो. द्विदल धान्यामध्ये मुगाची डाळ आणि त्याचे पदार्थ, मसूर डाळ, मटकी, कुळीथ आणि त्याची डाळ खाण्याचा आग्रह केला जातो. कुळथाचे पिठले मधुमेहींना अधिक गुणकारी ठरते, तर हरभऱ्याची आणि मटकीची डाळसुद्धा लाभदायक ठरते; परंतु ज्या मधुमेहींना जडत्व, वाताचा त्रास जास्त प्रमाणात आहे, त्यांनी या दोन डाळी सेवन न केलेल्या उत्तम. शास्त्राने मधुमेहींना ताक लाभकारी सांगितले असून दही मात्र वज्र्य आहे. त्यातही दह्यावर येणारे पाणी सेवन करायला हरकत नाही. या पाण्याने बल मिळते आणि थकवा दूर होतो. मधुमेही व्यक्तींनी आहारात लसूण, आले, हळद, कांदा यांचे प्रमाण जास्त ठेवल्यास लाभदायी ठरते. ओली हळद व आले यांचे एकत्रित लोणचे नियमित आहारात ठेवल्यास फायदा होतो. भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा, पानाफुलांची भाजी, कारल्याची भाजी, पडवळ, करटुली, केळ्याचे नवीन ताजे फूल, घोळ यांची भाजी आहारात जास्त प्रमाणात ठेवावी. मधुमेह कमी करणारे आणि शरीरस्थ अग्नी वाढवणारे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. त्याकरिता पदार्थ तयार करताना लवंग, वेलची, तीळ, तमालपत्र, खसखस यांचा उपयोग अधिक करण्याचा आग्रह शास्त्र करते. कडू, तुरट रसांच्या पदार्थाचे सेवन मधुमेहींसाठी उपयुक्त ठरते. कमलकंद, जांभूळ हे सेवनात अधिक असावे. कडू चवीच्या पदार्थाचे सेवन अधिकाधिक केल्यास मधुमेह नियंत्रणात तर राहतोच, शिवाय शरीरात इतर उपद्रव निर्माण न करण्याचे सामथ्र्य मधुमेहींना प्राप्त होते. मांसाहार आणि फळे कोंबडा, कबूतर, बकरा यांचे मांस मधुमेहींनी सेवन करण्यास हरकत नाही. या प्राण्यांचे सूप, भाजलेले मांस सेवन केल्यास अधिक फायदा होतो. ते तयार करताना आले, लसूण, हळद, तमालपत्र, लवंग, वेलची यांचा वापर लाभदायक ठरतो. मधुमेहींना फळे तशी वज्र्य आहेत; परंतु मूळव्याधी लक्षणे कमी होण्यासाठी उपयोगी जांभूळ मात्र सर्वज्ञात आहेच. जांभळाने मधुमेहातील लक्षणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. उंबराच्या फळांचे सेवन मधुमेहींना व्याधी संप्राप्ती कमी करणारे आहे. उंबराच्या फळांचे लोणचे अथवा इतर पदार्थ गुणकारी ठरतात. मधुमेही व्यक्तींनी कच्ची केळी खाल्ल्यास फायदा होतो. विशेषत: ज्या मधुमेहींना मलावष्टंभाचा त्रास आहे, त्यांनी उपाशीपोटी कच्ची केळी सेवन करावीत. त्रास कमी होतो. कवठाची चटणी रुची वाढवते. तर खजूर खाण्याचा सल्ला आयुर्वेदाने दिला आहे. यामध्ये आजवा नावाचा खजूर प्रकार आखाती देशांमध्ये मधुमेहासाठी आवर्जून खाल्ला जातो. यासोबत माज्दूल हाही खजूर प्रकार उपयोगी ठरतो. सतत गरम पाणी पिण्याचा सल्ला शास्त्राने मधुमेही व्यक्तींनी दिला असून पाण्यात नागरमोथा, दारूहळद, सुंठ, त्रिफळा टाकल्यास ते अत्यंत गुणकारी ठरते. (या पाण्यातील योग्य द्रव्यांची निवड निष्णात वैद्याकडून करून घ्यावी.) मधुमेही व्यक्तींनी आहारात आले, लसणाचा वापर अधिक प्रमाणात केल्यास गुणकारी ठरते. ओल्या हळदीचे व आल्याचे लोणचे रुची वाढवणारे आणि त्रास कमी करणारे ठरते. आयुर्वेद शास्त्रकारांनी ‘सलाड’पैकी गाजर, मुळा, कांदा या तीनच पदार्थाना परवानगी दिली असून काकडी, टोमॅटो वज्र्य केले आहेत, ही विशेष बाब ध्यानात घ्यावी. कमलकंद व नवलकोल ही कंदमुळे मधुमेही व्यक्तींनी सेवन करावीत. लवंग, वेलची, तीळ यांचे प्रमाण जास्त ठेवावे. शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तिळाच्या कुटाचा वापर केल्यास जास्त फायदा होतो. तमालपत्राचा वापर केल्यास मधुमेहींना कफाचा त्रास होत नाही. मुखदरुगधी घालविण्यासाठी वेलची, लवंग चघळत राहिल्यास दुहेरी लाभ होतो.