भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने या वर्षांपासून धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी) हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून पाळण्याचे निश्चित केले असून मधुमेह आणि आयुर्वेद या विषयावर या वर्षी देशभर जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मधुमेहासंबंधी आयुर्वेदीय दृष्टीने माहिती देणारा हा लेख..

गेल्या अनेक वर्षांपासून मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये मधुमेहाचा रोगी प्रत्येक वैद्यक शाखेतील उपचार करून घेण्याच्या मागे लागतो. आयुर्वेदात काही औषध आहे का, असे विचारत अनेक मधुमेहाचे रुग्ण वैद्यांकडे येतात. ते भलीमोठी तपासण्यांची जंत्री घेऊनच. अमुक महिन्यांपासून रक्तातील साखर एवढी आहे. त्याचप्रमाणे लघवीवाटे या प्रमाणात साखर जाते आहे आदी.. मग आयुर्वेदाची भूमिका नेमकी काय? मधुमेहासंदर्भात अर्थातच आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये इतर रोगांप्रमाणे मधुमेहाचेही सविस्तर वर्णन सापडते. त्याची कारणे, लक्षणे तसेच चिकित्सेबद्दलचे केलेले मार्गदर्शन या ठिकाणी थोडक्यात बघणे उचित ठरेल.

मूळात ‘मधुमेह’ हा रोग मत्राशी संबंधित असा आयुर्वेदाने वर्णिलेला आहे. मूत्राला या रोगामध्ये माधुर्य येते आणि मूत्रप्रवृत्ती अनेकवेळा आणि मोठय़ा प्रमाणात होते. प्रमेह या रोगात मूत्राच्या स्वरूपात आणि प्रमाणात वाढ होते. तसेच मूत्राच्या स्वरूपात बदल होतो. मूत्रप्रवृत्ती जी स्वच्छ हवी, ती होत नाही. निरनिराळ्या स्वरूपात ती होते आणि त्या स्वरूपानुसार प्रमेहाचे एकूण २० प्रकार आयुर्वेदाने वर्णन केले आहेत. या प्रकारात वात, पित्त आणि कफ या तीन दोषांनुसार प्रकार आहेत.

कफदोषामुळे होणारे दहा प्रकार

पित्तदोषामुळे होणारे सहा प्रकार

आणि वातदोषामुळे होणारे चार प्रकार

मधुमेह हा प्रकार वातदोषामुळे होणाऱ्या प्रमेहाच्या चार प्रकारांपैकी एक आहे.

प्रमेहाची कारणे- प्रमेह या रोगाची कारणे आयुर्वेद ग्रंथांमध्ये वर्णन केली आहेत. मधुमेहाला तीच लागू होतात. ही कारणे खालीलप्रमाणे-

खूप वेळ आराम करणे, झोप घेणे.

अधिक खाण्याची सवय असणे.

दह्य़ासारखे स्राव वाढवणारे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे.

थंड प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचे मांस खाणे.

गुळापासून बनवलेले विविध पदार्थ जास्त प्रमाणात खाणे.

अतिथंड, अतिस्निग्ध असे पदार्थ खाणे तसेच त्यांचे प्रमाणही जास्त असणे.

कफदोष वाढवणाऱ्या इतरही पदार्थाचे जास्त सेवन.

ही प्रमेहाची सांगितलेली कारणे आहेत. मधुमेही रोग्यांची नीट विचारपूस केली तर वर वर्णिलेल्या कारणांपैकी काहीतरी कारण त्या रोग्यांमध्ये दिसून येते. तेव्हा आहारा-विहारामधील बेशिस्त, अनियमितता हे बऱ्याच आजारांना आमंत्रण ठरते हे पुन्हा एकदा या निमिताने लक्षात घ्यावयास हवे.

प्रमेह  कसा होतो?

वर सांगितलेली कारणे घडल्यामुळे शरीरामध्ये ‘विकृत’ कफदोष निर्माण होतो. त्याला ‘क्लेद’ अशी संज्ञा आयुर्वेदाने दिली आहे. या क्लेदामुळे शरीरामध्ये जडत्व येते. कोणत्याही कामांत उत्साह वाटेनासा होतो. हा क्लेद मूत्रवहन संस्थेमध्ये जाऊन त्या ठिकाणी विकृती निर्माण करतो. आणि विविध प्रकारचे मेह उत्पन्न होतात. त्यापैकी एक मधुमेह होय. मधुमेही व्यक्तींमध्ये क्लेद वाढल्याने हळूहळू धातू शिथिल व्हायला लागतात. मूत्राला माधुर्य येते. पुढे पुढे तर शरीरातील सातही धातूंचे ‘ओज’ शरीराबाहेर जाऊ  लागते आणि म्हणूनच मधुमेही व्यक्ती चिडचिड करताना आढळतात. काहींमध्ये एखाद्या विषयीची भीती निर्माण होते.

ही लक्षणे ‘ओज’ कमी झाल्याने होतात. या रोगात एकूणच शरीराचे ‘माधुर्य’ वाढते. बऱ्याच रोग्यांमध्ये तळपाय, तळहाताची आग होते. काही मधुमेहीच्या हातपायाला मुंग्या येतात, ते बधिर होतात अशी तक्रार घेऊन येतात.

मधुमेही व्यक्तींमध्ये दोन प्रकारच्या व्यक्ती आढळतात. काही व्यक्ती स्थूल मधुमेही असतात. त्यांच्यामध्ये धातूंची विकृत स्वरूपात वृद्धी आणि शैथिल्य आढळते. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेही व्यक्ती कृश (बारीक) असतात. या व्यक्तींमध्ये वातदोषाच्या आधिक्यामुळे धातू क्षीण होत जातात. मधुमेही व्यक्तींमध्ये दिसणाऱ्या लक्षणांमध्ये वारंवार मूत्रप्रवृत्तीला जाणे, अधिक तहान लागणे, अधिक भूक लागणे, घाम अधिक येणे आदींचा समावेश होतो. मधुमेहाचे निदान करताना साखरेचे रक्तातील व मूत्रातील प्रमाण पाहात असतानाच इतरही लक्षणाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.

मधुमेहावर आयुर्वेदाने चिकित्सा सांगितलेली आहे. विविध नैसर्गिक घटकांचा उपयोग करून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास आयुर्वेदशास्त्र सांगते. केवळ रक्तातील साखर कमी करणे हा या चिकित्सेचा उद्देश नाही तर त्याचबरोबर शरीराच्या झिजत चाललेल्या धातूघटकांची झीज थांबवून त्यांचे सारात्व वाढवणे हादेखील चिकित्सेचा उद्देश आहे. आवळा आणि हळद ही दोन औषधे मधुमेहात श्रेष्ठ आहेत, असे ‘वाग्भट’ या ग्रंथकाराने म्हटले आहे. एकूणच प्रमेहाच्या सर्व प्रकारांवर या औषधांचा चांगला परिणाम होतो. या दोन औषधांचे चूर्ण प्रकृतीनुसार वैद्यकीय सल्ल्याने योग्य प्रमाणात घेतल्यास फायदा होतो.

शिलाजीताचाही मधुमेहात काही प्रमाणात उपयोग होतो. मधुमेहामध्ये प्रामुख्याने कडू चवीच्या वनस्पतींचा उपयोग केला जातो. शरीरातील माधुर्य यामुळे काही प्रमाणात कमी होते. यामध्ये गुळवेल, गुडमार, काडे चिराईत, मेथी-बीज, जांभूळ- बीज आदी अनेक द्रव्यांचा समावेश होतो. मात्र त्या व्यक्तीस कोणते द्रव्य चिकित्सेसाठी वापरायचे हे मात्र त्या व्यक्तीची तपासणी करून ठरवावे लागते. केवळ ही सर्व द्रव्ये एकत्र करून ती कुणाही मधुमेही व्यक्तीने वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेणे हिताचे नाही.

याखेरीज खैर व सुपारी यांचा काढा मधुमेही रुग्णांना प्रशस्त सांगितलेला आहे. प्रमेह गजकेसरी नावाचे एक औषधही मधुमेहासाठी सांगितलेले आहे.

या औषधाबरोबरच गोड पदार्थाच्या खाण्यावर आपले संपूर्ण नियंत्रण असणे आवश्यक असते.