डॉ. गौरव नेरकर, बालरोगतज्ज्ञ. मुलांच्या वाढीत सकस आणि संपूर्ण आहार महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. वाढत्या वयाच्या मुलांची मूलभूत गरज या माध्यमातून पूर्ण होते. आयुष्यभरातल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा पायाच लहान वयात पडत असतो, त्यामुळे वाढत्या वयात मिळणाऱ्या आहाराला नितांत महत्त्व आहे. विशेषत: बाळ जन्मल्यापासून ते दोन वर्षांचे होईपर्यंत पोषक आहार द्यायला हवा. यासाठी वयोमानानुसार बालकांना काय आहार दिला पाहिजे याची माहिती गरजेची आहे. बाळाच्या वयानुसार आहाराचे वर्गीकरण.. पहिल्या टप्प्यात जन्मापासून सहा महिन्यापर्यंतच्या कालावधीत आईचे दूध (अंगावरील स्तनपान) द्यायचे असते. मातेला दूध नसल्यास तसेच काही अपरिहार्य कारणास्तव डॉक्टर पावडरचे दूध सुरू करण्याचा सल्ला देऊ शकतात. मात्र ते कसे, किती आणि कधी घ्यायचे हे डॉक्टरांना विचारूनच घ्यावे. या काळात बाळाला गरजेनुसार पाजावे. बाळाला दिवसातून किमान सहा ते सात वेळा लघवी होत असेल आणि बाळाचे वजन योग्य प्रमाणात वाढत असेल तर बाळाला पुरेसे दूध मिळत आहे असे समजावे. दुसऱ्या टप्पात सहा ते आठ महिने या कालावधीत बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त वरच्या अन्नाची गरज भासते. अशा वेळी पालकांवर नेहमीच सल्ल्यांचा मारा होतो. पालक या सल्ल्याने गोंधळून जातात. अशा स्थितीत बाळांना फळे देण्याची सुरुवात करावी. पिकलेले केले चमच्याने बारीक करून त्यात दूध (आईचे असल्यास उत्तम) मिसळून एक ते दोन घासापासून फळ आहाराची सुरुवात करावी. त्यानंतर निरनिराळी फळे वापरून दर आठवडय़ाला आहार वाढवावा. मात्र या काळात बाळाला फळांची मिळणारी चव, त्याची आवडनिवड पाहता खाऊ घालताना संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. यानंतरच्या काळात शिजवलेला मऊ भात दूध टाकून चमच्याने खाऊ घालावा. भात आणि मुगडाळीची खिचडी द्यावी, तसेच गाजर, भोपळा, बीट आणि टोमॅटो मिसळून बनवलेले सूप चवीसाठी देता येते. अन्नपदार्थाच्या या गर्दीत पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बाळाला तांदळाचे पाणी, डाळीचे पाणी देऊ नका. त्याने बाळाचे पोट तर भरते मात्र पोषकता मिळत नाही. एकदा का बाळ वरील गोष्टी घ्यायला लागला की त्यानंतर अतिशय पोषक मिश्रण देणे गरजेचे ठरते. तांदूळ, गहू, नाचणी, मूगडाळ सम प्रमाणात घेऊन एकत्र करून भाजून, त्यानंतर दळून घ्यावे आणि हवाबंद डब्यात साठवून ठेवावे. याचा वापर दुधासोबत खीर बनवताना करता येतो, तसेच या मिश्रणात दूध साखर आणि तूप टाकून देता येते. आठ महिन्यानंतर बाळाच्या आहारात वाफवलेल्या पालेभाज्या वापराव्यात. जेणेकरून विविध चवींशी त्याचा परिचय होईल. पचनशक्ती सुधारत असल्याने थोडे घट्ट पदार्थ देण्यास हरकत नाही. अन्न जास्त बारीक करू नये. चपाती किंव पराठा वरणात बुडवून बाळाला देऊ शकता. डाळ-भात, ढोकळा, डोसा, इडली, दहीभात, उपमा देता येईल. दही, ताक, पनीर यांचा आहारात समावेश करावा. साधारण दीड वर्ष ते तीन वर्षे वयाच्या मुलांमध्ये नकारात्मक भूमिका आढळते म्हणजे तुम्हाला जे करावेसे वाटत असेल, ते नेमके त्याच्या विरोधात वागते. अशा वेळी खाण्याची सक्ती करू नका. बाळाला त्याच्या हाताने खायला शिकवा. खाण्याच्या वेळा ठरवणे अवघड असले तरी बऱ्याच बालकांना एका विशिष्ट वेळेस भूक लागते ती वेळ ओळखून मगच खायला द्या. बाळाला वरच्या दुधाची सक्ती करू नका. दूध घेत नसल्यास दुग्धजन्य पदार्थ द्यावेत जेणेकरून आवश्यक पोषणतत्वे मिळतील. उठल्यावर दुधाचा आग्रह न धरता साधे पाणी दिल्यास उत्तम. बाळाने खावे म्हणून त्याला चॉकलेट, चिप्सची लाच देऊ नका. लक्षात ठेवा बालके या वयात अनुकरण करत असतात, जर पालकांच्याच सवयी खराब असतील तर मुले कुठून शिकणार? पालकांनी एवढे लक्षात ठेवावे जेणेकरून बालक आनंदाने जेवण करू शकेल. जेवताना टीव्हीसमोर बसून जेवण कटाक्षाने टाळा. जेवताना प्रसन्न वातावरण निर्माण करून जेवल्यास आरोग्यदेवता प्रसन्न राहील. एक वर्षांनंतर आईच्या दुधासोबत आपण साधारणत: जो स्वयंपाक घरात करतो तो आपण देऊ शकतो. मात्र खूप कडक वस्तू देऊ नयेत. साधारणत: आईचे दूध आणि वरचा आहार याचे प्रमाण.. * ६ महिन्यापर्यंत - १०० टक्के आईचे दूध, * ६ ते ९ महिने- ३० टक्के वरचा आहार - ७० टक्के आईचे दूध, * ९ ते १२ महिने- ५० टक्के वरचा आहार ५० टक्केआईचे दूध , * १ वर्षांनंतर- ७०टक्के वरचा आहार आणि ३०टक्के आईचे दूध , * २ वर्षांनंतर- १०० टक्केवरचा आहार असे ठेवावे