‘‘यव: कषायो मधुरो हिमश्च कटुविपा के कफपित्तहारी। व्रणेषु पथ्यास्तिलवच्च नित्यं प्रबद्धमूत्रो बहुवातवर्चा:।। स्थर्याग्निमेधास्वरवर्णकृच्च सपिच्छिल: स्थूलविलेखनश्च। मेदोमरूतृड् हरणोऽ तिरूक्ष: प्रसादन: शोणितपित्तयोश्च।।’’ (सु. सू. अ. ४६) एक मधुमेही रुग्ण एका ज्ञानी वैद्याकडे गेला असता, या वैद्यांनी रुग्णाला आपल्या आहारात गव्हाऐवजी सातूचा वापर करण्याचा सल्ला दिला. एक दिवस असाच गोड सल्ला मी माझ्या एका रुग्णमित्राला दिला. दोन दिवसांनी ते रुग्ण मला भेटले आणि त्यांनी माझ्यापुढे सातूची भाकरी ठेवून ‘चव बघा’, असे सुचवले. मी एक तुकडा खाऊन पाहिला. एकदम बेचव. पुन्हा मी कोणत्याही रुग्णाला गहू, भाताऐवजी सातूची भाकरी खा, असे सांगितले नाही. काही जण सकाळी सत्तूची खीर घेतात. या सत्तूचा व सातूचा काहीही संबंध नाही. सत्तूचे पीठ म्हणजे गहू, हरबरा डाळे असे भाजून केलेले मिश्रण असते. सातू हे धान्य एक दिव्य औषध आहे. यव (संस्कृत), जौ (हिंदी), जब (बंगाली), नस (भूतान) आणि बाली (इंग्रजी) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जवाचे सत्त्व एकाच वेळी पाचक आणि पोषक आहे. हे गव्हाच्या सत्त्वापेक्षा सहज पचते. हे सत्त्व रोज खाल्ल्याने मधुमेहातील साखर नाहीशी होते, कारण या सत्त्वाच्या साहाय्याने धान्याहार अंगी पडतो आणि धान्याहारापासून रक्त बनेपर्यंत ज्या विनिमयक्रिया होत असतात, त्या सुधारतात. पचनक्रिया नीट होत नसल्यास आणि फुप्फुसाच्या रोगात अशक्तता आल्यास जचावे सत्त्व देतात. हे लहान मात्रेतच द्यावे. कारण मात्रा मोठी झाल्यास जुलाब होऊ लागतात. पू वाहत असणाऱ्या रोगात हे फार उपयोगी पडते. जव रात्री गरम पाण्यात भिजत ठेवून सकाळी त्यात दूध-साखर घालून मंदाग्नीवर उकळावे. अशा रीतीने केलेली जवाची पेज थोडेसे मीठ टाकू प्यावयास द्यावी. हाता-पायांच्या काडय़ा झालेल्या मुलास तर याने उत्तम पुष्टी येते. जवाचे रोप बी येण्याच्या सुमारास कुपटून आणि सुकवून जाळतात. ही राख तिच्यापासून काढलेला क्षर ज्यास जवखार म्हणतात, तो या दोन्ही औषधांत वापरतात. यवक्षार दिव्य औषध आहे. जेवणापूर्वी दिले असता हे दीपन आहे आणि आमाशयाच्या श्लेष्मल त्वचेतील मज्जातंतूपासून होणारी पीडा याने कमी होते. या दोन गुणांमुळे कुपचन, आमाशयांतील आम्लता कमी होते आणि तेथील कफ विरघळून जातो. रक्तात मिसळल्यानंतर त्यातील रंजित कणांचा रंग आणि संख्या वाढवतो. रक्तशुद्धीकरिता जवखार हिराकस व सुगंधी पदार्थाबरोबर देतात. जवखार मूत्रपिंडास उत्तेजक आहे, म्हणून लघवीचे प्रमाण वाढते. मूत्रपिंडाच्या शोथापासून लघवीचे प्रमाण कमी होते, तेव्हा जवखार वापरतात. त्याने लघवीची जळजळ कमी होते. जवखार त्वचेस उत्तेजक आहे. म्हणून घाम येण्यासाठी ज्वरात तो लिंबूरसाबरोबर घ्यावा. जवखाराने कफ सुटतो, कफ पातळ होतो आणि श्वासमार्गाचा शोथ कमी होतो. म्हणून श्वासमार्गाच्या नवीन शोथात जेव्हा सुका खोकला, ताप व घुसमट असून लघवीचे प्रमाण कमी असते, तेव्हा जवखार देतात. जवखारामुळे पित्त पातळ होते. पित्त वाहणाऱ्या नलिकेची सूज कमी होते, म्हणून कावीळ, यकृतशोथ वगैर विकारात तो देतात. जवखाार आम्लतानाशक, दीपन, रक्तशुद्धकर, पांडुनाशक, मृदू स्वभावी, कफशामक आणि पित्तक्रिया सुधारणारा आहे. फुप्फुसाच्या विकारात सातूची राखच वापरावी. ‘‘गुल्महृदू हणीपाण्डुप्लीहानाहगलामयान्। श्वासार्श:कफकासांश्च शमयेद्यवशूकज:।।’’ (चरकसंहिता सूत्र १४८) वर सांगितलेल्या श्लोकाप्रमाणे जवखराचा उपयोग विविध कफप्रधान रोगांत होतो. ‘‘स्वादुर्गुरूश्च गोधूमो वातजिद्वातकृद्यव:।’’ गहू व सातू दोन्ही मधूर रसाचे आणि जड असूनही एक वातघ्न आणि दुसरा वातकारक आहे. पूर्वी मधुमेही रुग्ण दिवसात किमान दोन वेळा आवर्जून ‘बार्ली वॉटर’ घेत असे. आता विविध तज्ज्ञ डॉक्टर आपल्या रुग्णमित्रांना बार्ली वॉटर घ्यावयाचा सल्ला का देत नाहीत हे मोठेच कोडे आहे. ह. प. औषधालयाच्या पाचक चूर्ण, चंद्रप्रभा, कठपुतली, गोक्षुरक्वाथ, शंघवटी आणि महाविषगर्भ तेलात जवखाराचा सहभाग आहे. - वैद्य प. य. वैद्य खडीवाले