रात्रीच्या जेवणानंतरची शतपावली हा जुन्या काळातील लोकांच्या दिनक्रमाचाच एक भाग होता. आपल्या आजी-आजोबांना विचारून पाहा! अनेकांना ही शतपावली केल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखेच वाटत नाही. चालण्याच्या व्यायामाचे फायदे आपण यापूर्वी पाहिले आहेतच. पण जेवणानंतरच्या चालण्याचे फायदे काय, शतपावली किती वेळ आणि कशी केली तर चांगले ते पाहूया चालण्याचा व्यायाम अगदी पूर्वीपासून फायदेशीर समजला जातो. जेवणानंतरचे चालणे अर्थात शतपावली हा घाम गाळून करण्याचा व्यायाम नव्हे, पण तो पचनासाठी चांगला असे सांगितले जाते. शतपावली दोन्ही जेवणांनंतर केली तरी चालते. पण रात्रीच्या जेवणानंतर केलेले अधिक चांगले. एरवी आपण जेव्हा व्यायामासाठी चालतो तेव्हा ‘ब्रिस्क वॉक’ला म्हणजे भरभर चालण्यावर भर दिला जातो. शतपावली मात्र भरभर चालून करायची नसते. जेवल्यानंतर फार वेगाने चालल्यास पचन कमी होईल. सावकाश आणि जास्तीतजास्त २० ते २५ मिनिटेच शतपावली करून भागते. जेवणाचे समाधान अशा सावकाश केलेल्या शतपावलीतून मिळते. शतपावलीचे काही फायदे * जेवणानंतर व्यायाम केला की शरीरात ‘एंडॉर्फिन’ नामक द्रव्यांचे स्रवण होते. या स्रवणामुळे समाधानाची भावना निर्माण होते. * चालायला सुरुवात केली की भरलेले पोट थोडे हलके वाटू लागते. याला ‘गॅस्ट्रिक एम्प्टिंग’ असे म्हणतात. यात खाल्लेले अन्न आतडय़ांमध्ये जाण्यास चालना मिळते आणि पचनक्रिया लवकर होते. * शतपावलीमुळे ढेकर येणे, गॅसेस होणे आणि अॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते. * वजन कमी करण्यामध्येही शतपावलीची मदत होते, कारण अन्न शरीरात शोषले जात असतानाच एकीकडे हलका व्यायाम होत असतो. हे चालणे हलके असावे हे पुन्हा लक्षात घ्या. आधी सांगितल्याप्रमाणे शतपावली घाम गाळून करण्यासाठी नव्हे. * रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. *मधुमेही व्यक्तींची ‘पोस्ट प्रँडल शुगर’ म्हणजे जेवणानंतर मोजली जाणारी साखर शतपावलीमुळे चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहू शकते. त्यामुळे मधुमेह्य़ांनी आपल्या डॉक्टरांशी बोलून शतपावलीचा साधा हलका व्यायाम सुरू करता येईल. पण इन्शुलिन नेहमीप्रमाणे घेतले असेल व कमी खाल्ले असेल तर मात्र एकदम शतपावली करताना चक्कर येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या प्रकृतीला काय झेपते याचा विचार करणे गरजेचे. डॉ. अभिजीत जोशी - dr.abhijit@gmail.com