|| वैद्य विक्रांत जाधव पावसाची पहिली सर अंगावर पडल्यावर, थंड पाणी किंवा थंड हवेशी संपर्क आल्यानंतर काही जणांच्या अंगावर पित्ताच्या गांधी उठतात. विशिष्ट प्रकारच्या स्थितीनंतर त्वचेवर येणाऱ्या या गांधींचे रूपांतर आजारामध्ये कधी होते, हेच बऱ्याचदा लक्षात येत नाही. खाजेने त्रस्त करणाऱ्या गांधी येणाच्या या आजाराला शीतपित्त असे म्हटले जाते. योग्य पद्धतीने आहार घेतल्यास हा आजार संपूर्णरीत्या बरा होण्यास मदत होते. विशेषत: शरद ऋतूच्या (ऑक्टोबर) सुरुवातीच्या काळामध्ये शीतपित्त म्हणजेच अंगावर गाठी येऊन खाज येणे, मोठे चट्टे येणे, अचानकपणे लालसर रेघा येणे असे खूप व्यक्तींमध्ये दिसून येते. काही वर्षांपूर्वी हा आजार उन्हाळ्यातून पावसाळ्यात किंवा पावसाळ्यातून हिवाळ्यात अशा ऋतूबदलाच्या कालावधी होत असे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये याचे प्रमाण वाढले असून प्रमुख त्रास देणाऱ्या आजारांमध्ये याची गणना केली जाते. याला काही जण ‘अॅलर्जी’ असेही म्हणतात. या आजाराचा संबंध अधिकरीत्या आहाराशी जोडलेला आहे. त्यामुळे या आजारासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांसोबत आहाराच्या पथ्याची जोड दिल्यास फायदेशीर असते. शीतपित्त झाल्यानंतर घ्यावयाचा आहार - शीतपित्ताचा त्रास होत असताना मुगाचे कढण, मसुराची डाळ अत्यंत गुणकारी ठरते. तुरीची डाळ, मटकीसारखी डाळसुद्धा पथ्यकर असून दोन्हींनी शीतपित्त वाढत नाही. विविध प्रकारच्या दुधाच्या पदार्थानी शीतपित्त वाढण्याची शक्यता असते. खास करून म्हशीच्या दुधाच्या सेवनाने वाढते. त्यामुळे अगदी दूध घ्यायचेच असेल तर गायीच्या दुधाचे सेवन करावे. तुपाचे सेवन मात्र शीतपित्तामध्ये आरोग्यदायी ठरते. जायफळ व केशर हे पदरथ शीतपित्ताचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी आवर्जून आहारामध्ये घ्यावीत. शीतपित्ताचा त्रास असताना जेवणात आले चावून खावे किंवा आल्याचा रस घ्यावा. कांदा कापून त्यावर केवळ मिरपूड टाकून सेवन केल्यासही चांगला गुण येतो. आल्याचे आणि ओल्या हळदीचे लोणचे शीतपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी नियमित जेवणासोबत खावे. जेवणातील काही पदार्थामध्ये चारोळी टाकून खाल्ल्यासही फायदा होतो आणि शक्तीही वाढते. बांबूच्या कोंबांचे लोणचे शीतपित्त कमी करण्यास मदत करते. भाज्यांमध्ये पडवळ, दोडकी, कारली या भाज्यांचे सेवन विशेष फायदेशीर असते. पालेभाज्यांमध्ये चाकवताची भाजी शीतपित्तामध्ये खावी. शीतपित्त असताना मधाचा उपयोग गुणकारी ठरणारा असून विशेषत: लहान मुलांना दिवसभरात ३ ते ४ वेळा केवळ मध सेवनासाठी दिल्यास गुण येतो. पाण्यात कडूलिंबाची पाने टाकून त्याचे सेवन करावे. कडू जिरे पाण्यात उकळून घेऊन ते पाणी दिवसभर सेवन केल्यासही चांगला फायदा होतो. डाळिंब, द्राक्ष, आंबा ही चवदार फळे शीतपित्ताचा त्रास कमी करण्यास मदत करतात. लिंबाचे सेवन शीतपित्तात आवर्जून करावे. (लिंबाने शीतपित्त वाढते हा अनेकांचा गैरसमज आहे) जेवताना पिण्याच्या पाण्यात केवळ लिंबू पिळून ते सेवन केल्यासही त्रास कमी होतो. शीतपित्तात सलाडमधील काकडी व उकडलेले बिट काळे मिरे टाकून घेतल्यास फायदा होतो. टरबूज हे फळदेखील या अवस्थेत उपयुक्त ठरते. शीतपित्तात ज्वारी, बाजरी, जव ही धान्ये सेवन करणे फायदेशीर असते. उपवास असल्यास वरईचा उपयोग फलदायी ठरतो. जुने तांदूळ हे अनेक व्याधींमध्ये पथ्यकर असून शीतपित्तातही विशेष पथ्यकर ठरतात. शीतपित्ताचा त्रास अधिक दिवसांपासून होत असल्यास गोमूत्राचे सेवन नियमित केल्यास चांगला फायदा होतो. शीतपित्ताच्या रुग्णाने नागवेलीची पाने केवळ कात टाकून सेवन करावीत. आंघोळीच्या पाण्यात चंदन टाकून आंघोळ केल्यास गुणकारक ठरते. आंबलेले ताकदेखील सर्व अंगाला लावल्यास फायदा होतो. शीतपित्त असताना कोमट पाण्याने अंग धुवावे. मोहोरीच्या तेलाचा अभ्यंगदेखील गुणकारी ठरतो. कोमल त्वचा असलेल्या व्यक्तींनी, मुलींनी, लहान मुलांनी दुधात हळकुंड उगाळून त्याचा लेप लावल्यास बरे वाटते. जाड त्वचेच्या व्यक्तींनी कडुलिंबाचा रस त्वचेला चोळावा. हळद व किंचित सुंठ टाकून रात्री दूध प्यावे. शीतपित्तामध्ये वातवृद्धी होत असल्याने हवा लागू न देता उन्हात बसल्यास बरे वाटते. काय खाऊ नये? - शीतपित्ताचा त्रास सुरू झाल्यास साठवून ठेवलेले पाणी, थंड पाणी पिऊ नये. सर्व प्रकारच्या नवीन धान्यांनी शीत्तपित्त वाढताना दिसते. उपवासाच्या काळामध्येही शीतपित्त वाढते. त्यासाठी उपवासात शेंगदाणा, साबुदाणा, शिंगाडा हे पदार्थ टाळणे गरजेचे आहे. दूध व दुधाच्या पदार्थानी शीतपित्ताची लक्षणे वाढताना दिसतात. म्हणून अतिशय कमी प्रमाणात त्यांचे सेवन करावे किंवा शक्य असल्यास अजिबात सेवन करू नये. दही हा पदार्थ तात्काळ शीतपित्त वाढवतो. त्यामुळे तो वज्र्य करावा. खूप व्यक्तींना आईसक्रीम सेवन केल्यावर हा त्रास वाढताना दिसून येतो. मिठाचे प्रमाण वाढल्यानेही शीतपित्त वाढते. शीतपित्ताचा त्रास बहुतेक वेळा संध्याकाळनंतर होताना दिसून येतो. अतिशय थंडे हवेचा स्पर्श झाल्यासही वाढतो. हा त्रास गारव्याने वाढणारा असला तरी अतिउष्णतेने तो कमी होत नाही. उलट उन्हात फिरल्याने शीतपित्त अधिक तीव्र होताना दिसते. पनीर, उडीद पापड, उडदाची डाळ यांचे सेवन शीतपित्त वाढते. विशेष करून मेथीचे सेवन शीतपित्ताची लक्षणे वाढवून खाज व दाह खूप वाढवतात. शीतपेटीत ठेवलेल्या भाज्या एक प्रकारे शिळ्याच असून त्यामुळेदेखील शीतपित्त वाढताना दिसून येते. वांग्याची भाजी शीतपित्ताचा त्रास खूप वाढवताना दिसून येते, मग ती कोणत्याही प्रकाराने केली तरीही त्रास होणारच. मुळा, लसूण यांच्या सेवनाने लक्षणे खूपच वाढतात. पनीर, केक, उसाचा रस, गूळ, गुळाचे पदार्थ, काकवी, आंबवलेले किंवा शिळे अन्न, पोटात दाह निर्माण करणारे पदार्थ, काकडी, चीज यानेही त्रास वाढतो. मांस, कोरडे मासे हे पदार्थ पचायला जड असल्याने सेवन करू नये. केळी, चिक्कू, सीताफळ, संत्री, अननस या फळांचे सेवन केल्याने खाज आणि दाह ही शीत पित्ताची लक्षणे वाढतात. शीतपित्त हा आजार अधिक काळ असला तरी आहारामध्ये त्यानुसार पथ्ये आणि योग्य बदल केल्यास तो नक्कीच बरा होतो.