डॉ. अरविंद काटे, श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. सोनाली लोहार, घसातज्ज्ञ विषाणूसंसर्गामुळे खोकला होत असला तरी काही वेळा ते केवळ लक्षण असते. शरीरांतर्गत होणाऱ्या त्रासाची प्रतिक्रिया खोकल्याच्या रूपाने शरीराबाहेर पडत असते. खोकला हा फार मोठा आजार नसला तरी रुग्णाला फार काळ खोकल्याचा त्रास होत असल्यास फुप्फुस किंवा त्यासंबंधित आजार उद्भवण्याची शक्यता असते. वेळीच उपचार केल्यास मोठय़ा आजारावर नियंत्रण आणता येऊ शकते. थंडी भरून येणारा ताप, दिवसाच्या ठरावीक वेळेला येणारा ताप, बारीक ताप ही जशी वेगवेगळ्या आजारांची लक्षणे असतात, त्याचप्रमाणे खोकला हेदेखील लक्षण असू शकते. दोन आठवडय़ांपेक्षा अधिक काळ खोकला राहिला की क्षयरोगाची तपासणी करून घेण्याचा सल्ला सरकारी जाहिरातींमधून अनेकांपर्यंत पोहोचला असला तरी दीर्घकाळ राहणारा खोकला हा इतरही आजारांचे लक्षण असू शकतो. आता तर प्रदूषणामुळे झालेला खोकला पटकन बरा होत नसल्याचा अनुभव येतो. प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या हातात फारसे काही नसले तरी खोकल्याचा आपल्या स्वरतारांवर आणि एकूणच प्रकृतीवर जास्त परिणाम होण्यापूर्वी उपाय करावेत. धूम्रपान : धूम्रपान करणारी व्यक्ती किंवा सिगारेटच्या धुराच्या संपर्कात (पॅसिव्ह स्मोकिंग) असलेल्या व्यक्तींनाही दीर्घ खोकल्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. धूम्रपानात अनेक प्रकारची विषारी द्रव्ये असतात. यातून क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) म्हणजेच काळा दमा यांसारखे आजार होऊ शकतात. या प्रकारातही दीर्घकाळ खोकला राहतो. या आजारात सकाळच्या वेळेला अधिक खोकला आणि कफ बाहेर येतो. याला वैद्यकीय भाषेत स्मोकर्स कफ म्हणतात. हा कफ सकाळी जास्त असतो, दिवसभरात हळूहळू कमी होतो. क्षयरोग : दीर्घकाळ खोकला राहण्यासाठी क्षयरोग हेही महत्त्वाचे कारण आहे. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम टय़ुबरक्लुलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. सरकारी नियमानुसार दोन आठवडय़ांहून जास्त काळ खोकला राहिल्यास क्षयरोगाची तपासणी करून घेणे अनिवार्य आहे.आम्लपित्त : दीर्घकाळ खोकल्याचे महत्त्वाचे आणि दुर्लक्षित राहिलेले कारण म्हणजे आम्लपित्त. सध्याच्या जीवनशैलीतील दिनचर्येमुळे शरीरातील आम्लाच्या प्रमाणात वाढ होते. जेवणाच्या अनियमित वेळांमुळे जठरातील आम्ल वर येते आणि खोकल्याची उबळ येत राहते. आम्लपित्ताचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला दरवेळेस छातीत जळजळ होईलच असे नाही. अनेकदा सुका खोकला येतो. पाठीत व पोटात दुखते. जेवणाच्या वेळात अधिक अंतर राहिल्यामुळेही आम्लपित्त होते. यावर उपचार म्हणून अन्ननलिकेतील आम्लाचे प्रमाण तपासून ते खोकल्याला कारणीभूत आहे का याबाबतची तपासणी केली जाते. आम्ल आढळल्यास ते शरीरातून बाहेर काढण्यासाठी उपचार केले जातात. फुप्फुसाला धोका : फुप्फुसांना दोन हवेच्या नलिका जोडलेल्या असतात, तर फुप्फुसाच्या बाहेर आवरण असते. या तीनपैकी एकाही भागात अडथळा निर्माण झाल्यास दीर्घकाळ खोकल्याला सामोरे जावे लागते. अनेकदा या नलिकांना सूज येते किंवा फुप्फुसांच्या बाहेरील आवरणात पाणी जमा होते, यामुळेही खोकला येतो. अनेकदा कर्करोग, क्षयरोग किंवा संसर्गजन्य आजारातही हे पाणी जमा होते. प्रदूषण : वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनविकारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. वाहनांमधून निघणारा धूर, रस्त्याच्या कामातून हवेमध्ये मिसळणारी धूळ-माती, रासायनिक कंपन्यांमधून निघणारा धूर अशा अनेक कारणांमुळे हवेतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ होते आणि परिणामी श्वसनाचे आजार सुरू होतात. हा संसर्ग होतो तेव्हा अनेकदा रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढलेली दिसते; परंतु प्रत्येक वेळी यामुळे संसर्गजन्य खोकला होतोच असे नाही. तर खोकल्याचे एक लक्षण म्हणून याकडे पाहता येते. उपाय : दीर्घकाळ खोकला असेल तर रुग्णाने खोकल्याने मूळ कारण समजून घेण्यासाठी तपासणी करून घ्यावी. दररोज गरम पाण्याची वाफ घेणे हा सततच्या खोकल्यावरील सर्वोत्तम उपाय आहे. गरम पाण्याची वाफ घेतल्यामुळे श्वसनमार्गातील अडथळा दूर होतो. त्याशिवाय प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी मास्क लावल्यामुळे काही प्रमाणात बचाव केला जाऊ शकतो. हा उपाय परिपूर्ण नसला तरी यामुळे मदत होऊ शकते. खोकला आणि स्वरतारा : सततच्या खोकल्याच्या परिणाम आवाजावर होण्याचीही दाट शक्यता असते. बऱ्याचदा सातत्याने खोकला येत असल्यास आवाज घोगरा होतो. सततचा खोकला, घसा वारंवार साफ करणे, अतिशय मोठय़ा आवाजात बोलणे या व अशा काही सवयींमुळे स्वरतारांना फोड किंवा गाठी येतात. त्यांना व्होकल नोडय़ुल्स म्हणतात. या गाठी स्वरतारांच्या अगदी वरच्या पेशीस्तरावर असतात आणि जर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला तर शस्त्रक्रियेचा धोका टाळता येऊ शकतो, तर धूम्रपानामुळे स्वरतारांवर पांढरे व्रण उद्भवतात. ही स्वरतारांच्या कर्करोगाची पहिली पायरी असू शकते. स्वरतारांच्या हालचालींवर बंधन आल्याने आवाजात बदल होतो, यातून हळूहळू आवाज बसतो आणि बोलणे कष्टदायी होते. वारंवार आवाज बसणे, आवाज खरखरीत होणे, बोलताना घशाला ताण पडणे, आवाज वाढवण्यास त्रास होणे, तोंड कोरडे पडणे ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. या त्रासावर उपाययोजना म्हणून दर १५ ते २० मिनिटांनी घोट-घोट पाणी पीत राहणे. दिवसातून एकदा गरम पाण्याची वाफ घेणे. स्वरतारांच्या आजारावर गरम पाण्याची वाफ हा चांगला उपाय आहे.