नदीच्या काठाने मानवी संस्कृती वसली आणि फुलली. या नद्यांनी मानवी जीवनाला सुजलाम् सुफलाम् केलं. वर्षभर पिण्याच्या पाण्याबरोबर आजुबाजूचा परिसर हिरवागार केला. असंच एक उदाहरण आहे नाशिक जिल्ह्यतलं. नाशिकच्या कळवण तालुक्यातील पुनद नदीवरील असाच एक नयनरम्य जलाशय आहे अर्जुनसागर. तब्बल ६१० दशलक्ष घनमीटर पाण्याची साठवण क्षमता असलेल्या या धरण परिसराचा परीघ दाट जंगलाने वेढलेला आहे. डोंगर-दऱ्यांनी व्यापलेल्या या क्षेत्रावर निसर्गदेवतेने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. आपण सर्वजण निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी आतुर असतो. कधी दाट वृक्षराजीतून तर कधी गवताळ माळरानातून भटकण्याची मजा काही औरच असते. अर्जुनसागर क्षेत्रात जलाशयाच्या भोवती वनपर्यटन करताना फुलं, पक्षी आणि प्राण्यांच्या अद्भुत दुनियेची सफर घडते. विशेषत: इथला वर्षांविहार निसर्ग भटक्यांना विलक्षण अनुभती देऊन जातो. या पुनद अर्जुनसागर निसर्ग पर्यटन क्षेत्रात प्रतापनगर, उंबरदे, सुपले दिगर ही वनक्षेत्रे येतात. धरणालगतचे हे वनक्षेत्र एकूण १३०० हेक्टर क्षेत्रफळाचे आहे. या आदिवासीबहुल क्षेत्रात कोकणा, महादेव कोळी, भिल्ल आणि इतर समाजाचे लोक त्यांच्या स्थानिक संस्कृतीसह सण-उत्सव साजरे करताना आणि लोककला आणि लोकसंस्कृतीचे जतन करताना दिसतात. धरणाच्या पाण्यामुळे इथला शेतकरीही सुखावलेला आहे. वन विभागातर्फे संयुक्त वन व्यवस्थापन समितीची इथे स्थापना करण्यात आली असून त्यांच्यामार्फत विविध विकासकामांना चालना देण्यात आली आहे. पथमार्ग, निवाराशेड, पॅगोडा, रेिलग, निरीक्षण मनोरे, बोटिंग यासारख्या सुविधा इथे निर्माण करून देण्यात आल्या आहेत. निसर्ग पर्यटन केंद्रामुळे स्थानिक लोकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. येणाऱ्या पर्यटकांना इथल्या ग्रामीण जीवनाबरोबर आदिवासी पदार्थाची चवदेखील चाखता येते. पर्यटकांसाठी अर्जुनसागर निसर्ग पर्यटन केंद्र म्हणजे पर्यटनाचा मनमुराद आनंद देणारं केंद्र असंच त्याचं वर्णन करावं लागेल. अर्जुन सागर जलाशयाभोवती भटकंती करण्यासाठी वन विभागातर्फे १३ कि.मी.चा निसर्ग परिक्रमा मार्ग (नेचर ट्रेल )करण्यात आला आहे. पावसाळ्यात भोवतालच्या डोंगररांगांतून वाहणारे छोटे-मोठे धबधबे त्यातून वाहणारे असंख्य ओहोळ, झरे आपल्या मनाला प्रसन्न करून जातात. गंगा-जमुना हे भूगर्भातील पाण्याचा स्रोत असलेले दोन मोठे तलाव हे या वनातील नैसर्गिक खजिनाच आहेत. डोंगररांगांमधून धावणारी चढ-उताराची वाट आपल्याला अनेक दुर्मीळ वनस्पतींबरोबर डेरेदार वृक्षांचे दर्शन घडवते. त्याच्या सावलीखालून फिरण्याची संधी देते. खैर, आवळा, साग, जांभूळ, आंबा, रानभेंडी, िपपळ, वड अशा अनेक वृक्षांची दाटी आपण इथे पाहू शकतो. राष्ट्रीय पक्षी मोर, राज्य पक्षी हरियाल, यासारख्या पक्ष्यांबरोबर असंख्य पक्षी अर्जुन सागराभोवती मस्त विहरताना आणि दिसतात. अनेक स्थालांतरित पक्षी आणि पाणपक्षी आपलं अस्तित्व या जलाशयात दाखवत असतात. निसर्गप्रेमी, गिर्यारोहक, साहसवीर, पक्षीप्रेमी यांच्यासह वन्यजीवतज्ज्ञांची येथे नेहमीच गर्दी असते. सह्यद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या या अर्जुन सागर जलाशयाच्या परिसरात साल्हेर किल्ल्याचे विहंगम दृष्य दिसते. कसे जाल? जवळचे रेल्वे स्थानक - नाशिक रोड, मनमाड नाशिक ते पुनद धरण - ९५ कि.मी कळवण ते पुनद धरण -४० कि.मी मुंबई ते पुनद धरण -२७५ कि.मी जवळची प्रेक्षणीय स्थळे- साल्हेर किल्ला, मांगी-तुंगी, हातगड किल्ला, सापुतारा, सप्तशृंगी, चणकापूर धरण. डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com