वाघ किंवा बिबटय़ा या दोन्हीमध्ये नव्याण्णव टक्के लोक वाघाच्याच मागे जातात. हे अतिशय स्वाभाविकपणे आहे. कारण वाघाचं वलय इतर प्राण्यांपेक्षा वेगळं असतं. म्हणूनच जयपूरजवळचे झालना बिबटय़ा अभयारण्य वेगळे ठरते. वाघासारखा बिबटय़ा कधीही एका ठरावीक रस्त्याने किंवा मार्गावरून जात नाही. वाघांच्या मार्गक्रमणाचा अंदाज बांधता येतो, मात्र तुम्ही बिबटय़ाचा पाठलाग शंभर मीटरही करू शकणार नाही; कारण तो कुठल्याही दिशेने जाऊ शकतो. या पाश्र्वभूमीवर बिबटय़ाला अगदी जवळून पाहण्याची संधी झालनामध्ये मिळू शकते. झालना हे जयपूर शहरातच आणि मुख्य म्हणजे औद्योगिक क्षेत्रात आहे. दुसरे म्हणजे हे बिबटय़ांचे अभयारण्य असले तरीही बिबटे अजिबात कसलीही काळजी न करता उघडपणे फिरत नाहीत. झालनाचा प्रवेश अगदी शहरी भागातून होतो. हे आधी जयपूरच्या महाराजा मानसिंह यांचे खाजगी जंगल होते. हा भाग अगदी रणथंबोरसारखाच असला तरीही शहरीकरणात एखाद्या लहान बेटासारखा वाटतो. शहराच्या मध्यवर्ती भागात एवढे जंगल जपून ठेवल्याबद्दल राजस्थानच्या वनविभागाचे, नागरी विकास विभागाचे तसेच पर्यटन विभागाचे अभिनंदन करावेसे तेवढे कमीच म्हणावे लागेल. तुम्ही जोपर्यंत झालना अभयारण्यामध्ये प्रवेश करेपर्यंत, तुम्ही प्रत्यक्ष जंगलात प्रवेश केलाय हे तुम्हाला कळत नाही. तसंच बिबटय़ा जवळपास असल्यावर विविध प्राण्यांनी दिलेले संदेश, प्रत्यक्ष बिबटय़ा बघणं हे एखाद्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ बघण्याइतकंच रोमांचक असणार आहे याची जाणीवही होत नाही. यातच या संपूर्ण व्यवस्थेचे यश आहे. घनदाट झाडीसह लपण्यासाठी जागा तसंच शिकारीसाठी भरपूर प्राणी बिबटय़ाच्या जीवनशैलीसाठी अत्यावश्यक आहेत. इथे घनदाट झाडी असलेले डोंगर आहेत, ज्यातील गुहांमध्ये बिबटे राहतात. तसंच बिबटय़ाच्या उदरभरणासाठी मोर, लंगूर, नील गाय व चितळ आहेत. साहजिकच झालनामध्ये तुम्हाला बिबटय़ा पाहण्याचा उत्तम अनुभव मिळतो. एरवी तुम्ही चितळ किंवा सांबराच्या इशाऱ्यावरून सहजपणे त्याचा पाठलाग करू शकता. येथे सांबर, हरीण नाहीत व नीलगाय इशारा देत नाहीत; त्यामुळे मोर व माकडांच्या आवाजावरूनच बिबटय़ाचे अस्तित्व शोधता येते. या अभयारण्याचे क्षेत्रफळ जेमतेम तीस चौरस किलोमीटरचे आहे, मात्र तरीही ते तुम्हाला आजूबाजूचे शहरीकरण विसरायला लावतो. झालनामध्ये बिबटय़ा दिसणे सोपे नाही. कारण तो आपल्या स्वभावानुसारच वागणार. म्हणूनच आम्ही पाणवठय़ापाशी वाट पाहात होतो, त्याच वेळी भोवतालच्या दाट झुडुपांमधून बिबटय़ाची मादी हळूच डोकावली. तेवढय़ात एका खाजगी गाडीची (त्यांना आत्तापर्यंत परवानगी होती, मात्र नशिबाने १ मे १७ पासून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली) हालचाल झाली. त्याच वेळी तिचे डोके दिसेनासे झाले व ती जंगलात गुडूप झाली. येथे वनविभाग संवर्धनाचे प्रयत्न करतो आहे, मात्र थेट जंगलात एक कालीमातेचे मंदिर आहे. इथे स्थानिकांना यायची परवानगी आहे, वाईट म्हणजे ते लंगूर, चितळ व नीलगाईंसाठी खायला आणतात. प्राण्यांना भजीदेखील खाऊ घालतात. झालनामध्ये फक्त बिबटे नाहीत तिथे इतरही बरेच वन्यजीवन आहे. त्यातही नेहमी मोठा रोमांस असतो, इथे मोरांची झुंज पाहायला मिळते. एकेकाळी हे बिबटे समाजासाठी त्रासदायक ठरले होते व माणूस-प्राण्यातील संघर्ष टिपेला पोहोचला होता, अशा वेळी झालनातील बिबटे नष्ट होणे हा एकमेव उपाय ठरला होता. थोडे सुज्ञपणे केलेले नियोजन व कृतींमुळे, माणूस व प्राणी दोघेही शांतपणे जगू व राहू शकले. संजय देशपांडे smd156812@gmail.com