हिमालयात केव्हा काय घडेल ते सांगता येत नाही, क्षणार्धात निसर्ग वेगळे रूप दाखवतो आणि त्यापुढे आपण किती य:कश्चित आहोत हे जाणवते. त्यातही पुरेशी तयारी नसेल तर ट्रेकिंगचा अनुभव जीवघेणाही वाटू शकतो. कोणालाही दोष न देता जानेवारीत आलेल्या एका अनुभवात जे जाणवले त्या मांडण्याचा हा प्रयत्न. यापूर्वी हिमालयातील काही भागात ट्रेकिंग करून झाल्यानंतर आम्ही युथ हॉस्टेलकडून जानेवारीत केदारकांटाला जाण्याचे ठरले. सांकरी - जुडा तलाव- लुहासू (केदारकांटा बेस कॅम्प)- शिखर सर केल्यानंतर अडगाव- सांकरी असा ट्रेक होता. साधारण आठ हजार फुटांवरून १२ हजार ५०० फुटांपर्यंतचा प्रवास होता. हा ‘इझी ट्रेक’ असल्याचे युथ हॉस्टेलच्या संकेतस्थळावर लिहिले होते. यासाठी इतर ट्रेकचा अनुभव गरजेचा असल्याची नोंद नव्हती. खबरदारीचा उपाय म्हणून याच परिसरात, हर की दून ट्रेक केलेल्यांकडून आम्ही माहिती मिळवली. हिमालयातील बाकीच्या ट्रेकप्रमाणेच थंडीसाठी जॅकेट, गॉगल, चांगले शूज, बरसाती, आवश्यक औषधे, इ. नेहमीच्या सूचनेबरहुकूम तयारी केली. याव्यतिरिक्त संकेतस्थळावर कोणत्याही विशेष सूचना करण्यात आल्या नव्हत्या. दिल्ली, त्यानंतर डेहराडून आणि मग २०० किलोमीटरचा वेडावाकडा रस्ता पार करून सांकरीला पोहोचलो तेव्हा थंडी हाडांपर्यंत पोहोचली होती. तंबूत जाजम होतो; पण जमिनीतील थंडी त्याला जुमानत नव्हती. ट्रेक पूर्ण करून परतलेला गट, दुसऱ्या दिवशी ट्रेकसाठी निघणारा गट आणि त्यानंतरच्या दिवशी ट्रेक सुरू करणारा आमचा गट अशा साधारण १२० जणांसाठी ही व्यवस्था पुरेशी नव्हती. पहिल्याच दिवशी तीस अंशाचा चढ होता. दोन-चार दिवसांपूर्वी पडून गेलेल्या आणि आता टणक झालेल्या बर्फामुळे अनेकांनी हिमालयाला साष्टांग दंडवत घातले. क्रॅम्पॉनबाबत सूचना नसल्याने कोणीही ते सोबत आणले नव्हते. दोन हजार फूट अंतर वर असलेल्या जुडा का तलाव कॅम्पमध्ये आदल्या रात्री भरपूर बर्फ पडला होता. एकावर एक कपडय़ाचे चार-पाच थर देऊनही दातांची टकळी आपोआप वाजत होती. दुसऱ्या दिवशी लुहासूपर्यंतची पायवाटही अत्यंत निसरडी झाली होती. चाळीस जणांच्या गटासोबत केवळ दोन वाटाडे हे प्रमाण अपुरे होते. तिथून पहाटे तीन वाजता शिखर सर करण्यासाठी निघालो. साधारण अडीच हजार फूट अंतर चढून जायचे होते. अंतर कमी असले तरी तो हिमालय होता. बर्फाळ जमिनीवरून एक दोघांनी टॉर्चसह लोटांगण घातले. हेडटॉर्च या परिस्थितीत उत्तम साथ देतात, पण तशा सूचना नसल्याने अनेकांकडे हातात पकडायचे टॉर्च होते. वर चढताना अनेकांचे श्वास फुलले. सराइतांनाही बर्फात घाम फुटायची वेळ आली. या स्थितीत केदारकांटाचे शिखर चढता येणार नाही याची जाणीव अध्रे अंतर पार केल्यावर झाली. मात्र खाली उतरण्याचा सुरक्षित मार्ग दिसत नव्हता, शिवाय वाटाडे दोनच होते. तापमान वजा १५ पर्यंत गेले होते, त्यामुळे लवकरात लवकर खाली उतरणे आवश्यक होते. ‘सर्वाना सोबत घेऊन चला’ हा ट्रेकिंगचा संदेश बाजूला राहिला, ग्रुप विभागला गेला. वरच्या टप्प्यावर सूर्यदेवाने दर्शन दिले आणि अचानक वारे बदलले. वेगवान वाऱ्याने कपाळमोक्षाचं भय जाणवू लागलं. एका विशिष्ट क्षणी तर बर्फात रुतलेले पाय आणि नजरेच्या टप्प्याबाहेर गेलेले सोबती व वाटाडय़ा यामुळे काहींचे अवसानच गळाले. मागून आलेल्या दुसऱ्या गटाच्या ट्रेकरच्या मदतीने काहीजणांनी केदारकांटाचे शिखर गाठले. बर्फातून घसरत खाली उतरतानाची अवस्थाही फार आनंददायी नव्हती. उतरताना बाकीची मंडळी भेटत गेली. प्रत्येकाची कमी-अधिक फरकाने वाईट अवस्था होती. बर्फात खाली घसरताना कंबर दुखावणे, मानेला हिसका बसणे, कपडे फाटणे असे प्रकार झाले. अर्थातच कोणाच्याही चेहऱ्यावर केदारकांटा सर केल्याचा आनंद नव्हता. या ट्रेकमध्ये कोणालाही मोठा अपघात झाला नाही, हे आमचे व युथ हॉस्टेलचे सुदैव. मात्र या अनुभवातून काही प्रश्न उपस्थित झाले व काही गोष्टी नव्याने शिकलो. ट्रेकिंगमध्ये सर्व सुखसोयी असणे अपेक्षित नव्हतेच किंबहुना, असे अनुभव बरेच काही शिकवून जातात. युथ हॉस्टेल अनेक वष्रे उत्तम प्रकारे ट्रेकचे आयोजन करते आणि एका ट्रेकमुळे युथ हॉस्टेलवरचा विश्वासही उडणार नाही. मात्र हे खबरदारी न घेण्याचे कारण ठरू शकत नाही. prajakta.kasale@expressindia.com