अनोख्या वैशिष्टय़ाने आणि दैवी आख्यायिकेने समृद्ध असूनही बव्हंशी अपरिचित असलेले स्थळ म्हणजे महाडजवळील ‘वाळणकोंड’. पूर्वेला सह्यद्रीमधील अतिरौद्र आग्याची नाळ, सिंगापूर नाळ आणि बोराटय़ाची नाळ या त्रिनाळी. बाजूलाच शिविलगाच्या आकाराचा ससखा किल्ले लिंगाणा. पश्चिमेला स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगड, दक्षिणेला महाड नगरी आणि उत्तरेला पाने गावाची वस्ती आशा भौगोलिक परिघात वसलेलं वाळणकुंड काळ नदीच्या गर्भकोशात अगदी मुख्य पात्रातच, दापोली आणि पंधेरी या दोन गावांच्या पश्चिमेला अगदी मध्यावर वसलेले आहे. नदीच्या मध्यावरील खोल डोह आणि त्यातील मत्स्य यांभोवती पुराण काळापासून एकवटलेली या स्थळाची आख्यायिकाही मोठी रंजक आहे. सत्ययुगात या डोहात असलेल्या पाण्याखाली वरदायिनी देवीचं भव्य मंदिर होते. आजही ते मंदिर या डोहात अगदी तळाशी असल्याचे म्हटले जाते. देवीची पूजा-अर्चा करण्यासाठी मंदिराचे पुजारी पूजेच्या साहित्याने भरलेले ताट घेऊन दररोज या जलप्रवाहातून डोहात उतरत असत. अनेक भक्त देवीला नवस करत आणि मागणे मागत. यात धार्मिक कार्याच्या उपयोगासाठी बहुतांशी सोन्या-चांदीच्या भांडय़ांची मागणी केली जायची. कार्य पूर्ण होताच पुन्हा ही भांडी देवीला अर्पण केली जात. पुढच्या वेळी नव्याने पुन्हा मागणी केली जायची. मात्र, एकदा काही भांडी पुन्हा देवीला परत केली गेली नाहीत. देवीच्या नित्य नियमांमध्ये विघ्न पडले. यामुळे वरदायिनी माता भक्तांवर रुष्ट झाली, अशी पुराणकथा ेसांगितली जाते. सुमारे शंभरेक मीटर लांब आणि वीसेक मीटर रुंद असलेल्या या डोहातील पाण्याचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. उन्हाळ्यात या नदीचे पात्र कोरडेठाक असते. यामुळे नदीतून दळणवळण सहजशक्य आहे. मात्र, पूर्वी पावसाळ्यात दोन्ही बाजूची ये-जा पूर्णत: बंद असे. युती शासनाच्या काळात १९९६ साली या नदीवर लोखंडी झुलता पूल बांधला. नदीच्या प्रचंड प्रवाहातही तग धरणाऱ्या मजबूत बांधकामाचा हा पूल जाडसर तारांनी तोलून धरला आहे. पुलाच्या पूर्वेकडील चौथऱ्याखालील शेंदूर लावलेल्या चार -पाच शिळा या वरदायिनी देवीच्या सेवकांची ठाणी म्हणून पूजल्या जातात. डोहाच्या पूर्व काठावर उभारलेल्या पुरुषभर उंचीच्या तात्पुरत्या शेडमध्ये स्वयंभू अशी सुमारे एक मीटर लांब आणि अर्धा मीटर रुंदीची वरदायिनी मातेची शिळा आहे. भाविकांनी आपला नवस पूर्ण झाल्यावर वाहिलेले पितळी मुखवटे आणि काही मूर्तीही या शिळेवर आहेत. बाजूलाच भाविकांना विश्रांती घेता यावी म्हणून एक तात्पुरत्या स्वरूपाचे पत्र्याचे शेड उभारले आहे. नदीच्या प्रवाहाच्या प्रचंड वेगामुळे स्वयंभू शिळा वगळता इथले देवीचे संपूर्ण साहित्य पाऊस सुरू होण्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी हलवले जाते. संतोष काशिद santoshkashid43@gmail.com