‘सूर्यसूक्त’ हे संपादकीय (७ ऑगस्ट) वाचले. गेल्या काही वर्षांची नासाची प्रगती थक्क करणारी आहे, याचे एक कारण म्हणजे कौशल्याला महत्त्व देणारी व प्रयोगशील माणसे तयार करणारी ही व्यवस्था. त्याचीच परिणती पुढे अशा धाडसी मोहिमांमध्ये दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपली ‘इस्रो’देखील नासाच्या मार्गावर आहे; पण तीही मोजक्या लोकांमुळे. आज ७१ वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून, पण आपण अंधश्रद्धा सोडायला तयार नाही की आपले विचार बदलायला! मुळात उत्तरे मिळण्यासाठी सुरुवातीला प्रश्न पडावे लागतात. लहान असताना प्रत्येकात खूप चौकसपणा असतो; पण एखाद्या लहान मुलाने प्रश्न विचारल्यास त्याला गप्प केले जाते आणि हळूहळू ते मूलच प्रश्न विचारणे बंद करते, त्याचा चौकसपणा हरवून जातो. पुढे अशा मुलांच्या करिअरचा विचार करताना ‘हल्ली स्कोप कशाला आहे’ हेच पाहिले जाते. खरे तर वाव (स्कोप) हा एखाद्या क्षेत्रापेक्षा माणसांना असतो हेच आमच्या सुसंस्कृत लोकांना समजले नाही.

शनीचा कोप, ग्रहांची शांती, ग्रहण, उपवास, नवस, विशिष्ट वार याच देवाचा असे समज आपण पुराव्याशिवाय असे कवटाळू शकतो? देवाची भीती की दुसरं काही? गाडगेबाबा म्हणायचे, देव देवळात नाही माणसात आहे. स्वच्छता तेथे देवाचा वास असतो. संत एकनाथ म्हणायचे, ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा’! देव हा प्रयत्नात आहे, आपल्या प्रामाणिक कामात आहे, तो आपल्यासोबतच असतो. आपले जेव्हा प्रयत्न संपतात तेव्हा त्याचे अस्तित्व सुरू होते. नासाच्या या सौरमोहिमेतून नक्कीच सौरवादळांचा अभ्यास आपल्याला भविष्यात फायदेशीर होईल आणि बहुतेक भारतीय समाजमनांत विज्ञानाचा प्रकाश पडेल जो भारतमातेला सुजलाम सुफलाम करेल, अशीच सदिच्छा!

– विशाल चांगदेव कोल्हे, पेमगिरी (संगमनेर, जि. अहमदनगर)

हिंदूंना जे नमनीय..

‘सूर्यसूक्त’ हा १४ ऑगस्टचा अग्रलेख नेहमीप्रमाणे अमेरिकेचे कौतुक करणारा आहे; पण त्याबरोबर हिंदूंना जे नमनीय त्या प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याचा या लिखाणातून दिसणारा प्रयत्न िनदनीय आहे.

– सुरेश छत्रे, सांगली

विज्ञानाचा सूर्य, अंधश्रद्धांचे ग्रहण

‘सूर्यसूक्त’ हा अग्रलेख (१४ ऑगस्ट ) वाचला. २० ऑगस्टला डॉ. दाभोलकरांचा स्मृतिदिवस येत आहे. लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी जागृत करावी यासाठी डॉ. दाभोलकर आयुष्यभर झटत राहिले, त्यामुळेच २०१३ मध्ये त्यांचा खूनही झाला. आपल्या देशात शिक्षित समाजसुद्धा अंधश्रद्धा पाळतो; एवढेच काय, पण आपल्या नामांकित ‘इस्रो’ या संस्थेत एखादा उपग्रह प्रक्षेपित (लाँच) करायचा असेल तर त्याची विधिवत पूजा केली जाते, हे तर अतिच झाले. अंधश्रद्धेचे भारताला लागलेले खग्रास ग्रहण डॉ. दाभोलकरांच्या प्रयत्नांनी जरी अंशत:च सुटले तरी ते इष्टच ठरणार आहे. विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आलेला असताना अंधश्रद्धेची झापडे बांधून ठेचकाळत राहण्यात शहाणपण ते काय?

– रोहित रामचंद्र गवळे, सूरवाणी (धडगाव, जि. नंदुरबार)

जातिनिष्ठेची मानसिक गुलामगिरी

सूर्यसूक्त हा अग्रलेख (१४ ऑगस्ट) वाचला आणि ‘आपण’ आणि ‘ते’ यांच्यातील जमीन-अस्मानाचा (की पृथ्वी-सूर्याचा?) फरक प्रकर्षांने जाणवला. सर्व ऐहिक प्रगती ही ऐहिक ज्ञानातून (विज्ञानाच्या अभ्यासातून) होणार हे सूर्याएवढे स्वच्छ आहे. अशा वेळी आपली वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

अग्रलेखाच्या शेजारच्या पानावरील ‘अस्वस्थ वर्तमानातील उद्योग’ या लेखात (सह्य़ाद्रीचे वारे) त्या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे दिसून येते. बुद्धिवाद वा विज्ञानवाद दूरच, आपण अजूनही पुराणकाळातील जातीपातींतून बाहेर पडण्यास तयार नाही. संत-सुधारकादी सर्वाना आपण कोळून प्यायलो आणि पुरून उरलो. राजकीय स्वातंत्र्याला सत्तर वर्षे उलटूनही आपली मानसिक गुलामगिरी आपल्या प्रगतीच्या मार्गातील धोंड आहे हे आपल्याला कळते पण वळत नाही हेच आपले ‘दुर्दैव’(!) आहे.

कविवर्य सुरेश भटांनी वर्णन केल्याप्रमाणे,

‘पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना

कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला’

अशी परिस्थिती आजूबाजूला पाहून मन विषण्णतेने भरून जाते.

– मनीषा जोशी, कल्याण.

‘नाही रे’ गटाकडून ‘आहे रे’वर हल्ला!

‘सह्य़ाद्रीचे वारे’ सदरातील सुरेश सरदेशमुख यांच्या ‘अस्वस्थ वर्तमानातील उद्योग’ या लेखात औरंगाबादमधील औद्योगिक वसाहतीत असलेल्या कारखान्यांवर मराठा आंदोलनात झालेल्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करताना, मराठवाडय़ातील विकासाकडे झालेले दुर्लक्ष अधोरेखित केले आहे. भारत हा जगात सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. या तरुणाईचा, त्यांच्या मानसिकतेचा वापर कसा करून घ्यायचा हे आता राजकारणी त्यांच्या सोयीनुसार ठरवू लागले आहेत. देशातील बेरोजगारी व महागाई (विशेषत इंधन दरवाढ व तिचे परिणाम) आर्थिक विषमता यांमुळे तरुण नराश्यग्रस्त झाला आहे. ग्रामीण भागात शेतकरी ज्याप्रमाणे हताश होऊन आत्महत्या करीत असला तरी शहरांतील तरुण याच मार्गाने जाईलच असे नाही. तो वेगळय़ा मार्गाने जाऊ शकतो. सरकारचे ‘स्किल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ व ‘मुद्रा योजना’ यांमुळे देशातील तरुणांना दिलासा मिळाला नाही हे वास्तव आहे. त्यामुळे काहीच हाती नसलेले तरुण आपला राग ज्यांच्याकडे काही आहे ती केंद्रे नष्ट करण्याच्या मानसिकतेत आले आहेत. मराठा आंदोलन फक्त एक निमित्त आहे. जमावाकडून हत्या (मॉब िलचिंग) यांसारख्या घटना तरुणांच्या अस्वस्थ मानसिकतेमधूनच घडत आहेत. येणाऱ्या काळात भारतातील तरुण विधायकऐवजी विघातक मार्गानेच आपले प्रश्न सोडविताना दिसतील, कारण तरुणांची माथी भडकविणाऱ्या काही शक्तींपेक्षा विवेकी प्रबोधन करण्यास समाज म्हणून कमी पडलो आहोत हे यानिमित्ताने कबूल करावे लागेल. आणि त्याची किंमत आपणांस सर्वाना मोजावीच लागेल असे नमूद करावेसे वाटते.

– मनोज वैद्य, बदलापूर (जि. ठाणे)

असे शेरेगर अवतार घेणारच

गणेश हजारे रूपी नव्या शेरेगरने अवतार घेऊन तीन लाख सामान्य गुंतवणूकदारांना ५०० कोटींचा गंडा घातल्याची बातमी (लोकसत्ता, १३ ऑगस्ट) वाचली. अशोक शेरेगर यांचे दामदुपटीच्या आमिषाचे प्रकरण १९९६ सालचे. त्यानंतर वेळोवेळी अशा फसवणुकीच्या बातम्या वृत्तपत्रातून येऊन त्यावर चर्चा होऊन, मोठमोठे लेख येऊनसुद्धा जास्त व्याजाच्या हव्यासाने ही मंडळी फसतात याचे आश्चर्य वाटते. याचे कारण ते गुंतवणूक करण्यापूर्वी जेथे गुंतवणूक करायची ते गुंतविण्यालायक आहेत की नाही याची शहानिशा करीत नाहीत.  आता त्या हजारेंच्या मुसक्याही बांधल्या गेल्या आहेत. न्यायालयात खटला चालेल त्याला किती वर्षे लागतील माहीत नाही. एवढे होऊनही या गुंतवणूकदारांना पैसे मिळतील का, याची शाश्वती नाही. जोपर्यंत आपल्या घामाचे पैसे कुठे गुंतवायचे हे स्वहित जनतेला समजत नाही किंवा ‘कमी कालावधीत श्रमाविना जास्त पैसे’ कमवायची हाव सुटत नाही तोपर्यंत असे शेरेगर निर्माण होणारच. कारण त्यांनाही कमी श्रमात पैसे कमवायची अतिहाव असतेच. मग आपण कोणाला फसवून काम करतोय याची पर्वा नसते.

– सुधीर ब. देशपांडे, विलेपाल्रे पूर्व (मुंबई)

प्रत्येक डोळ्यातील प्रत्येक अश्रू..

‘अस्वस्थ वर्तमानातील उद्योग’ हा लेख (सह्य़ाद्रीचे वारे, १४ ऑगस्ट) वाचला. एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते की, ज्या समाजात जनतेपेक्षा सत्तेला जास्त महत्त्व दिले जाते तिथे अशा समस्या उद्भवणारच. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा सोयीस्कररीत्या विपर्यास केला जात आहे. पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल प्रतिगामी दिशेने चालू आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ मराठवाडय़ाशी निगडित नसून सबंध महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित आहे.

आरोग्य व शिक्षण या दोन मूलभूत गोष्टींवर आजपर्यंत कोणत्याच सरकारने ठोस कामगिरी केलेली नाही. आज बेरोजगारी, अराजकता, झुंडशाही अशा सर्व समस्यांचे मूळ वरील दोन गोष्टींमध्ये असलेल्या मागासलेपणात आहे आणि याला राजकारण्यांबरोबर सरकारी अधिकारीदेखील तितकेच कारणीभूत आहेत. महात्मा गांधीजींच्या जीवनात एक ध्येय होते, ‘प्रत्येक डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला जावा’.  जे कोणी महात्माजींच्या नावाचा वारंवार वापर करतात त्यांनी महात्माजींचे हे ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा एवढीच माफक अपेक्षा.

– सूरज बनकर, फलटण (सातारा)

यांचे नागरिकत्व कायदेशीर आहे?

‘इंडियन सिटिझन अ‍ॅक्ट, १९५५’ अर्थात, ‘भारतीय नागरिकत्व कायदा, १९५५’  नुसार- भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी/ ते चालू ठेवण्यासाठी काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी/ ते चालू ठेवण्यासाठी ‘भारतीय संविधानावर निष्ठा ठेवणे’ हे सर्वावर बंधनकारक करण्यात आलेले आहे. या पाश्र्वभूमीवर भारतीय संविधानाची प्रत जाळण्यासारखा गंभीर गुन्हा जे लोक करतील, त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार काढून घेता येऊ शकतील, असे वाटते. त्यामुळे, दिल्लीत काही जणांनी राज्यघटनेची प्रतीकात्मक प्रत जाळल्याच्या निषेधार्थ आंदोलने करण्याऐवजी संस्था/ संघटनांनी निष्णात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन सरकारकडे योग्य ती मागणी करावी किंवा न्यायालयाकडून न्याय मिळवावा.

– डॉ. रविनंद नामदेव होवाळ, मुंबई

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers letter on current social issues
First published on: 15-08-2018 at 03:10 IST