विज्ञाननिष्ठ समजल्या जाणाऱ्या पंतप्रधानांच्या पक्षातील काही नेत्यांचा नेमका मानस हळूहळू अधोरेखित होऊ लागला आहे. अवकाशात फिरणाऱ्या वस्तूचा पृथ्वीतलावरून अचूक वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्मिती करणाऱ्या भारतात ‘शापा’ची वल्गना करणाऱ्या लोकांना देश कोणत्या काळात नेऊन ठेवायचा आहे?

राजकारण आणि धर्म बाजूला ठेवू या, पण त्यांनी केलेल्या विधानाने तपासणीच्या कसोटय़ा तर पार केल्या पाहिजेत ना? साक्षी महाराज यांच्याविरोधात जे मतदान करतील त्यांचा आनंद आणि सुख हिरावून घेण्याचा शाप त्यांनी दिला आहे. त्यांचा पराभव करून त्यांच्या शापातील फोलपणा समाजापुढे आला पाहिजे. दुसऱ्या साध्वी प्रज्ञासिंह. त्या म्हणतात की, ज्या दिवशी त्या तुरुंगात गेल्या त्या दिवशी त्यांना सुतक लागले आणि ज्या दिवशी त्यांच्या शापामुळे करकरे साहेबांची हत्या झाली त्या दिवशी सुतक सुटले. खरे तर कुणी मेले की सुतक लागते. इथे सुतक लागायला नेमके कोण मेले होते? प्रज्ञासिंह या साध्वी म्हणून नव्हे तर बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून तुरुंगात गेल्या होत्या.

आपण असे समजू की, त्या निरपराध होत्या, तरी त्यांच्यावर अन्याय झाला. म्हणजे त्यांच्या दृष्टीने खरे तर न्यायदानाची हत्या झाली. त्यामुळे त्यांनी न्यायाच्या नावाने सुतक धरायला हवे होते आणि ते सुतक न्याय मिळेपर्यंत सुटायला नको होते; पण त्यांचे सुतक तर एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाल्यावर सुटले! आणि ती हत्या आपल्या शापामुळे झाल्याचे त्या ठामपणे सांगतात. साध्वींनी दिलेल्या शापाची तात्काळ अंमलबजावणी न होता मध्ये काही काळ जावा लागला. कारण त्यांनी दिलेल्या शापाप्रमाणे करकरे यांची हत्या अतिरेक्यांकडून व्हायची होती.

याचा अर्थ अतिरेक्यांकडून होणाऱ्या हल्ल्याची त्यांना कल्पना होती असे समजावे लागेल. तसे नसेल तर त्यांनी शाप, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, कर्म वगरे सारे थोतांड असल्याचे जाहीर करावे.

– शरद बापट, पुणे

हे ‘हिंदू दहशतवादा’च्या पुष्टीकरणासारखेच!

‘जुनूँ का दौर है..’ हा अग्रलेख (२२ एप्रिल) वाचला. साध्वी प्रज्ञासिंह यांचा खरोखरच कारागृहात छळ करण्यात आला होता का, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या साध्वी सध्या जामिनावर कोठडीबाहेर आहेत. काँग्रेसच्या काळात ज्या साध्वी यांना न्यायालयाने जामीन नामंजूर केला होता त्यांनाच आता जामीन मंजूर झाला तो ‘एनआयए’ या केंद्रीय तपास संस्थेचा जो अहवाल न्यायालयाने ग्राह्य़ धरला त्यावरून हे येथे विसरता येणार नाही. काँग्रेसच्या काळात हे प्रकरण घडले आणि भाजपच्या काळात साध्वी तुरुंगातून बाहेर पडल्या! यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यपद्धतीबाबतच एक संदिग्धता आहे किंवा या दोघांची भूमिका संशयास्पद आहे, असे खेदाने म्हणावे लागते. बॉम्बस्फोट  कोणाच्या काळात घडला हे महत्त्वाचे नसून यामागचे खरे सूत्रधार कोण हे महत्त्वाचे आहे; मग ते कोणीही असोत. त्याबाबतचा तपास निष्पक्षपणे होणे आवश्यक आहे.

अर्थात, या प्रकरणाला ‘हिंदू दहशतवाद’ म्हणून जो धार्मिक रंग देण्याचा राजकीय प्रयत्न झाला तो अत्यंत दुर्दैवी म्हणावा लागेल. क्षणिक राजकीय सुखासाठी वापरलेला हा शब्द किती महागात पडू शकतो याचे साध्वी प्रज्ञासिंह म्हणा किंवा इतर जे या प्रकरणात पकडले आहेत त्याची साक्ष आहेत. अग्रलेखात शेवटी म्हटल्याप्रमाणे ‘इस्लामी धर्मातील कट्टरपंथीयांचा आणि त्यांचा कथित पत्कर घेणाऱ्या काँग्रेसचा प्रतिवाद करण्यासाठी टोकाच्या हिंदुत्ववाद्यांना पुढे करायचे, की हिंदू धर्मातील उदात्ततेने यास उत्तर द्यायचे?’ हे अगदी योग्य आहे. साध्वी यांच्या वादग्रस्त विधानाच्या समर्थनार्थ जे स्पष्टीकरण दिले जाते आहे ते ‘हिंदू दहशतवादाचे’ पुष्टीकरण करण्यासारखेच आहे असे खेदाने म्हणावे लागते.

– अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण पश्चिम

 

भाजपची ‘नीतिमत्ता’ उघड झाली..

‘नेतृत्व की हिंदुत्व’ हा महेश सरलष्कर यांच्या ‘लालकिल्ला’ सदरातील लेख (२२ एप्रिल) वाचला. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उमेदवारीबद्दलचे त्यातील भाष्य सुयोग्य आहे. राजकीय अपरिहार्यता पाहता आता अच्छे दिन, सब का साथ सब का विकास या गोष्टी बासनात गुंडाळल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा जहाल हिंदुत्वाचा शंखनाद केला जातो आहे. ज्या ज्या वेळी भाजप अडचणीत येतो त्या त्या वेळी असे अनेक तथाकथित साधू, साध्वी वा महाराज जे संघ आणि तत्सम संघटनांशी संबंधित असतात ते पुढे येतात. खरे साधू, महाराज कधीही राजकीय वक्तव्ये करीत नाहीत वा राजकारणात येत नाहीत. साधू म्हणजे संसारापासून विरक्त व्यक्ती, षड्रिपूंवर विजय मिळवून खरा जीवनमार्ग लोकांना सांगण्याचे काम साधू वा साध्वी करतात. इथे मात्र हे सगळे त्याच्या विरोधी आचरण करीत आहेत. मुळातच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, योगी आदित्यनाथ हे जनतेच्या डोळ्यात धर्माच्या नावाने धूळफेक करणारे संधिसाधू आहेत. त्यांच्या उमेदवारीचे देशाचे प्रधानसेवक समर्थन करतात ही शरमेची बाब आहे. दुसऱ्याला गोमांस बाळगल्याच्या कारणावरून, देशविरोधी घोषणा दिल्याच्या कारणावरून देशद्रोही ठरवायचे आणि दुसरीकडे बॉम्बस्फोटातील आरोपींना देशप्रेमी म्हणायचे यातूनच भाजपची ‘नीतिमत्ता’ उघड झाली आहे.

– हर्षवर्धन घाटे, नांदेड

 

फूलनदेवी, गवळी, आता साध्वी..

‘जुनूँ का दौर है..’ या (२२ एप्रिल) अग्रलेखातील विचार अंतर्मुख करायला लावणारे आहेत. पंतप्रधान पदावरील व्यक्ती त्या पदावर जाऊन फक्त एका पक्षापुरता विचार न करता देशहिताला प्राधान्य देणारी असावी ही किमान अपेक्षा असते. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची सर्व पाश्र्वभूमी माहीत असताना तेच साध्वीला देण्यात आलेल्या उमेदवारीचे समर्थन करतात म्हणजे काय? मग देशातील विवेकी जनतेने कोणाच्या तोंडाकडे अपेक्षेने बघावे? पंतप्रधान मोदी हे ‘मनरेगा’विषयीच्या एका भाषणात संसदेमध्ये स्वत:विषयी म्हणाले होते की, त्यांची ‘राजकीय सुझबुझ सर्वोत्तम’ आहे. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात ते सर्वोत्तम आहेत व त्यांना मात देणे अवघड आहे, असा त्यांचा आत्मविश्वास सध्या दिसतो आहे. त्या आत्मविश्वासाच्या व आताच्या ‘मजहबी जुनून’च्या जोरावर साध्वी प्रज्ञासिंह निवडूनही येतील. या देशाने अरुण गवळी व फुलनदेवीसारखे लोक निवडून येताना पाहिले आहेत व बाबासाहेब आंबेडकरसारखे महामानव निवडणूक हरताना पाहिले आहेत.

गुन्हेगार व दहशतवादी पुराव्याअभावी न्यायालयातून सुटणार. नंतर हेच लोक धनशक्ती, बलशक्ती, प्रसिद्धी व भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी घेऊन निवडूनही येणार. हे सर्व देश-समाजासाठी घातक आहेच, निराश व हताश करणारेदेखील आहे. अग्रलेखातील शेवटचा शेर वाचून आणखी एक शेर (शौक़ बहराइची यांचा) आठवला तो असा :

बर्बाद गुलिस्ताँ करने को बस एक ही उल्लू काफम्ी था

हर शाखम् पे उल्लू बठा है,अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा?

– विजय लोखंडे, भांडुप (मुंबई)

 

बिनकामाची ‘अभ्यासू’वृत्ती बाजूला ठेवा..

दुष्काळात तेरावा महिना कशाला म्हणतात, हे स्पर्धा परीक्षार्थीना विचारावे; असे म्हणण्याची वेळ या ‘अभ्यासू’ फडणवीस सरकारने आणलेली आहे. गेल्या पाच वर्षांपासून स्वतच्या नाकत्रेपणामुळे राज्याची तिजोरी रिकामी झालेली असल्यामुळे कुठून का होईना, महसुलाची सोय करण्यासाठी आधी शेतकऱ्यांना लुबाडले आणि आता महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षार्थीना लुटताना विद्यमान राज्यकर्त्यांना लाज कशी वाटत नाही? राज्याचा कारभार धड न चालवणाऱ्या सरकारला आधीच बेरोजगारीच्या विस्तवावर बसून अभ्यासिकेत रात्रंदिवस एक करणाऱ्या केवळ नावालाच महाभरती म्हणून गाजविलेल्या परीक्षांसाठी निवडणुकांच्या तोंडावरही एकेका विद्यार्थ्यांकडून सरासरी पंधरा हजार रुपये उकळताना जराही लाज कशी वाटत नाही? हे संबंधितांनाच ठाऊक. उपरोक्त भाषा जरी राजकीय वाटत असली तरी ज्यांना जी भाषा लवकर कळते त्यांच्याशी त्याच भाषेत बोललेले बरे असते!

आशा एवढीच की राज्यातील परीक्षा शुल्क या विषयाच्या बाबतीत आपली बिनकामाची ‘अभ्यासू’वृत्ती संबंधितांनी बाजूला ठेवून कार्यवाही करावी व जरा तरी.. बाळगल्याचा भास लोकांना होऊ द्यावा!

-रवींद्र अण्णासाहेब देशमुख, ढोकसाळ (ता. मंठा, जालना)

 

कृत्रिम बुद्धिमत्तेचे सुवर्णयुग दूर नाही..

‘नवप्रज्ञेचे तंत्रायन’ या हृषीकेश शेर्लेकर यांच्या सदरातील ‘कृत्रिम प्रज्ञा आणि मानवी संभाषण’ हा लेख (२२ एप्रिल) वाचला. जगातील मुख्य भाषांमध्ये याचा उपयोग झाला तर आणि तरच या कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा होईल. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला बरेच शिकावे लागेल, विशेषत: भाषेची वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार हे शिकण्यात खूप सुधारणा घडवून आणावी लागेल. भाषाज्ञान असणारी व्यक्ती गणितात अडखळते तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ‘बोलकेपणा’त सध्या जी सुधारणा झाली ती फार तर लहान मुलाच्या संभाषणाइतकी आहे, असे मानावे लागेल.. म्हणजे, अद्याप  कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रौढांइतके भाषाज्ञान मिळवणे आवश्यक आहे. सध्या वापरात असलेल्या काही सेवा (चॅट बॉट, ई-मेल बॉट, व्हॉइस बॉट, ट्रान्सलेशन बॉट या सर्व क्रिया) कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे घडत आहेत; यामुळे बँका, कंपनी, कॉल सेंटर, करिअर सेंटर या ठिकाणी ग्राहकास चौकशी करणे वा तक्रार नोंदवणे सोपे ठरते आहे. ‘रॅपिड-सिक्स्टी’ या प्रणालीमुळे मोठय़ा बातम्याचा सारांश सूचिबद्ध शब्दांत लगेच अपलोड करता येतो. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक अशक्य गोष्टीही शक्य होण्यास मदत होईल. परंतु यासाठीच्या अभ्यासासाठी एक काळ ओलांडल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेचे सुवर्णयुग नक्कीच उजाडेल.

-योगेश कैलासराव कोलते, औरंगाबाद.