मतदारांच्या प्रश्नांचा विसर पडल्याने पराभव

‘आता उघडी डोळे..’ हा अग्रलेख (१२ डिसें.) वाचला. स्टेरॉईड घेतलेल्या खेळाडूने एकदा सुवर्णपदक मिळविल्यानंतर त्याचे भविष्यात जे होते तेच भाजपच्या नेतृत्वाचे पाच राज्यांतील निवडणुकीत झाले. लोकशाहीत मतदार आणि त्यांचे प्रश्न महत्त्वपूर्ण असतात याचाच विसर पडला असावा. विकास आणि भ्रष्टाचार निर्मूलन या विषयपत्रिकेमुळे २०१४ मध्ये भाजपच्या झोळीत मतदारांनी भरभरून दिले; पण मतदाराला गृहीत धरून बेरोजगारी, शेती क्षेत्रातील अरिष्ट आणि महागाई याकडे दुर्लक्ष करत राम मंदिर, गोरक्षा, धार्मिक ध्रुवीकरण अशी छुपी विषयपत्रिका अंमलबजावणीस घेतल्याचा हा परिणाम आहे. माजी सैनिक, शेतकरी आणि कामगारांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा उद्दामपणा आणि दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीत निश्चित अंगलट येतो.

देशभक्तीचे डोस देताना विरोधी मत व्यक्त करणारे साहित्यकार, विचारवंत, कलाकार, माध्यमे, अधिकारी आणि विरोधक यांना देशद्रोही ठरविण्यात धन्यता मानणारे भक्तगण आणि वाचाळ प्रवक्ते यांचेही या पराभवात योगदान आहे. मतदारांच्या मानसिकतेचे वर्णन करणारे संतवचन-

‘‘दावी वैराग्याचा कळा, भोगी विषयांचा सोहळा।

तुका म्हणे सांगोला किती? जळो त्यांची संगती।।’’

– अ‍ॅड. वसंत नलावडे, सातारा

भाजप आणि मोदींसाठीही धोक्याची घंटा

‘आता उघडी डोळे..’ हे संपादकीय वाचले. नेहमी आपलाच विजय होणार या भ्रमात राहणाऱ्या भाजपची मोदी लाट आता ओसरताना दिसत आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या दमदार पुनरागमनासाठी सुगीचा काळ आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने मोदी आणि योगींनी सभा घेऊनही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला म्हणजे जनता आता मोदींच्या आश्वासनांना बळी पडत नाही हे स्पष्ट दिसत आहे. छत्तीसगडसारख्या राज्यात जेवढय़ा सभा घेतल्या (२७) तेवढे उमेदवारदेखील विजयी झाले नाहीत. २७ सभा घेऊन अवघ्या १६ जागांवर विजय मिळवता आला.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि मोदींना ही धोक्याची घंटा आहे. फसलेली नोटाबंदी, ऊर्जित पटेल यांचा राजीनामा, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन आणि शेतमालाचे पडलेले भाव, जीएसटीचा सर्वसामान्य जनतेला बसलेला फटका हे मोदींच्या (भाजप) झालेल्या आणि संभाव्य होणाऱ्या पराभवाचे कारण आहे असे म्हणता येईल. यातून मोदी आणि भाजप नेत्यांनी धडा घ्यायला हवा आणि काँग्रेस कसे वाईट आहे हे सिद्ध करण्यापेक्षा दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली तर आणि तरच जनतेचा कौल भाजपच्या बाजूने राहील.

– नितीन सोमनाथ मंडलिक, मु. निमोण, ता. संगमनेर (अहमदनगर)

पक्षापेक्षा व्यक्ती मोठी झाली की हेच होणार

‘आता उघडी डोळे..’ हे संपादकीय वाचले. भाजपचा पराभव हा अति आत्मविश्वासामुळे झाला आहे. २०१४ ला जनतेने भरभरून यश दिले, पण अहंकारामुळे या वेळी भाजपने हार पत्करली. सत्तेवर आल्यानंतर परदेशी बँकांमध्ये असलेला काळा पैसा देशात आणला जाईल अशी आश्वासनेही त्यांनी दिली होती; पण काळा पैसा देशात आणण्याचे सोडाच इतर लोक कर्ज बुडवून देश सोडून पळून गेले. भाजपाध्यक्ष अमित शहा मुलाखतींमधून, भाषणांतून पन्नास वर्षे आम्हीच सत्तेवर राहणार, अशी वक्तव्ये करीत होते. गेल्या चार वर्षांत मोदींच्या सरकारने ज्या तऱ्हेचा राज्यकारभार केला, तो सामान्य जनतेला गृहीत न धरणारा व धनवंतांचीच दखल घेणारा होता. मोदींच्या गर्जना मोठय़ा होत्या. मात्र, सामान्य माणसे प्रचार आणि वास्तव यातील अंतर आता समजू लागली आहेत. मी बोलणार तोच कायदा असे मोदींनी थांबवले पाहिजे. पक्षापेक्षा व्यक्ती मोठी मानली जाऊ लागली तर हेच होणार. ते टाळले पाहिजे.

– विक्रम ब्रह्माजी गावडे, भांडुप (मुंबई)

.. मग लोकांची सटकते

‘आता उघडी डोळे..’ हे संपादकीय आवडले.  नोटाबंदीसारखा अतक्र्य, धक्कादायक आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे सर्वाधिक नुकसान करणारा निर्णय घेतला. विरोधी पक्षात असताना ज्या आधारला सर्वाधिक विरोध केला, त्या आधारला व्यक्तिगत जीवनातल्या सगळ्या महत्त्वाच्या कागदपत्रांशी जोडण्याचा आणि त्यायोगे लोकांच्या प्रत्येक व्यवहार आणि हालचालींवर नजर ठेवण्याचा सपाटा लावला.  काँग्रेस सत्तेत असताना सर्व काही उत्तम चालले होते असे बिलकूल नाही. काँग्रेस सरकार असताना देशात कितीही कुशासन असले तरी लोकांच्या रोजच्या जीवनात प्रत्यक्षपणे वाईट परिणाम घडवणारा कोणताही आततायी आणि दडपशाही निर्णय ते घेत नव्हते. ज्या वेळी लोकांच्या जीवनात प्रत्यक्षपणे वाईट परिणाम व्हायला सुरू होतो, लोकांना सतत आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले जाण्याची भीती वाटते त्या वेळी एक वेळ अशी येते की लोकांची सहनशक्ती संपते, लोक पेटून उठतात. मग निवडणुकीत कितीही पशांचा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला तरी लोक परिवर्तनासाठी मतदान करतात. त्यातूनच मग मंगळवारी जो पराभव भाजपला पाहावा लागला आहे तो होतो. शेवटी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तुम्ही कितीही चांगला किंवा वाईट कारभार करा. लोकांना रोजच्या जीवनात त्याची झळ पोहोचत नाही तोपर्यंत सर्व काही चालते. पण ज्या वेळी तुमच्या कारभाराचा त्रास लोकांच्या घरात प्रवेश करतो, तेव्हा मग लोकांची सटकते.

– डॉ. समर पदमाई, कोल्हापूर</p>

कडवा हिंदुत्ववादही आवडेनासा होऊ  शकतो!

मी काँग्रेस किंवा भाजपचा पारंपरिक मतदार नाही; परंतु या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाच्या पाश्र्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे भाष्य केले ते समतोल वाटले. ‘‘देश भाजपमुक्त व्हावा अशी आमची इच्छा नाही’’, हे त्यांचे विधानही आश्वासक व परिपक्व आहे. कोणत्याही लोकशाही देशात सक्षम व मजबूत विरोधी पक्ष असणे आवश्यक असते, तसेच ते भारतातही आवश्यक आहे. भाजपच्या माध्यमवीरांनी आणि मोदीभक्तांनी ज्या हीन पातळीवर जाऊन समाजमाध्यमांवरून राहुल गांधींची यथेच्छ निंदा केली, ती यापुढे बंद झाली तरी येत्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाच्या आशा वाढतील. मोदी व शहा, दोघांनाही मराठी समजते.  ‘गर्वाचे घर खाली’, ‘अति तेथे माती’ या मराठी म्हणींचा अर्थ त्यांनी समजावून घेतला आणि आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितला तर इंदिरा गांधींचे आणि पर्यायाने काँग्रेसचे पतन का झाले हे त्यांना कळेल. काँग्रेसचा आत्यंतिक निधर्मीवाद कालांतराने जनतेला आवडेनासा झाला, तसाच भाजपचा आत्यंतिक हिंदुत्ववादही आवडेनासा होऊ  शकतो. या गोष्टी समजून घ्यायच्या नसतील तर प्रत्येकाला आपापली जागा दाखवायला मतदार आहेतच.

– अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)

कामगारांचा रोष महाग पडला

‘आता उघडी डोळे..’ या अग्रलेखाने राज्यकर्त्यांचे डोळे उघडो. गेल्या चार वर्षांत मोदी, शहा व योगी यांनी नेहरू-गांधी घराण्यावर वैयक्तिक न शोभणारे शब्द वापरले. मतदारांनी हा त्यांचा कुविचार फेटाळून लावला. शेतकऱ्यांच्या समस्यांचा आढावा अग्रलेखात घेतला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भाजप सरकारने कामगार वर्ग मोडीत काढला. कामगारांच्या हिताचे जे कायदे होते ते धनिक मंडळींच्या भल्यासाठी रद्द केले. त्यांचा रोष मोदी यांना महाग पडला. धर्माच्या घोषणा देऊन राज्ये टिकत नसतात हा इतिहासाचा धडा भाजप विसरला. एखादा साधू वा योगी राज्याचा मुख्यमंत्री कसा होऊ  शकतो? या योगी यांनी सभा घेतल्या, मात्र मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. हा निकाल म्हणजे आपली लोकशाही भक्कम झाल्याचा पुरावा आहे.

– मार्कुस डाबरे, पापडी, वसई

आता तरी सुधरा!

‘आता उघडी डोळे..’ हे संपादकीय वाचले.देशातील पाच राज्यांमध्ये मतदारांनी/जनतेने भाजपला नाकारले. स्वत:बरोबर देशातील जनतेच्या स्मरणशक्तीला कमकुवत समजून दिलेल्या आश्वासनांपासून फारकत घेणे, लोकशाहीतील विरोधकांचे महत्त्व मान्य न करता त्यांना कायमचे हद्दपार करण्याची भाषा करून लोकशाहीलाच आव्हान देणे, लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून सतत मन की बात करणे.. याने काय होते, याचा धडा या निकालाने दिला. मंदिर, जात, धर्म, पुतळे, नामांतर मोहीम, रथयात्रा, आरत्या यापेक्षा शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, रोजगारनिर्मिती, परकीय गुंतवणुकीवर भर, व्यवसायाच्या संधी, शेती विकास व व्यवस्थापन यांना महत्त्व दिले पाहिजे. एकाधिकारशाही कमी करून सर्वसमावेशक निर्णय घेतले, सर्व घटकांचे अस्तित्व व स्वातंत्र्य यांचा आदर केला तरच पुढील निवडणुकांमध्ये याची पुनरावृत्ती टळू शकेल.

– सुधाकर दरेकर, बारामती</p>

इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र दोषमुक्त..

पाच राज्यांतील निवडणुकांचा निकाल घोषित झाला. जनतेच्या कौलांचे प्रत्येकाने स्वागतच करायला हवे. मात्र गेल्या तीन-चार वर्षांत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर ईव्हीएम मशीन घोटाळ्यांची चर्चा सर्वत्र रंगत असे. या निकालानंतर मात्र इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र दोषमुक्त झाल्याचा साक्षात्कार झाल्यासारखे वाटले. वास्तविक  आधुनिक काळात क्षेत्रफळ व लोकसंख्येने मोठा असलेल्या आपल्या देशात आधुनिक साधने वापरणे गरजेचे आहे. मात्र भाजपला विजय मिळाल्यावर अगदी प्रत्येक पक्षाने बॅलेट पेपरची मागणी केली. मात्र दिल्ली, कर्नाटक व आता या निवडणुकीनंतर एकदम सर्वाचा इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रावर विश्वास बसला. तरी निवडणुकीत हार-जीत चालू असते. पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा. मात्र थेट निवडणूक प्रक्रियेवरच अविश्वास दाखविणे योग्य नाही.

– प्रशांत कुलकर्णी, मनमाड

loksatta@expressindia.com