गोहत्याबंदी कायदा करून गोपालन होणार नाही. अपंग, मारकुटय़ा, अतिवृद्ध अशा गाईंचे रोजचे पालन शेतकरीबांधवांनी कशाच्या जोरावर करायचे, हा प्रश्न कट्टर असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी स्वत:ला एक दिवस विचारायला हवाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात भाजपप्रधान सरकार आल्याबरोबर; अनेकानेक कट्टर हिंदुत्ववाद्यांना आपापल्या आवडीचा ‘अजेंडा’ रेटायची खूप खूप संधी मिळत आहे. संस्कृत भाषा, गीतापठण याबरोबरच आता महाराष्ट्रातील गोहत्याबंदी विधेयकाला संधी; विविध प्रसारमाध्यमात; अनेक प्रकारे चर्चेत आहे. १९६६ साली देशातील चार थोर शंकराचार्यापैकी पुरीच्या शंकराचार्यानी गोहत्याबंदीकरिता कायदा संमत व्हावा म्हणून आमरण उपोषण सुरू केले होते. महाराष्ट्रात पुणे मुक्कामी वाई येथील चौंडे महाराजांनी उपोषण करून त्यांना साथ दिली होती. मी त्या वेळी भारतीय विमानदलात चाकरी करत असताना पुणे मुक्कामी रजेवर आलो होतो. आमच्या घरात माझे वडील कट्टर हिंदूमहासभावादी असल्यामुळे खूप चर्चा झडत होत्या. त्यावेळेस माझ्याजवळ विशेष द्रव्य नसताना चोंडे महाराजांसमोर असलेल्या दानपेटीत रुपये हजार किंवा पाचशे टाकल्याची अंधुक आठवण अजून आहे, असो.
जवळपास तीस वर्षांपूर्वी माझ्या रुग्ण परिवारापैकी एक ख्रिश्चन महिला, औषधोपचारांपेक्षा एक वेगळा प्रस्ताव घेऊन आली. ‘डॉक्टरसाहेब, मी आता कायमची लंडनला जात आहे, माझ्याकडे बछडय़ासह एक गाय आहे. तिला तुम्ही सांभाळात का?’ माझ्या सर्व तऱ्हेच्या कामात, कारखान्यातील मायभगिनींचे मोठेच योगदान लाभलेले आहे. मी लगेचच कारखान्यातील ठाकरबाई, शांताबाई, दळवी अशांना बोलावून घेऊन; ‘आपण या गाईला रोजचे दाणापाणी करून सांभाळाल का’ असे विचारले. त्यांनी तात्काळ हो म्हटल्यामुळे मी गायीला माझ्या कारखान्याच्या परिसरात संभाळायला सुरुवात केली. त्या गाईचा सांभाळ करत असताना, एक दिवस पुणे म.न.पा.चे आरोग्य खात्याचे एक इन्स्पेक्टर, ‘खडीवाले तुम्ही या गायीच्या गोठय़ाकरिता लायसेन्स का घेतले नाही’ असे विचारत राहिले. त्या इन्स्पेक्टर महाशयांना मी नम्रपणे विचारले, ‘आपल्या मातेला आपल्या घरी ठेवायला लायसेन्स घ्यावे लागते का हो?’ अशा प्रतिप्रश्नाबरोबर ते इन्स्पेक्टर साहजिकच निरुत्तर झाले.
आपला भारत हा ‘मंगलमय मातृत्वाचे स्तोत्र’ जपणारा देश आहे. आपल्या जन्मदात्या मातेबरोबरच आपण सर्वजण भारतमाता, गंगामाता व गोमाता या प्रकारे या तीन दैवतांचे पूजन, स्मरण नित्य प्रात:स्मरणात करत असतो. आपल्याकडे अनेकानेक धार्मिक कार्यक्रमांत यजमान मंडळी पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींना विविध प्रकारे दान करून सन्मानित करत असतात. एकदा एका यज्ञात पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींच्या दारात, संबंधित यजमानाने, खरोखरच एक गाय उभी केली. ते गरीब बिचारे भिक्षुक चक्रावून गेले. त्यांना कोणीतरी खडीवाल्यांचे नाव सुचविले. ते तडक माझ्याकडे आले. आपण ही गाय सांभाळाल का? असे विचारल्याबरोबर मी लगेच हो म्हटले. त्यांच्या हातावर काही रक्कम ठेवल्याचेही स्मरत आहे. पुणे शहरातील नारायण पेठेतील मुंजोबाच्या बोळात एक गृहस्थ उत्तम गायी सांभाळण्याबद्दल प्रसिद्ध होते. त्यांची कात्रजजवळ शेती होती. या गृहस्थांना काही आर्थिक अडचण आल्यामुळे आपल्या गोवंशापैकी त्यांनी एक उत्तम गाय, दादासाहेब, आपण तीन हजार रुपयांना घ्याल का, असे विचारले. मी लगेच त्यांच्या हातावर रक्कम ठेवली. माझ्या कारखान्यातील महिला या तीनही गायींची (त्यातील एक सवत्स धेनू) सेवा करत राहिल्या. या माझ्या गोपालन प्रेमामुळे साहजिकच आसपासच्या धार्मिक प्रवृत्तीच्या महिला कधी कधी ग्रोगास घेऊन येतात. दीपावलीच्या सुरुवातीला वसुबारसेला गोपूजनासाठी गर्दी लोटते. आता माझ्या दारी एक गोमाता आहे. अन्य गायी पुणे महानगराजवळच्या एका डोंगरावर संभाळल्या जात आहेत.
या आपणहून आलेल्या गोपालन छंदामुळे मला आर्थिक लाभ अजिबात नाही. उलट कडबा-कुट्टी या गायींची वैद्यकीय देखभाल याकरिता काही खर्च जरूर येतो. पण आंतरिक मानसिक समाधान मोठेच आहे. वाचक मित्रहो, आपणा सर्वाच्याच घरात आपल्या घरातील बायका-मुलीबाळी दागदागिने सांभाळतात. खूप खूप गुंतवणूक करतात व त्या दागिन्यांच्या सुरक्षिततेचीही काळजी करतात. हातात पाटल्या-बांगडय़ा, बोटात अंगठी, कानात महागडी कर्णफुले, गळय़ात सोन्याची चेन, मनगटावर महागडे घडय़ाळ असे संभाळण्यापेक्षा, एखादी गाय संभाळणे, ज्यांच्याकडे जागा जमीन आहे त्यांना अशक्य आहे का?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील विश्व हिंदू परिषद, भाजप, शेतकरी संघटना, विविध आमदार, खासदार, नगरसेवक व विविध राज्यांतील भाजप मंत्र्यांकडे गायी किती आहेत याचा शोध गोहत्याबंदीचा आग्रह धरणाऱ्यांनी जरूर घ्यावा. प्रत्येक प्रश्न कायदे करून सुटत नाही. स्वत:च्या अनुभवातून इतरांना आदर्श घालून द्यायला हवा. हे गोहत्याबंदी कायद्याच्या हट्टाकरिता भाषण देणाऱ्यांनी, लेख लिहिणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. तुमच्या आरोग्य-अनारोग्य सेवेकरिता गोमातेचे योगदान अनेक प्रकारे अधोरेखित आहे. गोदुग्ध तर अमृतासमान आहे. गोघृत, गोमय, गोमूत्र याची आपल्या विविध विकारांमध्ये मोठीच मदत होत असते हे संबंधितांना सांगावयास नकोच.
कायद्याने गोहत्याबंदी करून पुणे-मुंबई व अनेकानेक लहान-मोठय़ा शहरांतील, खाटिकखान्यातील कर्मचाऱ्यांना, विक्रेत्यांना, बेकार करून त्यांची रोजीरोटी हिरावून घेण्यात, हिंदुत्ववाद्यांना फुशारकी, बहादुूरी वाटते का? ‘कायदा गाढव’ आहे अशी एक सार्वत्रिक म्हण आहे. आज अनेक राज्यांत खुद्द वर्धा या महात्मा गांधींच्या पवित्र गावातही पूर्ण दारुबंदी कायदा अस्तित्वात आहे. पण तिथेही उघडणे दारू मुक्तपणे मिळतेच, अशी वस्तुस्थिती आहे. गोहत्याबंदी कायदा करून गोपालन होणार नाही. अपंग, मारकुटय़ा, अतीवृद्ध अशा गायींचे रोजचे पालन शेतकरी बांधवांनी कशाच्या जोरावर करायचे, हा प्रश्न कट्टर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी स्वत:ला एक दिवस विचारायला हवाच.
आपल्या समाजात जैनधर्मीय तुलनेने अल्पसंख्य आहेत. या मंडळींसकट अनेकांचा सर्व तऱ्हेच्याच मांसाहाराला विरोध असतो. हा विरोध वैद्यकीय व एकूण मानवी जीवनाच्या आरोग्याच्या दृष्टीने वाजवीच आहे. अनेकानेक जैन मंडळी व संस्था ठिकठिकाणी स्वयंस्फूर्तीने गोपालनाचे उत्तम कार्य करत आहे. ज्यांना गोमातेबद्दल परम प्रेम, आस्था व काळजी आहे अशा विविध पत्रपंडितांनी एक वेळ मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या, एकत्रित सरहद्दीवरच्या चित्रकुट येथील ‘आरोग्यधाम’ला जरूर भेट द्यावी. स्वर्गीय नानाजी देशमुखांच्या अथक परिश्रमातून, त्यांच्या वयाच्या ७६-७७ व्या वर्षी, त्या भूमीत शुद्ध भारतीय गोवंश प्रतिपालन केंद्र म्हणून एक उत्तम प्रकल्प सुरू झाला. तेथे फक्त स्वदेशी गायींचाच सांभाळ अत्यंत आरोग्यदायी वातावरणात होतो. मित्रहो, जम्मू-काश्मीर व केरळची पर्यटन सहल करण्यापेक्षा चित्रकुटला भेट द्या.
नानाजी देशमुख माझ्या पुणे मुक्कामी कारखान्यात आले होते. त्यांनी माझ्या गोशाळेला भेट दिली. तेथे एक विदेशी गाय होती. नानाजींनी मला विचारले, ‘तू ही गाय का सांभाळतो?’ मी त्यांना नम्रपणे उत्तर दिले, ‘देशी-विदेशी दोन्ही गायी सारख्याच. त्यांच्यात फरक काही नाही.’ नानाजींनी माझे लगेचच बौद्धिक घेतले. आपली देशी गाय कशी हंबरते, तिच्या चेहऱ्यावर कारुण्याचे कसे भाव असतात हे तू जरूर बघ. विदेशी गायीचा आवाज व तिची चर्या तुला खरेच आकर्षक वाटते का? असे बघावयास मला सांगितले असो. नानाजींपुढे एक छोटा वैद्य काय बोलणार! मला अजूनही असे वाटते की संबंधितांनी देशी गाय नाही मिळाली तर किमान विलायती एक गाय सांभाळून बघावी.
जय गोमाता!

More Stories onबीफ
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beef ban in maharashtra
First published on: 10-04-2015 at 01:28 IST