काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर ‘पूरब से सूर्य उगा’ असं एक गाणं लागायचं. भारत सरकारच्या साक्षरता अभियानाची ती जाहिरात होती. त्या अभियानाचं पुढे काय झालं ते माहिती नाही. पण त्यातून साक्षर झालेल्या जनतेसमोर लवकरच एक नवीन आव्हान निर्माण झालं. कॉम्प्युटरचं. नंतर त्या जनतेने महत्प्रयासाने कॉम्प्युटरसुद्धा शिकून घेतला. पण आता परत त्याच जनतेसमोर आणखी एक आव्हान निर्माण झालं आहे. त्याच जनसमुदायाचा मी एक प्रतिनिधी आहे. ‘मलासुद्धा स्मार्ट फोन वापरता येत नाही.’ नाही म्हणायला माझ्या मित्रांचे स्मार्ट फोन मी एक-दोन वेळा वापरायचा प्रयत्न केला आहे, पण त्यातून फार काही निष्पन्न झालं नाही. स्मार्ट फोन्सविषयी माझा मूलभूत प्रश्न असा आहे की, स्मार्ट फोन वापरायला जर माझा स्मार्टनेस वापरावा लागत असेल तर त्या फोनला स्मार्ट का म्हणायचं?
त्या दिवशी माझ्या भावांसोबत गप्पा मारत असताना मी म्हणालो, ‘‘मला नवीन फोन घ्यायचा आहे. स्मार्ट फोन घ्यायचा विचार आहे.’’
ते ऐकून त्या दोघांचा चेहरा इतका गंभीर झाला की जणू काही मी त्यांना ‘माझी भारतरत्नसाठी शिफारस करा’ असं म्हणालोय!!!!
पण ते दोघंही मला चांगलंच ओळखत असल्यामुळे त्यांच्या गांभीर्याचं कारण मला कळत होतं. जगातल्या कोणत्याही विषयावर माझं नसलेलं ज्ञान मी पाजळू शकतो, पण मोबाइलचा विषय निघाला की मी गप्प बसतो. पण आता स्मार्ट फोन घ्यायचाच असं मी ठरवलं. माझ्या दोन्ही भावांनी मला मदत करायचं मान्य केलं. मग त्या दोघांची अगम्य भाषेत चर्चा सुरू झाली. माझं बजेट त्यांनी परस्पर ठरवलं. अधूनमधून ‘नोकिया’, ‘सॅम्संग’, ‘सोनी’ अशी नावं मला ऐकू येत होती.
नंतर श्रीकांत म्हणाला, ‘‘अरे नोकिया चांगला आहे, पण त्याच्यात विंडोज 8 ओएस आहे.’’
व्वा !! नोकिया, विंडोज आणि ओएस हे तीनही शब्द माझ्या ओळखीचे होते. मी खूश झालो.
पण दादा लगेच म्हणाला, ‘‘हो!! आणि विंडोज 8 याला वापरता येणार नाही.’’ दोघेही हसले.
शेवटी मी न राहवून म्हणालो, ‘‘अरे, विंडोज ही मला माहिती असलेली एकमेव ओएस आहे. थोडीफार जमेल ना मला.’’
‘‘तू शांत बस. माझ्या लॅपटॉपमध्ये विंडोज 8 च आहे,’’ दादा म्हणाला.
आणि मी खरंच शांत बसलो. दोन दिवसांपूर्वी दादाचा लॅपटॉप वापरत असताना तो बंद कसा करायचा हे मी अर्धा तास शोधत होतो. (म्हणजे अध्र्या तासाने मला यश मिळालं असं नाही. नंतर मी प्रयत्न करणं सोडून दिलं.) नवीन ओएस तयार करताना सगळं काही बदललं तर चालेल, पण कॉम्प्युटर सुरू आणि बंद करण्याची पद्धत का बदलावी लागते हे माझ्या आकलनशक्ती पलीकडलं आहे. असो.
तर अशा रीतीने माझं मोबाइल पुराण सुरू झालं. त्यानंतर रोज ते दोघंही मला नवीन नवीन मोबाइलची नावं सांगत होते आणि रोज वेगवेगळ्या वेबसाइटचे नाव सांगून इथे जाऊन ‘हे चेक कर, तिथे जाऊन ते चेक कर’ असं सुरू होतं. त्या वेबसाइटवर गेल्यावर मोबाइलचे वेगवेगळ्या कोनातून काढलेले फोटो दिसायचे आणि त्याखाली अगम्य भाषेत काहीतरी लिहिलेलं असायचं. पण मी आधी कुठेतरी कोपऱ्यात लिहिलेली किंमत वाचायचो. १६ हजार ८०० ओन्ली!! १८ हजार ३०० ओन्ली!!! २० हजार ५०० ओन्ली!!! ओन्ली लिहून या लोकांना काय सांगायचं असतं देव जाणे. मला मिळालेला पहिला पगार याच आकडय़ांच्या जवळपास होता. आता थोडा जास्त मिळत असला तरी तिथे पोहोचायला पाच-सहा र्वष लागली. आणि यातला कोणताही फोन घेतला तरी तो आउटडेटेड व्हायला पाच-सहा महिने पण लागणार नाहीत. पण दादा म्हणाला, ‘‘अरे आजकाल कॉलेजच्या मुलांकडे चांगले फोन असतात तर तू कशाला इतका विचार करतो?’’
कॉलेजची मुलं एवढय़ा महागाचा फोन का वापरतात? म्हणजे कॉलेजमध्ये अभ्यास किंवा लेक्चर अटेंड करा असे सल्ले मी देणार नाही; पण इतर प्रेक्षणीय गोष्टी बघायच्या सोडून मोबाइलच्या स्क्रीनकडे बघण्यात काय सुख असतं?
मी एका नातेवाइकांकडे गेलो होतो. त्यांच्याकडे त्यांच्या नात्यातला एक मुलगा राहात होता. तो इथेच शिकतो अशी त्यांनी ओळख करून दिली, पण त्याने माझ्याकडे बघितलंसुद्धा नाही. देवाशप्पथ सांगतो त्यानंतरचे दोन तास मी त्याचा चेहरा बघायला धडपडत होतो. पण तो सतत त्याच्या मोबाइलकडेच बघत होता. आणि नंतर त्याच मोबाइलवर कोणाचा तरी फोन आला म्हणून तो निघून गेला.
असो. तर आपल्या पहिल्या पगाराएवढे पैसे खर्च करून मोबाइल घ्यावा का, या विचारात मी पडलो. पण माझ्या दोन्ही भावांनी माझं मन वळवलं आणि शेवटी मी स्मार्ट फोन घेतलाच. नंतरचे काही दिवस तो शिकण्यात गेले. आता मी पण स्मार्ट झालो आहे. समोर कोणीतरी माझ्याशी बोलत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून हातातल्या फोनकडे बघणं आता मला जमायला लागलं आहे. ‘आज संध्याकाळी आपण भेटू’ असा मेसेज व्हॉटस् अ‍ॅपवर मित्रांना पाठवून, संध्याकाळी ते भेटल्यावर व्हॉटस् अ‍ॅपवर तिसऱ्याच मित्राशी बोलणंसुद्धा मी सुरू केलं आहे. थोडक्यात आइनस्टाइननी म्हटलेलं वाक्य मी आता खरं करून दाखवतोय.
”A day will come when technology will surpass humanity. And we will have generation of idiots!!”
– Albert Einstein