गेल्या काही दिवसांपासून स्वत:साठी घर शोधण्याची मोहीम सुरू आहे. आजकाल घराला ‘फ्लॅट’ असे म्हणतात. पुण्यासारख्या शहरात जर ‘फ्लॅट’ बुक केला असेल तरच त्या माणसाने आयुष्यात काहीतरी मिळवलंय असं मानलं जातं. कारण भेटणारा प्रत्येक दुसरा माणूस तुम्हाला ‘काय, कसे सुरू आहे?’ हे विचारून झाल्यावर ‘काय फ्लॅट वगैरे बुक केला की नाही अजून?’ असा प्रश्न विचारून जातोच. आणि त्याचे उत्तर जर ‘हो’ असेल तर पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला काहीही अर्थ उरत नाही. फ्लॅट घेतल्यावर माणसाचे ‘बरं चाललंय’ हे उत्तर खरं असूच शकत नाही. तो बिचारा ईएमआय आणि डाऊन पेमेण्ट या दोन शब्दांनी पुरता मेटाकुटीला आलेला असतो. जवळपास २० वर्षांच्या कालावधीनंतर भेटलेल्या एका नातेवाइकाने मला वरील प्रश्न विचारला, त्यावर ‘नाही’ असे उत्तर ऐकल्यावर ते म्हणाले, ‘‘अरे काय? अजून किती दिवस भाडय़ाच्या घरात राहणार? करा काहीतरी!’’ त्यांची ही प्रतिक्रिया ऐकल्यावर माझ्या डोक्यात आलेला सगळ्यात पहिला विचार आला, तो म्हणजे, ‘‘मी म्हशीच्या गोठय़ात जरी राहिलो तरी ह्यच्या बापाचं काय जातं?’ ते गृहस्थ अजूनही गावात वडिलोपार्जित वाडय़ात राहत असल्याचं मला नंतर कळलं!
असो. तर लोकाग्रहास्तव म्हणा किंवा स्वत:ची गरज म्हणा, पण आम्ही फ्लॅट शोधण्याची मोहीम सुरू केली. थोडीबहुत चौकशी केल्यावर कळलं की साधारण चार माणसांचा महिन्याचा किराणा आणि पेट्रोलच्या खर्चात एक स्क्वेअर फूट जागा मिळते. तीसुद्धा किराणा, पेट्रोल ज्या ठिकाणी मिळते तिथून ८-१० किलोमीटर दूर!! जसं जसं जवळ येऊ तशी तशी किंमत वाढेल. मग हळूहळू आम्ही बिल्डर्सच्या ऑफिसेसमध्ये जाऊ लागलो. सुरुवातीला काही मोठय़ा बिल्डर्सचे ऑफिस बाहेरूनच बघून आत जावं की नाही अशी भीती वाटायची. पण नंतर आम्ही सरावलो. आत गेल्यावर एखादी आकर्षक रिसेप्शनिस्ट मुलगी आपलं स्वागत करते. थोडंसं ‘हाय- हॅलो’ करून हळूच आपलं बजेट किती वगैरे ही माहिती काढून घेते. आपल्या बजेटचा आकडा जर कमी असेल (बहुधा असतोच!) तर तिच्या चेहऱ्यावरचे भाव आपोआप बदलतात (मग आपल्याला बसायला सांगून ती निघून जाते. आणि नेमके त्याच दिवशी तिचे सर इतके बिझी असतात की आपल्याला भेटू शकत नाही. मग ती आपल्याला ‘प्रोजेक्ट प्लान’ आणि ‘कॉस्टिंग शीट’ देऊन आपली बोळवण करते). पण चुकून जर आपल्या बजेटचा आकडा तिच्या अपेक्षेप्रमाणे असेल तर लगेच ती सरांना भेटायला आतल्या केबिनमध्ये घेऊन जाते. मग सर बोलायला सुरू करतात.
‘‘सर, आमचा हा प्रोजेक्ट इतक्या इतक्या एकरांवर पसरलेला आहे. आसपास असं असं निसर्गसौंदर्य आहे. आम्ही अमुक अमुक फेजेस बांधतो आहोत.. वगैरे वगैरे..’’
खरं म्हणजे आपल्याला दोनच गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. घराचा एरिया किती? भाव किती? पण या गोष्टी सर आपल्याला सगळ्यात शेवटी सांगतात. आणि दोघांचा गुणाकार ऐकून आपण तिथून निघून जातो.
पण काहीही असो, यांच्या सोसायटय़ांची नावं मात्र ऐकण्यासारखी असतात. ‘नेस्टोरिया’, ‘ओनेलिया’, ‘ग्रेसिया’, ‘रोझ व्हिला’, ‘प्रिस्टिन गार्डन’. नाव ऐकल्यावरच आपण साहेबाच्या देशात आल्यासारखे वाटते. पण मला सांगा नेस्टोरिया धनकवडी, ओनेलिया हांडेवाडी, ग्रेसिया तळेगाव ढमढेरे, रोझ व्हिला कोंढवा बुद्रुक असे पत्ते साहेबाच्या देशात असतील का हो? असो. दुसरी ऐकण्यासारखी गोष्ट म्हणजे साइट लोकेशन. ते लोकेशन शहरापासून कितीही लांब असो, तरीसुद्धा ते एकतर ‘मोस्ट डेव्हलप्ड’ तरी असतं किंवा ‘नेक्स्ट डेस्टिनेशन’ तरी असतं. आसपास सगळीकडे जंगल जरी असलं तरी तिथे लवकरच शॉपिंग मॉल किंवा आयटी पार्क होणार असतो. शिवाय समोर ओसाड पडलेल्या जागेवर एक ६० मीटर रुंद रस्ता मंजूर झालेला असतो. जो एकीकडे विमानतळ आणि दुसरीकडे डायरेक्ट हिंजेवाडीला जाऊन मिळणार असतो. तो रस्ता कोणी मंजूर केला? कोण बांधणार आहे? कधी बांधणार आहे? असले मूर्खासारखे प्रश्न विचारायचे नसतात.
एक साइट लोकेशन बघायला गेलो असताना मी तिथल्या माणसाला जास्त किमतीचे कारण विचारले. तो म्हणाला, ‘‘साहेब इथून हायवे एकदम जवळ आहे.’’ आता हायवे आणि ते लोकेशन याच्या मध्ये साधारण तीन डोंगर होते आणि कच्च्या रस्त्याने हायवेपर्यंत जायला वीस मिनिटे लागत होती!! बरं समजा, लोकेशन हायवे टच जरी असलं तरी त्याचा दैनंदिन जीवनात काय उपयोग असतो? आपल्या मुलांना जर क्रिकेट खेळायचं असेल तर ते हायवेवर जातील का? हायवेवरच्या वाहनांचा आवाज आणि उडणारी धूळ यांचा काय उपयोग? जास्त पैसे नक्की मोजायचे कशासाठी?
सोसायटीमध्ये मिळणाऱ्या अॅमिनिटीज ही आणखी एक मजेदार बाब आहे. प्रत्येकी १२ मजल्यांच्या २२ इमारती असलेल्या एका लोकेशनवर मी गेलो होतो. तिथे स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, गार्डन, जीम इ. सगळ्या सुविधा होत्या. मी न राहवून एक प्रश्न विचारला, ‘‘२२ इमारती बांधल्यावर सूर्य दिसेल का हो? की त्यासाठी वेगळा अॅमिनिटी चार्ज द्यावा लागेल?’’
याशिवाय आपल्या लोकेशनपासून सगळ्याच गोष्टी किती जवळ आहेत याचा हिशेब अंतरात नाही तर मिनिटांत दिला जातो. दिलेला वेळ हा बहुतेक विमानप्रवासाचा असावा, असा माझा अंदाज आहे. उदा. खराडी बायपास ते पुणे स्टेशन हे साधारण १० किमी अंतर १७ मिनिटे असं दाखवलेलं असतं. दिवसातल्या कोणत्याही वेळी हे अंतर १७ मिनिटांत पार करता येत नाही. विमानाने बहुधा शक्य असावं.
जागेचे दर वाढवण्याची कारणं तर अनाकलनीय असतात. अक्षरश: ‘खूप दिवसांत भाव वाढवलाच नव्हता म्हणून वाढवला’ अशी कारणंसुद्धा सांगण्यात येतात. प्रस्तावित विमानतळ, मेट्रो, आयटी पार्क याच्या नावाखाली भाव वाढवले जातात. आपल्या नातवाच्या लग्नापर्यंत ते विमानतळ बांधून होत नाही. आणि बांधून झालंच तर नातू विमानात बसून परदेशात स्थायिक व्हायला जातो. मग आयुष्यभर आपण उडणारी विमानं बघायची!
असो. तर घर शोधण्याचं कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सगळी गणितं जमून आली तर घर नक्की होईल. मग उरलेलं आयुष्य ईएमआयरूपी गणितं सोडवायची आहेतच!!!
चिनार जोशी