अनेक प्रयत्नांनंतर फोनवर संपर्क साधल्याने बरे वाटले.

‘‘कसा आहेस? आणखी काही तपासण्या केल्यास का?’’

‘‘हो सगळे तपासून झाले. रक्तातल्या कारसिनो तब्रीऑनिक अ‍ॅन्टिजनपासून ते कोळोनो स्कोपी टय़ुमर बायोप्सी बेरिअस एनिमा सी. टी. स्कॅन सगळे करून झालेय.’’

त्याने सगळ्या तपासण्यांची जंगी एका दमात सांगितली. तो स्वत: बायोकेमिस्ट्रीमधला पीएचडी, अमेरिकेतल्या मेडिकल कॉलेजात तब्बल वीस वर्षे  शिकवण्याचा अनुभव. पीएचडीसाठी निवडलेला विषयच कर्करोगाच्या उपचारातल्या औषधांना मिळणाऱ्या अपयशाबद्दलचा. त्या संशोधनावर प्रभावित  झाल्याने त्याला पुढील संशोधनासाठी परदेशीची शिष्यवृत्ती मिळाली. त्याने तिथे केलेली हेवा वाटण्यासारखी प्रगती मला ठाऊक होती. शाळा- कॉलेजात आम्ही एकत्र वाढलो, बहरलो. चढाओढीने आलटून पालटून पहिला-दुसरा क्रमांक मिळवीत होतो. मुलासह तो अमेरिकेत स्थायिक झाला तरी आई-वडिलांना भेटायला वर्ष-दोन वर्षांतून भारतात येत राहिला. न चुकता मला भेटत होता. आयुष्यातले चढउतार एकमेकांच्या परिचयाचे. एवढी मैत्री मोकळीढाकळी. मी पहिली सिगारेट ओढली ती त्याच्या साथीनेच. ऐपत नसतानासुद्धा कॉलेजातून मिळणाऱ्या सवलतीमुळे सुट्टीत भारतभर भटकलो. मी त्याला सर्वात जवळचा मित्र समजायला लागलो. म्हणूनच त्या तपासण्यांत आतडय़ाच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर भांबावलो. त्यानेच मला तसे कळवले होते. बहुधा इथे आल्यावर त्याला कळले असावे. मी उपनगरांत आणि तो दादरला राहात असल्याने तसे भेटणे मुद्दाम ठरवूनच शक्य होते.

‘‘हे बघ आज तिकडे येणारच आहे, तू घरीच आहेस ना?’’

‘‘मी घरीच आहे, पण तू येऊ नकोस.’’

मी उडालोच. तिथे जाण्याची तयारी गेले दोन दिवस करीत होतो. जाण्या-येण्यासाठी सर्व दिवस मोकळा ठेवावा लागला.

‘‘मी तुझा फारसा वेळ घेणार नाही. गेल्या दोन वर्षांत भेटता आले नाही.’’ आणि नंतर तू इलाज करण्यासाठी व्यस्त असशील तेव्हा वेळ मिळणे कठीण होईल.

‘‘ते ठीक आहे, पण मला कुणालाच भेटावेसे वाटत नाही. तुलासुद्धा.’’ मी तर गप्पच झालो. ‘‘मी मुद्दाम कुणालाच सांगितले नाही तरी शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना सुगावा लागलाच. नंतर मग मला भेटायची चढाओढच लागली. गेल्या दहा वर्षांत न भेटणारे आवर्जून भेटायला आले. या सगळ्याला वैतागलो आहे. मला तशी कौतुकाची अपेक्षा कधीच नव्हती, पण उबग आणणारी गोष्ट म्हणजे अनुकंपेच्या आडून केलेली कीव. ते मला सहन होत नाही. मी अगदी सुदृढ आहे. खाण्यापिण्यात,  चालण्या-फिरण्यात कसलीच अडचण नाही. मला हे पण ठाऊक आहे की, हा आजार आता घाबरण्यासारखा राहिला नाही. वेळीच निदान झाल्याने मी संपूर्ण बरा होणार आहे. माझे नाटके बघणे, पुस्तक वाचणे व्यवस्थित चालू आहे. मला भेटायला येणाऱ्यांना त्याचे आश्चर्य वाटते. ते तेवढय़ावरच थांबत नाहीत. सगळ्यांनी मला उपकृत करायचा चंगच बांधलाय. कुणी तरी शिर्डीहून उदी आणलेली असते. विनायकचा किंवा तिरुपतीवरून लाडूचा प्रसाद. अगदी अजमेरहून दग्र्याचा ताईतसुद्धा. एका नातेवाईकाने महामृत्युंजय जपाची तयारी करता करता सात ब्राह्मणांना आरक्षित करून टाकले. या सर्वानी माझे निर्वाण गृहीत धरलेच. ते मला सहन होत नाही म्हणून मी ठरवलंय कुणालाच भेटायचे नाही. कुणीही इथे आले तरी शेजारी उत्सुकतेने घरात डोकावतात गैरसमज करू नकोस. मला ठाऊक आहे, तू माझी कीव करायला येणार नाहीस. तरीपण धीर देणे म्हणजे पण त्याचाच वेगळ्या नावाचा प्रकार नसतो का?’’
डॉ. वसंत चव्हाण – response.lokprabha@expressindia.com