आमच्या तिन्ही कर्तबगार मुलींविषयी विचारून झाल्यानंतर ‘तुम्हाला मुलगा नाही?’ असा खोचक प्रश्न विचारला जातो तेव्हा आमची अवस्था फार केविलवाणी होते. आमच्या मुलींच्या कर्तबगारीचे आम्हाला जेवढे अप्रूप वाटते तितकेच ते इतरांनाही वाटले पाहिजे, असा माझा आग्रह नाही. कदाचित आमच्या म्हातारपणाची त्यांना चिंता वाटत असल्यामुळे ते आस्थेवाईकपणे चौकशी करत असतील. परंतु ज्यांना किमान एकतरी मुलगा आहे असे सारे आई-बाप खरोखरच सुखी असतील का, असा प्रश्न मनात उभा राहतो.
मुलगा प्राचार्य असूनही त्याच्या आलिशान बंगल्याच्या आऊट हाऊसमध्ये दीनवाणे राहणारे त्याचे आईवडील मी पाहिले आहेत. भाजीविक्री करून स्वत:चा व बायकोचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या माझ्या नातेवाईकाची तिन्ही मुलं सुस्थितीत आहेत, परंतु आईबापांपासून वेगळी राहतात. दोन्ही मुलं शहरात स्थायिक झालेल्या दुसऱ्या एका असहाय नातेवाईकास मंदिराबाहेर भीक मागून पोट भरावे लागले. परवा मी निवृत्तिवेतन काढण्यासाठी बँकेत गेलो होतो. एक वयस्क गृहस्थ हताशपणे बसले होते. पेन्शन काढण्यासाठी त्यांचा मुलगा त्यांना बँकेत घेऊन आला होता. काढलेल्या पैशातून दहा रुपयांची नोट बापाच्या हातावर ठेवून तो निघून गेला.
एकुलता एक मुलगा खूप शिकला आणि परदेशी निघून गेला. तिकडेच त्याचे दोनाचे चार आणि चाराचे आठ झाले. एकदा त्याला त्याच्या म्हाताऱ्या आई-बापाची आठवण आली म्हणून तो कुटुंबकबिल्यासह भारतात आला. नेत्रं आणि गात्रं थकलेल्या मातापित्यांचा आनंद गगनात मावेना. म्हातारा म्हणाला, ‘बाळा, हा भलामोठा वाडा, शेतीवाडी सारं काही तुझंच आहे. तिकडचा कारोबार आटोपून परत ये. आपण सारे जण एकत्र राहू. नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवण्यासाठी आम्ही आसुसलो आहोत..’ मुलगा म्हणाला, ‘बाबा, माझी बायको तिकडची. मुलंही तिकडंच जन्मली; वाढली. इकडचे वातावरण त्यांना मानवणार नाही. तुम्ही दोघंही आमच्याबरोबर तिकडे चला. आपण सारे मजेत राहू.’ आईवडील काही बोलले नाहीत. मातीच्या भिंतीतला ओलावा आणि काळ्या आईची माया अनुभवलेली व्यक्ती त्यांच्यापासून दूर जायला सहसा तयार होत नाही. दुसऱ्या दिवशी मुलगा म्हणाला, ‘आई, बाबा, आपला हा वाडा केव्हा पडेल सांगता येत नाही. शेती परवडत नाही. ऐका माझं. वाडा आणि शेती आपण विकून टाकू..’ आई म्हणाली, ‘अरे मेल्या, किल्लारीच्या महाविनाशकारी भूकंपातदेखील मी, तुझा बाप आणि आपला हा भक्कम वाडा, यातले कुणीही कोसळले नाही. शेतीचं म्हणशील तर तिची मशागत करणं हा आमचा श्वास आहे..’
हो-ना करत आईबाबा चिरंजीवाबरोबर परदेशी जायला तयार झाले. वाडा, शेत विकले गेले. आईबाबा दिवसभर शेतातल्या चिरेबंदी विहिरीच्या कठडय़ावर बसून रड रड रडले. त्यांच्या डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूंना भेटण्यासाठी विहिरीतले पाणी हातभर वर चढले. एरवी झाडाझुडपांवर किलबिलाट करणारे पक्षी त्या दिवशी चिडीचूप झाले होते. गाईगुरं हंबरली नाहीत, मोत्या कुत्रा रानडुकरांवर भुंकला नाही. संध्याकाळी घराकडे निघताना बाबांनी शेतातली मूठभर माती आपल्या रुमालाच्या कोपऱ्यात बांधून घेतली.
दुसऱ्या दिवशी सकाळी दोन टॅक्सी वाडय़ासमोर येऊन उभ्या राहिल्या. एका टॅक्सीत आईबाबा, त्यांचे सामान भरले गेले. दुसऱ्या टॅक्सीत मुलगा, सून आणि त्यांची मुलं.. सुसाट वेगाने निघालेल्या दोन्ही टॅक्सी मुंबईत गेल्यानंतर एक टॅक्सी विमानतळाच्या दिशेने गेली तर दुसरी एका वृद्धाश्रमाच्या दारात जाऊन उभी राहिली. डबघाईला आलेला परदेशातला धंदा सावरण्यासाठी वडिलोपार्जित घर, शेती विकायला लावणाऱ्या मुलाने आईबाबांची व्यवस्था वृद्धाश्रमात केली होती, हे त्या अभागी मातापित्याला तिथे गेल्यावर समजले.
माझी मुलगी पुण्यात शिकत होती तेव्हा बँकेत मी आम्हा दोघांचे संयुक्त खाते उघडले होते. त्यालाही बरेच दिवस झाले. स्वेच्छानिवृत्तीनंतर आयुष्याच्या संध्याकाळी गावाकडे आपल्या स्वत:च्या मालकीचे एक घर असावे म्हणून मी उस्मानाबादला एक सदनिका घ्यायचे ठरवले. त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद मी आधीच करून ठेवलेली असताना, आपले बाबा नवीन घर घेत आहेत हे समजल्यानंतर माझ्या मुलीने आमच्या संयुक्त खात्यात काही रक्कम जमा केली. म्हणाली, ‘अप्पा, घर घ्यायला पैसे कमी पडतील. असू द्या.’ स्वत:चा विचार न करता इतरांसाठी सतत पदरमोड करणाऱ्या माझ्या या वेडय़ा कोकराला काय म्हणावे? भवसागरात स्वत:च्या संसाराची नौका हेलकावे खात असताना ती किनाऱ्याला कशी लागेल याचा विचार करायचा सोडून ही आईबाबांचीच काळजी करते आहे. तीन कन्यारत्नांशिवाय मी माझ्या बायकोच्या अंगावर एकही अलंकार घातला नाही. पहिल्या पगारात एकीने आईला सोन्याच्या पाटल्या केल्या, दुसरीने मला महागडा ड्रेस घेऊन दिला, तर तिसरीने आईच्या डोळ्याचे ऑपरेशन केले आणि तेही हे सारे करायला मी समर्थ असताना! आम्हाला आमच्या मुलींचा यथार्थ अभिमान वाटतो. मुलगा नसल्याची जराही खंत वाटत नाही. तरीही लोक विचारतातच, ‘तुम्हाला मुलगा नाही?’
सोमनाथ देशमाने