‘विश्वास’, म्हणावे तर किती छोटा शब्द. पण सारे विश्व सामावण्याची ताकद असणारा. ‘विश्वास’ नसणारा एकही असामी या पूर्ण जगात शोधून सापडणार नाही. मग तो विश्वास कुणावरही असू शकतो. माता, पिता, गुरू, शिक्षक, देव, दानव, दगड, माती, निसर्ग इतकेच काय गेला बाजार आपला जीवन साथी. फक्त एवढेच की या पती-पत्नीचा विश्वास काहीसा वेगळा असतो एवढेच. लग्न होताच या विश्वासाची झलक सुरू होते व जीवनाच्या अंतापर्यंत कायम राहाते.

‘मला पक्का विश्वास होता तुम्ही आज नक्की ढोसून याल’ हे शनिवारी रात्री घरात प्रवेश करताच हमखास कानावर पडणारे घोषवाक्य. पुढे पुढे तर पत्नीच्या विश्वासाला तडा जाऊ नये या उदात्त भावनेने पती महोदय इच्छा नसतानाही ढोसण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम पार पाडतात. ‘आलात ना ढोसून’ हे खास ब्रीदवाक्य ऐकले नाही तर कट्टर मद्यपींना शांत निद्रा येत नाही व अशांना निद्रानाशाचा विकार जडतो. समस्त निद्रानाशाचे रोगी हे या आपल्या प्रिय पत्नीच्या विश्वासास पात्र न ठरल्याचे बळी ठरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा पत्नीचा विश्वास भूत म्हणून इतका मानगुटीवर बसतो की कधी कधी कामामुळे उशीर झाला तर फोनवर पत्नीचे ‘हं, मला पुरता विश्वास होता तुम्ही आज ढोसणार आहात,’ असे शब्द कानी पडताच कृतकृत्य होते. आता प्रिय पत्नीचा विश्वासघात करणे रक्तातच नसल्याने, पत्नीची नाराजी ओढविणे आपल्यासारख्या पामरास यत्किंचित ही परवडणारे नसल्याने नाइलाजाने पाय दारू दुकानाकडे वळवून केवळ पत्नीच्या विश्वासासाठी ते कटू पेय प्राषन करण्याची कसरत करावी लागते. पत्नीच्या फोनमुळे डोक्यात पिण्याचे विचार नसतानाही पत्नीने स्मरण करून दिल्याने या अलभ्य लाभाचा फायदा घेणे हे प्रत्येक मद्य प्राशन करणारा आपले परम कर्तव्य समजतो.

पत्नीने काही आणायला सांगितले व त्यातले काही विसरले की हा संवाद पुनश्च कानी पडतो. मला विश्वास होता तुम्ही काही तरी विसरणारच. आता हा विश्वास पत्नीला कसा येतो हा संशोधनाचाच विषय होऊ शकतो. पण पत्नीला काहीही विचारायचे नसते हा अलिखित नियम असतो व या नियमाला अपवाद नसतो हे एव्हाना दोन-तीन वर्षांचे नवरोजी झालेल्याच्या लक्षात आलेले असते. बरे पत्नी सांगतानाच अशी एखादी वस्तू हमखास सांगते की, ती विसरायलाच पाहिजे व पुढे पुढे तर पतीला विसरण्याची सवयच लागते. ही सवय कधी रोगाचे रूप धारण करते हे समजून ही येत नाही. बरे वस्तू विसरणेपर्यंत ठीक आहे पण ही लागण अशी पसरते की पत्नीचा वाढदिवस, लग्नाचा दिवस इतकेच काय मुलांचे वर्गही विसरणारे महाभाग आहेत. लग्नाचा वाढदिवस एक वेळ विसरणे ठीक आहे. तो मनहूस दिवस लक्षात राहावा अशी या पृथ्वीतलावरील कोणत्याही नवरोबांची इच्छा नसावी. पण मुलांचे वर्ग तर लक्षात राहायला हवेत. पण तेथेही गडबड होते व ‘मला पक्का विश्वास आहे यांना आपली मुलं कोणत्या क्लासमध्ये आहेत हे माहीत नाही’ आणि हा गुगली ऐकताच पतीदेव गोंधळतात व पाचवी की सहावी यात गोंधळ उडतो. पत्नीच्या या विश्वासालाही तडा जात नाही. पत्नीचा हा विश्वास दिवसागणिक तिच्या वजनासारखा वृिद्धगत होत जातो. पती-पत्नीचे नाते हे अशा विश्वासावरच टिकून राहते. हा पत्नीचा विश्वास जो पती राखतो, विश्वासाला तडे जाणार नाहीत, आपल्या मार्फत आपल्या पत्नीचा विश्वासघात होणार नाही याची जो पती अहोरात्र काळजी घेतो त्याच पती-पत्नीचा संसार अगदी सुखात सुरू असतो. पती परमेश्वर ‘विश्वासा’च्या नावाखाली आपले सर्व कार्यक्रम बिनदिक्कत सुरू ठेवतो व पत्नी आपल्या विश्वासाप्रमाणे पती वागत आहे यात खूश असते. या विश्वासाला तडा जाण्याचे प्रसंगही कधी कधी येतात. दुकानात साडी घ्यायला गेल्यानंतर पतीने महागाची साडी पसंत केली की लगेच ‘माझा विश्वास नाही बसत, चिमटा घ्या बरं मला’ अशी पत्नीची प्रतिक्रिया असते. खरं म्हणजे जोरात करकरून चिमटा घ्यायची पतीची इच्छा असते, पण त्यानंतर निघणाऱ्या पत्नीच्या चित्रविचित्र आवाजाला घाबरून इच्छा मारावी लागते. न सांगता एखादे गिफ्ट पतीने आणले तर ‘माझा विश्वासच नाही बसत तुमची इतकी चांगली निवड आहे म्हणून,’ अशी मुक्ताफळे ऐकावी लागतात. आता या माऊलीला कोणी सांगावे की तुलाही पतीनेच निवडले होते. ‘कोणी महामाया सोबत होती का हो गिफ्ट घेतांना?’ अशी विचारणा मात्र न चुकता होते हे सांगणे न लगे. पत्नी कुठे दोन-तीन दिवसांसाठी बाहेर गेली (अशी संधी फार कमी येते तो भाग वेगळा) व आल्यावर तिला घर अगदी साफ आवरलेले दिसले की ‘अय्या, इतके आवरलेले घर, माझा विश्वासच बसत नाही,’ असे वाक्य हमखास ठरलेलेच. जणू काही पती व मुले हे घरात आवराआवर न करता पसारा करण्यात तरबेज आहेत असाच त्या माऊलीचा विश्वास असतो व बहुतेक वेळा हा विश्वास सार्थ ठरविला जातो तो भाग अलाहिदा. चुकून जर एखादे वेळी बाजारातून भाजी चांगली आणली तर परत हा संवाद कानी पडतो. भाजी घेणे किती गौण काम, पण तेही आपला पती चांगल्या प्रकारे करूच शकत नाही असा दुर्दम्य विश्वास त्या माऊलीला असतो. आपल्या प्रिय पत्नीचा हा विश्वास तुटू नये म्हणून पती बिचारा चुकांचा पुतळा बनतो. पण त्याला हे चांगले ज्ञात असते की, या विश्वासाच्या भरोशावरच आपल्या संसाराचे गाडे रखडत रखडत का होईना पण बिनदिक्कत सुरू आहे. या पत्नीच्या विश्वासाला जर तडा गेला तर आपल्या संसाररूपी िभतीलाही तडे जातील व हे तडे बुजविण्याची कला कोणत्याही कारागिराला अवगत नाही हे तो पती नावाचा प्राणी जाणून असतो. आता ज्या पतीचे नाव ‘विश्वास’ असेल त्याची किती पंचाईत होत असेल. ‘विश्वास, माझा पक्का विश्वास होता’, ‘विश्वास, माझा तर विश्वासच बसत नाही’ असे विश्वास या शब्दाचे डबल उपयोग केलेली वाक्यं त्या विश्वास नावाच्या पतीस श्रवण करावे लागत असतील. त्याच्या माता-पित्यांनी किती विश्वासाने नाव ठेवलेले असते ते लग्नानंतर असे फरफटले जाईल हे कोणालाही विश्वसनीय वाटणार नाही. या ‘विश्वास’ शब्दाने वाचकांचा श्वास कोंडण्याच्या आधी आपण थांबावे या विश्वासाने पूर्णविराम घेतो.
संजय पांडे – response.lokprabha@expressindia.com