उमलत्या वयातल्या मुलांना नीट समजून घेऊन, त्यांच्या कलाने घेत, त्यांचे भावनिक कंगोरे समजून घेत वाढवलं, त्यांच्याशी नीट चर्चा केली, समजावून सांगितलं की मुलांना ते नीट पटतंही!

किशोरवयीन मुलांच्या पालकांनी त्यांच्याशी सातत्यानं मनमोकळा, प्रेमभरला संवाद ठेवणं, ही एक साधना आहे. त्यात अत्यंत सजगतेनं बोलणं सर्वाधिक महत्त्वाचं असतं. संवाद साधताना वारंवार मतभेद होतील, खटकेही उडतील, पालकांना बरेचदा खूप मनस्तापही सोसावा लागेल, पण तरीही तो संवाद तुटू न देणं, ही पालकांचीच जबाबदारी असते. असा संवाद सुरू राहिला की मुलांना त्यातून पालकांनी केलेला त्यांचा स्वीकार जाणवतो आणि मगच त्यांना सुरक्षित वाटतं. या वयात जाणवलेली सुरक्षितता हळूहळू मुलांना स्थिरचित्त बनवत जाते.
हा संवाद साधताना पालकांनी सदैव एक तटस्थ भूमिका सांभाळायची असते. रासायनिक प्रक्रियेतील उत्प्रेरकाची भूमिका त्यांनी वठवायची असते. रासायनिक प्रक्रियेत उत्प्रेरक (Catalyst) स्वत: भाग घेतो का? नाही. तो फक्त त्या प्रक्रियेला चालना देतो. पालकांनी मुलांना स्वत:च्या आयुष्याला सामोरं जाऊ द्यावं. त्या वयात त्यांना वेगवेगळे अनुभव नीट घेता आले पाहिजेत. थोडं टक्केटोणपे, अपयश, निराशा, अन्याय त्यांना सोसावा लागला, तरी ते गरजेचं असतं. पण ती घायाळ होताहेत, भीतीनं हादरून जाताहेतसं दिसलं, तर पाठीवरून हात फिरवायला त्यांना उभारी द्यायला आपण जवळपास असायलाच हवं. मनमोकळा समंजस संवाद ही अशी जवळीक जोपासत असतो.
संवाद साधणं म्हणजे प्रवचन नाही. परवा दीपक सांगत होता, ‘‘आईला शॉर्टहँडच्या क्लासला घालायला हवं. ‘खोली स्वच्छ ठेव’ किंवा ‘पोटभर, सावकाश जेव’ एवढंसं सांगण्यासाठी तिची वीस-पंचवीस वाक्यं आणि माझी पाच मिनिटं खर्ची पडतात.’’
साधना म्हणते, ‘‘आईशी बोलायचं म्हणजे दात दाखवून अवलक्षण. मी वयात आल्यापासून ती बहुधा खूप घाबरून गेली आहे. मी मैत्रिणींसोबत कुठंही जाऊ म्हटलं किंवा कुणी माझ्याशी मैत्री करतेसं दिसलं, की तिचा जीव काळजीनं अर्धा होतो. मला आता खंबीर आई हवी आहे, हे मी तिला कसं सांगणार? ऊठसूट ‘हे पुरुष मेले स्वार्थी आणि अप्पलपोटे’ एवढंच पटवत असते ती मला.’’ पालकांनी आपल्या मनातील भीतीचे पडसाद मुलांच्या मनात असे उमटू देणं टाळायला हवं.
मुलांची मित्रमैत्रिणींशी घनिष्ठ मैत्री होणं या वयात स्वाभाविक असतं. अशा वेळी ‘‘पाहा बरं! अशी एकच एक मैत्रीण बरी नव्हे. तू एवढा जीव टाकते आहेस तिच्यावर, पण कधी पुढे भांडण झालं तर एकटी पडशील.’’ असं आई सांगू जाते. एखाद्या मुलाशी जवळीक होताना दिसली तर तिला सांगितलं जातं, ‘‘बघ हं, बघता बघता प्रेमात पडशील. हे अभ्यासाचं वय आहे तुझं. प्रेम समजायचं वय नाही तुझं. हे फक्त ्रल्लऋं३४ं३्रल्ल आहे. तो मुलगा आहे. त्याचं काही बिघडणार नाही. तुझी पार वाट लागेल.’’ असं बोलणं म्हणजे विशुद्ध मैत्रीची मुळं उखडून टाकण्यासारखं आहे. वास्तविक या वयात स्वत:च्या नवनवीन भावनांचा कल्लोळ समजून घ्यायला मुलांना हवा असतो फक्त एक मायेचा आधार. त्यांना हवी असते आपली नुसती प्रेमभरली सोबत. मायेची ऊब आणि एक पोक्त समंजसपणा.
नकळतच आपण कितीदा चुकीचं वागतो पाहा. नवरात्रीचे दिवस होते. सर्वत्र दांडिया रासचं वातावरण होतं. प्रज्ञालाही त्यासाठी घागराचोळी हवी होती. तिनं तिच्या मैत्रिणीकडे घागराचोळी उसनी मागितल्याचं आईला सांगताच आई संतापली. रागाच्या भरात ती प्रज्ञाला नाही नाही ते बोलली. प्रज्ञा जेमतेम तेरा वर्षांची. धड ना लहान, ना मोठी. ती घाबरूनच गेली. तिला आपलं काय चुकलं तेच समजेना. फारच ऐकून घेतल्यावरती रडतरडतच आईला म्हणाली, ‘‘आई, मैत्रिणीकडे मी घागराचोळी मागितली म्हणून एवढं बोलतेस, तर मग स्वत:कडे कपाटभर साडय़ा असताना तू नवरात्रीसाठी तुझ्या मैत्रिणीची हिरवी साडी मागून आणून नेसली होतीस नं? ती भिक्कारडी लक्षणं नाहीत का?’’ स्वत:ची चूक मुलीनं दाखवताच आईचा संताप पराकोटीला गेला आणि तिनं प्रज्ञाच्या खाडकन् मुस्कटातच ठेवून दिली.
इथं प्रज्ञापेक्षा आईची चूक फारच मोठी होती. गेली दोन वर्षे घागराचोळी हवी म्हणून प्रज्ञा हटून बसली होती. त्या काळात कधीतरी आईनं तिला घागराचोळी द्यायला हवी होती. आर्थिकदृष्टय़ा ते सहज परवडण्यासारखं होतं. पण आईनं नियोजनपूर्वक ते केलं नाही. ऊठसूट मैत्रिणीच्या साडय़ा उसन्या आणायची आईची सवय मुळातच गैर होती. मुलीनं त्याकडे बोट दाखवताच तिच्यावर हात उगारणं संपूर्णपणे चूक होतं. मुळातच न रागावता वेळोवेळी आईनं प्रज्ञाला नीटपणे वास्तव समजावून द्यायचा प्रयत्न केला असता, तर तिला आपली बाजू नीट मांडता आली असती. आई ज्या मैत्रिणीच्या साडय़ा आणते ती आईची लहानपणापासूनची मैत्रीण होती. तिच्या साडय़ा मागण्यात परकेपणा नव्हता. एखादे वेळेस चुकून साडी फाटली असती किंवा खराब झाली असती तरी त्याबद्दल आईला किंवा तिच्या मैत्रिणीला काही वावगं वाटलं नसतं. दांडिया खेळताना कपडे खराब व्हायची शक्यता फारच होती आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रज्ञा आणि तिची मैत्रीण अजून लहान होत्या. त्यांचं नातं पक्कं व्हायला, त्यात समजूतदारपणा यायला अजून खूप वर्षे लागणार होती. नातेसंबंधातील पक्केपणा, समजूतदारपणा अशा बाबी समजावून द्यायला प्रज्ञाच्या आईला अनायासे संधी मिळाली होती. ती तिनं दवडली. उलट प्रज्ञालाच चपराक मारून आईनं स्वत:च्या चुकीवर पांघरूण घालायचा वेडा प्रयत्न केला.
मुलांशी सुरू ठेवलेल्या संवादातून नातेसंबंधातील बारकावे, नात्यातील व्यापकपण आणि ते नातं सांभाळताना वेळोवेळी जे छोटे निर्णय घ्यावे लागतात ते घेताना सर्वागीण विचार करण्याची आवश्यकता मुलांना पटवून देणं सोपं होत जातं.
स्वातीची आई आत्मकेंद्रित आणि सदैव चिडचिड करणारी. स्वातीवर ती सतत डाफरतच असते. स्वातीनं काहीही केलं, तरी ते आईच्या मनास येत नाही. कुणाच्याही देखत ती स्वातीला वाटेल ते बोलते, तिचा अपमान करते. त्यामुळे अलीकडे स्वाती कुढी बनली आहे. तिचे बाबा शांत स्वभावाचे आहेत. बाबांनी तरी आपल्या बाबतीत आईला काही सांगावं असं स्वातीला कधी कधी वाटतं. पण मग तिलाच वाटतं, की नाही, बाबांनी मध्ये पडू नये. बाबांनी आपली बाजू घेतली तर आई आणिकच चिडेल अशी तिला भीती वाटते. बाबा मात्र तिला खूप आवडतात. परवा आई तिच्या मैत्रिणींबरोबर बाहेर जायची होती. स्वत:च्या नट्टय़ापट्टय़ाला तिला स्वातीची मदत हवी होती. पण स्वातीला सकाळभर ती खूपच घालूनपाडून बोलली होती, म्हणून स्वातीनं तिला मदत करायचं साफ नाकारलं. आईनं रागाच्या भरात तिच्या
उर्मट नकारापायी स्वातीला मारलं. आई निघून गेली. स्वाती मुसमुसत बाबांची वाट पाहात बसली. घरी येताच स्वातीचा रडवेला चेहरा पाहून बाबांनी तिला जवळ घेतलं. स्वाती ओक्साबोक्शी रडू लागली. ती म्हणाली, ‘‘या आईचा अगदी राग येतो मला. स्वत:ची मौजमजा कमी करत नाही. आमचा मात्र मूड खराब करत बसते. कधी वाटतं आपण मरूनच जावं म्हणजे तिला छान अद्दल घडेल. पण बाबा, तुमचा विचार येतो आणि मग नाही तसं करावंसं वाटत.
बाबा म्हणाले, ‘‘म्हणजे मी तुला एवढा आवडतो? मी तर तुझ्यासाठी काहीच करत नाही.’’ स्वाती म्हणाली, ‘‘नाही कसं? घर, गाडी हे सारं तुमच्यामुळेच आहे नं? शिवाय मी काही मागितलं, की तुम्ही हौसेनं ते घेऊन येता. त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही कधी माझ्यावर रागावत नाही. मला लागेलसं बोलत नाही.’’
त्यावर बाबा म्हणाले, ‘‘खरं ना हे? मग मी तुला आणखी काही गोष्टी सांगतो. तू मागतेस तेव्हा मी तुला ते देतो, पण जरा विचार करून पाहा. तुझे सर्व नातेवाईक, शिक्षक, मैत्रिणी तुझ्यावर किती प्रेम करतात? आपल्या टॉमीला तू किती आवडतेस? त्याहून फार मोठं प्रेम निसर्गाचं. तू जन्मल्यापासून हा निसर्ग तुला उजेड, वारा, पाऊस, फुलं, अन्न सारं काही स्वत: खपून तुला भरपूर देत राहतो. तू न मागताच तो तुला सारं काही देतो. अनेक गायकांनी, चित्रकारांनी, सर्कशीतल्या प्राण्यांनी आणि विदूषकांनी, नट-नटय़ांनी तुला आजवर किती आनंद दिलाय? हे सगळं जग तुझ्या आनंदासाठी सतत काही ना काही करत आलंय आणि मग एकटय़ा आईच्या रागामुळे तू मरून जायचं ठरवलंस, तर या साऱ्यांचं प्रेम तू मातीमोल ठरवल्यासारखं नाही का होणार?’’
स्वातीनं डोळे पुसले. त्या दिवसापासून स्वाती पुन्हा हसूं, बोलू लागली. बाबांनी आईच्या वागणुकीची भलावण केली नाही, पण त्यांनी स्वातीची समग्र चांगल्याबाबतची श्रद्धा वाढवली. आज अवतीभवती निष्प्रेम वातावरण आहे. मुलांनी निराश व्हावं, स्वार्थी- अप्पलपोटी व्हावं एवढी जीवघेणी स्पर्धा त्यांच्या वाटय़ाला आली आहे. म्हणून आपल्या क्षमाशील प्रेमळ सोबतीतून आपण त्यांची सुंदरावरची, पावित्र्यावरती श्रद्धा जोपासायला हवी. या जगाचं फार मोठं ऋण आहे आपल्यावर. समाजाचं ऋण फार मोठं असतं. या साऱ्याची जाणीव अशा छोटय़ा छोटय़ा घटनांतून आपण मुलांमध्ये रुजवायला हवी. तरच ती मुलं या जीवनावर प्रेम करू शकतील. हे जग मी सुंदर करेन अशी जिद्द त्यांच्याठायी निर्माण होईल.
आपले सर्व सण निसर्गाबाबतची, प्राण्यांबाबतची, आप्तस्वकीयांबाबतची कृतज्ञता व्यक्त करत ते, ते नातं दृढ व्हावं म्हणून सिद्ध केलेले आहेत. ते आपण सामूहिकरीत्या साजरे केले पाहिजेत. त्या त्या सणांमागील आपल्या पूर्वजांनी केलेला मूळ विचार समजून घेऊन कालबा रूढींना फाटा देऊन नव्या रूपात आपण ते साजरे केले पाहिजेत.
आपल्यावर आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी नवीनचे आईबाबा दिवाळी कशी साजरी करतात पाहा. दिवाळीच्या चार दिवसांपैकी सोयीचा दिवस निवडून नवीनच्या घरी घरकामाला असलेले नोकर, त्यांचे कुटुंबीय, दूधवाला, इस्त्रीवाला, पेपरवाला, पूजेची फुलपुडी पुरवणारा, वेळोवेळी हरकामी मदत करणारे सफाई कामगार, इलेक्ट्रिशिअन्स्, प्लंबर अशा साऱ्यांना नवीनचे आईबाबा संध्याकाळी घरी बोलवतात. त्यांचं उत्तम आदरातिथ्य करून त्यांना छोटीशी भेटवस्तू देतात. दिवाळीची बक्षिसी मागायला येणारे टेलिफोनवाले, म्युनिसिपालिटीतले कामगार अशा सर्वाना उत्तम सरबत आणि मिठाई बक्षिसीसोबत अगत्यानं दिली जाते. भाऊबीजेनिमित्त ठरावीक रक्कम हिंगण्याच्या महिलाश्रमात पाठवली जाते. यामुळे दिवाळी हा सण घरच्यांबरोबरच घराबाहेरच्या सर्व आप्तांसोबत साजरा करायचा सण आहे हा मोठा संस्कार त्यांच्या मुलांवर घडतो आहे.

मुलांनी निराश व्हावं, स्वार्थी- अप्पलपोटी व्हावं एवढी जीवघेणी स्पर्धा त्यांच्या वाटय़ाला आली आहे. म्हणून आपल्या क्षमाशील, प्रेमळ सोबतीतून आपण त्यांची सुंदरावरची, पावित्र्यावरती श्रद्धा जोपासायला हवी.

प्रीती तिच्या आईबरोबर दिवाळीच्या खरेदीला गेली होती. तिच्या आईनं तिच्या आत्यासाठी साडी घ्यायचं ठरवलं. खूप साडय़ा पाहिल्या. शेवटी कंटाळून प्रीती म्हणाली, ‘‘कशाला एवढी उस्तवारी करतेस? आत्याचा एवढा विचार करायला नको. आत्या तुला अगदी तिला स्वत:लाही आवडणार नाही अशी फालतू साडी देते. गेल्या वर्षी सेलमधून आणलेली फाटकी साडी तिनं तुला दिली होती नं? विसरलीस?’’
आई शांतपणे म्हणाली, ‘‘हे पाहा, मी माझ्या चालीनं चालणार. तिला साडी देताना तिच्या आवडीची साडी दिली, तरच ती खूश होणार आणि मला आनंद मिळणार. शिवाय वर्षांतून एकदाच जर तिच्यासाठी साडी घ्यायची, तर थोडे कष्ट पडले म्हणून काय हरकत आहे?’’ आईनं नणंदेच्या गैरवर्तणुकीबद्दल कोणतंही मत व्यक्त न करता आपल्या आग्रही भूमिकेतून प्रीतीला जाणवून दिलं, की प्रत्येक देवाणघेवाण आनंददायक असावी. पूर्वग्रहदूषित मनानं केवळ रीत म्हणून काही करण्याऐवजी खुल्या मनानं ती केली, तर ती स्वत:लाही सुखदायक होते.
शीतलचं तिच्या मित्राशी आज भांडण झालं होतं. घरी आल्यावर ती रडतच बसली होती. आईनं विचारायचा थोडा प्रयत्न केला, पण ती मुसमुसतच पडून राहिली. संध्याकाळी ती आणि आई जवळच समुद्रावर हवा खायला म्हणून गेल्या. तेव्हा शीतल आईला म्हणाली, ‘‘तुझं आणि बाबांचं नेहमी एकमत कसं गं होतं? तू काही सांगितलंस, की बाबांना ते पटतं आणि बाबा काही म्हणतात ते तुलाही पटतंच. तुम्ही एकमेकांशी एवढं जुळवून घेतलंय, की मुळातच तुमच्या आवडीनिवडी सारख्या होत्या?’’
आई हसत हसत म्हणाली, ‘‘आमच्या आवडीनिवडी आता जमून गेल्यात, पण सुरुवातीला त्या एवढय़ा मिळत्याजुळत्या नव्हत्याच. पण हे पालंस का?’’ आईनं मुठीत वाळू घेतली आणि ती म्हणाली, ‘‘ही वाळू पाहा. अलगत मुठीत धरली तर मुठीतच राहते. मूठ जरा घट्ट करू गेलं, की पाहता पाहता ती निसटून जाते.’’ सहज गप्पा करता करता आईनं किती महत्त्वाची गोष्ट शीतलला जाणवून दिली. ते लक्षात घेण्यासारखं आहे. जी गोष्ट पतीपत्नीच्या बाबतीत खरी आहे, ती मूल आणि पालक यांच्या नात्याबाबतही खरी आहे.
मुलांना प्रवचनं नको असतात. त्यांना आपल्याशी गप्पा करायच्या असतात. हसाखिदळायचं असतं आणि अधूनमधून त्यांना आपल्यावर रुसायचंही असतं. पालक म्हणून आपण मात्र त्यांच्यावर कधीच रुसायचं नाही.