भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांचं समृद्ध जीवन जाणून घेताना त्यांचे स्मारक उभारावं अशी कल्पना डॉ. मुकुंद धाराशिवकर यांना सुचली. मग ते तिथेच थांबले नाहीत. त्यांनी ते स्मारक प्रत्यक्षात आणले. त्या प्रयत्नांचा धांडोळा-

Learn from the past and live the present with wisdom for the bright future.

हे एक बोधवचन. स्वत: बरोबर इतरांचं जीवन समृद्ध, संपन्न करण्याची तळमळ असणाऱ्या प्रत्येक व्रतस्थ माणसाचा ध्यास. समाजात असाही एक बुद्धिनिष्ठ वर्ग आहे ज्याला इतिहासाचा धांडोळा घेताना अनेक प्रश्न सतावत असतात. त्या शंकांचा मागोवाच चांगल्या गोष्टींचा उगम ठरतो.

मुकुंद धाराशिवकर हे असंच एक व्यक्तिमत्त्व. धुळे ही यांच्या आजोबांपासूनची पुण्यभूमी. धुळय़ाच्या मातीत त्यांची कारकीर्द विज्ञान, कला, साहित्य, वाङ्मय अशा विविधांगाने बहरली. एस. एस. सी.त जगन्नाथ शंकरशेट इतके मार्क. पुण्याच्या इंजिनीअरिंग कॉलेजमधून (सी.ओ.ई.पी.) सिव्हिल इंजिनीअर ही पदवी घेताना चार विषयांत टॉपर. प्रचंड बुद्धिमत्ता, जिज्ञासा, अथांग व्यासंग, तीक्ष्ण निरीक्षण, सखोल अंत:प्रज्ञा, विलक्षण स्मरणशक्ती आणि या सर्वाच्या मुळाशी संवेदनशील मन व लढाऊ वृत्ती.

१९६८ साली या सर्व भांडवलावर त्यांनी ‘धाराशिवकर कन्सल्टंट्स’ची स्थापना केली. तिच्या छताखाली जवळजवळ २०-२१ हजार घरं, सिनेमागृह, देवळं, मशीद अशा वेगवेगळय़ा वास्तूंची उभारणी केली. हा डोलारा सांभाळत असतानाच त्यांनी संस्कृत, विज्ञान, गणित, भूगर्भशास्त्र, साहित्य यावरची आपली पकड ढिली होऊ दिली नाही. या व्यासंगामुळेच व्यवसाय ऐन बहराला आला असतानाच निर्मोही निर्लेप मनाने त्यांनी तो आपल्या भावाकडे सुपूर्द केला आणि लिखाणात, संशोधन कार्यात स्वत:ला झोकून दिलं. ललित लेखक म्हणूनही त्यांचा वेगळा ठसा आहे. कादंबऱ्या, नाटकं, कविता, घरबांधणी, पाणी, मंदिर रचना, जिल्ह्यचा समग्र विकास अशी त्यांची ३० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातील तीन पुस्तकांना पारितोषिकंही मिळाली आहेत.

त्यांच्या स्वत:च्या लायब्ररीत सहा हजारच्या वर पुस्तकं आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, भगवद्गीता हे संस्कृत गं्रथ आहेत. ‘घरबांधणी’ या विषयावरची ३०० पुस्तकं आहेत. शिवाय स्थापत्यकला, शेती, जलसंवर्धन या सर्व विषयांना तेथे मानाचे स्थान आहे. या सर्वाची त्यांनी पारायणं केली आहेत. प्राचिन ग्रंथांचा अभ्यास करतानाही विज्ञानाचा कस लावून ते त्यांच्या मुळाशी जातात. रामाने लंकेला जाण्यासाठी समुद्रात सेतू बांधला हे सर्वज्ञात आहे. त्याचं विज्ञान ते सांगतात, ‘‘प्रवाळ हा खडक पाण्यावर तरंगतो त्याचा वापर करून रामाने समुद्रावर रुंद पूल बांधला.’’

‘भारताची प्राचीन जलपरंपरा’ यावर संशोधन करताना त्यांनी अंतरिक्षाच्या पोकळीतील पाणी, भूगर्भातील पाणी, भूपृष्ठावरील पाण्याचे सर्व स्रोत याचा सखोल अभ्यास केला. सरस्वती नदीचा उगमापासून शेवटपर्यंतचा मार्ग, मध्येच तिचं लुप्त होणं, परत प्रकट होणं याचा यथासांग पाठपुरावा करून त्यांनी रामायण, महाभारताचा कालावधी शोधला. गंमत म्हणजे लोकमान्य टिळकांनी ग्रह, ताऱ्यांच्या बदलत्या गतीवरून शोधून काढलेला या पर्वाचा कालावधी व यांनी शोधलेला कालावधी मिळताजुळता आहे. जलसंपदेच्या या संशोधनाचा उपयोग करून सध्या ते अनेक गावे जलसंपन्न करत आहेत. धुळय़ातील ‘पांझरा’ नदी तर त्यांचीच.

वाहत्या पाण्याप्रमाणे त्याचं जीवन किती प्रवाही आहे याचं हे संशोधन म्हणजे फलित आहे. त्यावेळेसच भारताच्या सर्वागीण विकासासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेल्या भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांचं समृद्ध जीवन त्यांनी जाणून घेतलं. त्यांच्याच कॉलजमध्ये शिकलेल्या सर्व अभियंत्यांचे गुरू. १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘इंजिनीअर्स डे’ म्हणून साजरा होतो. ऋषीतुल्य विश्वेश्वरय्या आपले आद्य पितामह कसे, त्यांचं महान कार्य काय या कुतुहलापोटी ते झपाटल्यासारखे कामाला लागले. आंध्र प्रदेशातील कोलार जिल्ह्यातील मोक्षगुंडम् हे त्यांचं जन्मगाव. तेथपासून ते बँगलोर, म्हैसूर, चेन्नई, पुणे, मुंबई, मुदेनहळ्ळी, तुंगभद्रेवरील धरण, शिमोगाची भद्रावती स्टील, कृष्णराज सागर ही त्यांची सर्व कार्यक्षेत्रे धाराशिवकरांनी पालथी घातली. तेथे त्यांना त्यांच्या कर्तृत्वाचा घडा सापडला. मिळतील तेवढी कागदपत्रे, जमतील तेवढी छायाचित्रे त्यांनी घेतली. हा असामान्य माणूस ही त्या विधात्याची सवरेत्कृष्ट कृती आहे हा कौल त्यांच्या मनाने दिला.

विश्वेश्वरय्यांच्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ धुळय़ात झाली. १८८४ ते १९०८ पर्यंत ते मुंबई राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात (पीडब्ल्यूडी) सहाय्यक इंजिनीअर होते. तेव्हा तब्बल १६ महिने विश्वेश्वरय्या धुळय़ात होते. पीडब्ल्यूडीच्या जुन्या कार्यालयातील एका खोलीत ते बसत. डेडरगाव तलाव ते धुळे शहर पाइपलाइन, दातर्ती येथील सायफन्स, पांझरा नदीवरील १८८ फड बंधारे ही धुळय़ातील त्यांची मुख्य कामे. या सर्वाचा तपास करतानाच धाराशिवकरांच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना साकारत होती. याच जागेत या ‘भारतरत्ना’चे स्मारक उभारायचे. ‘स्वस्थ बसणे हा धर्म न माझा’ या उक्तीप्रमाणे ते कामाला लागले.

शाळा, महाविद्यालये, सिंचन खाते, पीडब्ल्यूडी या सर्वासमोर त्यांनी ही संकल्पना मांडली. शासकीय मालकीची जागा असूनही पाठपुरावा केला. अर्थात हे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व धुळेकरांचे भूषण असल्याने सर्व शासकीय अधिकाऱ्यांनीही संमती दिली. धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांतील अभियंत्यांनी संग्रहालय उभं करता येईल इतके पैसे जमा केले. मित्र, सहकारी, त्या त्या विषयातील तज्ज्ञ असे सर्व जण कामाला लागले. ‘भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या स्मृती समिती’ची स्थापना केली. चारही जिल्ह्यंतील सर्व विद्याशाखांचे तसेच शासकीय सेवा, अध्यापक, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, निर्मिती सेवा यांचे प्रतिनिधी समितीत आहेत.’’ विश्वेश्वरय्या स्मृती परिसर हे इमारतीच्या खोल्यांना नाव दिले. या सर्वाची परिणती चित्रदालनात झाली आहे.

पहिल्या दालतान आपण शिरतो तेव्हा एका क्षणात आपण प्रभावित होतो. प्रथमच भारतरत्न विश्वेश्वरय्यांचा अतिशय रेखीव अर्धपुतळा आहे. तो तेजस्वी पुतळा पाहात आपण पुढे जातो तर त्यांचे विविधांगी भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व अचूक शब्दात रेखाटलं आहे. हे चित्र संग्रहालय आहे. ‘एका द्रष्टय़ा महापुरुषाचे, कुशल प्रकाशकाचे, यशस्वी उद्योगपतीचे, शिक्षणतज्ज्ञाचे एका ऋषी जाणकाराचे, समाज सुधारकाचे, क्रीडाप्रेमी व्यक्तीचे, लेखकाचे, स्त्री सबलीकरणावर प्रेम करणाऱ्यांचे, निस्पृह योग्याचे, एका महान अभियंत्याचे.’

विश्वेश्वरय्यांच्या या अफाट बिरुदांची चुणूक चित्र दालनातून आपल्या लगेच लक्षात येते. धाराशिवकरांनी उत्कृष्ट कॅमेरा व त्यावरील त्यांची भरभक्कम पकड या द्वयींच्या संगमाने भारतरत्नांची कर्तृत्व-मालिका अनेक उत्कृष्ट बारकाव्यांसहित टिपली आहे. जलसंपदेतील देदीप्यमान बांधकामांची ओळख होत जाते. कावेरी नदीवरील कृष्णराज सागर धरण, भाटघर धरण, अ‍ॅटोमॅटिक गेटस्सह खडकवासला धरण, तुंगभद्रा नदीवरील धरण. त्यांच्या कामाच्या आवाक्याने आपण नतमस्तक होतो. म्हैसूर-वृंदावन गार्डन ही त्यांची देन आहे हे आपल्याला स्तिमित करतं. राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते १९५५ साली त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान केले तो फोटो, त्यांचा स्व. पंडित नेहरूंबरोबरचा फोटो. त्यांचे जन्मस्थळ, समाधीस्थान या सर्वानी डोळय़ासमोर त्यांचा प्रदीर्घ जीवनपट उभा राहातो. विश्वेश्वरय्यांच्या सर्व सामाजिक तळमळीची स्पंदनं आपल्याला, आपल्या हृदयाला भिडतात.

दिङ्मुढावस्थेतच आपण ‘विश्वेश्वरय्यांनंतरचा अभियांत्रिकी भारत’ या दालनाकडे वळतो. तेथे हरित क्रांती करणारे एम.एस.स्वामिनाथन, धवल क्रांतिकारक व्हर्गिस कुरियन, साबिर भाटिया अशा भारतासाठी योगदान दिलेल्या अनेक शास्त्रज्ञांचे खूप मोठे फोटो व थोडक्यात माहिती आपल्या ज्ञानात भर घालते. पुढे मोठय़ा हॉलचे बांधकाम सुरू आहे. तेथे ग्रंथालय व अभियंत्यांच्या सर्व कामांना गती येण्यासाठी जागा आयोजित केली आहे. तेथे नवीन संशोधनांना प्रोत्साहन, ग्रामीण समस्यांसाठी उपयुक्त योजना, छोटे-छोटे तांत्रिक प्रशिक्षण, अनुत्पादक प्रकल्पांना योग्य पर्यायांवर विचारविनिमय अशा अनेक गोष्टींना महत्त्व देण्यात येईल. हे सर्व सवरेत्कृष्ट व नियोजित वेळेत होण्यासाठी धाराशिवकर, त्यांचे सहकारी अथक प्रयत्न करत आहेत. खर्चाचा वाढता डोंगर सावरण्यासाठी सर्वाचेच प्रयत्न सुरू आहेत. त्याला भरघोस यश देणं हे आपल्या सर्वाच्याच हातात आहे. यातून स्फूर्ती घेऊन निष्ठावंत, द्रष्टे अभियंते निर्माण झाले, तर भारत यशाच्या शिखरावर पोहोचेल.

दालनातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे भारताचा भव्य नकाशा. विश्वेश्वरय्यांच्या कामाचं भारतभर पसरलेलं जाळं अतिशय कल्पकतेने दाखवलेलं आहे. धरणं, पाणीपुरवठा, नगर-रचना, बंदरे आणि पूल अशा विविध कामांसाठी वेगवेगळय़ा रंगाचे छोटे-छोटे लाइट्स लावलेले आहेत. चारही रंगाचे लाइट्स एकदम लावले की त्यांच्या कामाचा आलेख वाचून आपली मान अभिमानाने ताठ होते.

एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर काम करणारे धाराशिवकर एवढं करून थांबलेले नाहीत. उत्तम डॉक्टर्स इंजिनीअर्स घडवायचे असतील तर लहानपणापासून मुलांची तशी वाटचाल हवी. कुतूहल, जिज्ञासा, सृजनशीलता, कल्पकता, निर्णयक्षमता या सर्व गुणांना खतपाणी घालायला हवं. हे सर्व जाणूनच धुळय़ामध्ये घासकडबी विज्ञान प्रायोगिका व विज्ञान संग्रहालय जोपासलं आहे. गणित व विज्ञान अशी चार दालनं आहेत. दहावीपर्यंतचे ७०-७५ प्रयोग वर्षभरात करून घेतले जातात. शिवाय विज्ञान कथा-कथन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, प्रज्ञाशोध परीक्षा यांचेही आयोजन केले जाते. प्रायोगिका धाराशिवकरांच्या वास्तुतच आहे. कार्याध्यक्ष, प्रकल्पप्रमुख या नात्याने संस्थेचा बराचसा कामाचा वाटा ते उचलतात.

संग्रहालय म्हणजे देशाचा बहुमान. मूलभूत ज्ञान मनोरंजनातून देताना काळानुरूप होणारे बदलही दाखवले तर ते संग्रहालय कालातीत ठरते. घासकडबी संस्थेचे संग्रहालय असेच आहे. यात पाच दालनं आहेत. प्रतिमा दालनात प्रकाश परिवर्तनाचे प्रयोग आहेत. काचेच्या देव्हाऱ्यातील सरस्वतीदेवीच्या असंख्य प्रतिमा पाहायला मिळतात. बल दालनात वस्तू उताराकडे न जाता चढाकडेच कशी जाते असे कुतूहल मिश्रित अनेक प्रयोग त्यात आहेत. गणित दालनातही गणित मनोरंजनातून हेच तत्त्व आहे.

संग्रहालय सध्या ‘प्रारंभिक’ टप्प्यावर आहे. अंतिम टप्प्यापर्यंत नेण्याचा ध्यास धाराशिवकरांना लागला आहे. नवीन जागा घेऊन सुसज्ज संग्रहालय बांधण्याचे त्यांचे प्रयत्न सर्वाच्या मदतीने सुरू आहेत. संग्रहालय भारताचं भूषण ठरावं यासाठी ते सर्व जणच झटत आहेत. शिवाय त्यांना पाण्यासंबंधीच्या ज्ञानाचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्र ‘पाणीटंचाई’मुक्त करायचा आहे. ‘‘मी, ग्रामस्थ व सरकार हे त्रिकूट एकत्र आलं तर ते सहजशक्य आहे’’ असं ते आत्मविश्वासाने सांगतात. ‘‘माझं हे स्वप्न साकार होईल तेव्हाच माझे गुरू भारतरत्न विश्वेश्वरय्या आणि माझे प्रेरणास्थान कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांना खरी आदरांजली दिली जाईल,’’ हे सांगताना ते खूप भावूक होतात.