मुलाखत : स्नेहा कुलकर्णी
नेपाळ भूकंपाच्या पाश्र्वभूमीवर भूकंप म्हणजे नेमके  काय, तो कसा होतो, त्याची परिणामकारकता नेमकी कशावर अवलंबून असते, अशा अनेक प्रश्नांची वैज्ञानिक माहिती समजून घेणे आवश्यक ठरते.

भूकंप म्हणजे नक्की काय आणि नेपाळच्या निर्मितीची काही वैज्ञानिक पाश्र्वभूमी आहे का?
lp16पृथ्वीच्या भूगर्भात असणारी प्रचंड ऊर्जा, ताण निर्माण झाल्यामुळे आणि भूखंडांच्या सततच्या हालचालीमुळे अचानक बाहेर पडते. त्या ऊर्जेमुळे संपूर्ण भूभाग हलतो, दुभंगतो, ज्याचा परिणाम पृथ्वीच्या पृष्ठभागावर जाणवतो. ऊर्जेच्या प्रमाणानुसार त्याची तीव्रता कमी-अधिक असते. अशी साध्या शब्दात भूकंपाची व्याख्या करता येईल. खंडीय वहनाशी याचा संदर्भ जोडता येतो. वैज्ञानिक कालमापनात अधिजीव (paliozoic) कालखंडात सागर आणि भूभाग (जमीन ) यांची रचना आजच्यापेक्षा खूपच वेगळी होती. त्यावेळी लोरेशिया आणि पॅन्जिया या भूभागांमध्ये टेथिस नावाचा महासागर अस्तित्वात होता. ज्युरासिक कालखंडामध्ये पॅन्जियाचे विभाजन झाले आणि नवीन तयार झालेले भूखंड वेगवेगळ्या दिशेने सरकू लागले. डॉ. आल्फ्रेड वेगनर यांनी पृथ्वीच्या गोलाचे निरीक्षण करताना हा खंडीय वहनाचा सिद्धांत लावला. त्यांच्या संकल्पनेनुसार पृथ्वी ही मुख्य सात खंडांची बनलेली असून इतर अनेक लहान भूखंड पूर्वी अस्तित्वात होते. या भूखंडांचे विभाजन आणि वहन होऊन आजची सागर व भूखंडांची रचना अस्तित्वात आली. हे तयार झालेले नवीन भूखंड वेगवेगळ्या दिशेने सरकू लागले. भारतीय भूखंड सुरुवातीला उत्तर दिशेने सरकत होता. नंतर तो उत्तरपूर्व सरकून आशिया खंडास धडकला. जसजसा भारत उत्तरपूर्वेकडे सरकू लागला तसतसा टेथिस महासागर उथळ होऊ  लागला. भारताची आशिया खंडाशी झालेली हीच टक्कर हिमालयाच्या निर्मितीला कारणीभूत ठरली. नेपाळचे स्थानच मुळात जिथे टक्कर झाली त्या सीमेवर असल्याने नेपाळला नेहमीच भूकंपाच्या धक्क्यांना सामोरे जावे लागते.

lp17टोटल इलेक्ट्रॉन कन्टेन या भूकंपाच्या भाकितांचा दावा करणाऱ्या प्रकल्पानुसार पृथ्वीच्या वातावरणात ८० ते १०० किलोमीटर उंचीवर ‘आयनोस्फिअर’ ऊर्जाभारीत कणांची संख्या भूकंप काळात दुप्पट किवा तिप्पट होते.

भूस्तर हालचाली होतात म्हणजे नेमके काय?
उदाहरण देऊन सांगायचे तर भूखंडीय हालचालींमुळे भारताची धडक आशिया खंडाशी झाली.  याच भूस्तरीय हालचालींमुळे आज अस्तित्वात असलेला भारतीय भूखंड साधारण मूळ खंडाच्या एकतृतीयांश एवढाच आहे आणि उरलेला दोन तृतियांश भाग आशिया खंडाच्या खाली गेलेला आहे. अपसारी आणि अभिसारी या दोन प्रकारांत या हालचाली मोडतात. समुद्र तळाशी सपाट प्रदेश झालेल्या भागी भूस्तर एकमेकांपासून दूर जातात त्याला अपसारी हालचाली म्हणतात. आणि जेव्हा एका भूस्तराचा भाग खाली खचून दुसऱ्या भूस्तराखाली जातो त्याला अभिसारी हालचाली म्हणतात.
’    नेपाळचा भूकंप मग नक्की कोणत्या हालचालींमुळे झाला?
नेपाळच्या भूकंपास मुख्यत: अपसारी हालचाली या कारणीभूत आहेत. अपसारी हालचालींमुळे भारतीय उपखंड दरवर्षी उत्तर ईशान्य दिशेने ४५ मिलिमीटरने युरेशिया खंडाकडे सरकत आहे. काही ठिकाणी या हालचालींचा वेग कमी आहे. पण काठमांडू हे असे ठिकाण आहे जिथे जास्त हालचालींमुळे भूकेंद्रात मोठय़ा प्रमाणात ताण निर्माण झाला आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडून त्याचे रूपांतर प्रलयकारी भूकंपात झाले.

भूकंपाची तीव्रता कशी ठरवली जाते?
भूगर्भामध्ये ज्या ठिकाणी खडक किंवा भूभाग विभागतात, दुभंगतात त्या ठिकाणाला भूकंपाचा केंद्रबिंदू (core) असे म्हणतात. केंद्रबिंदूच्या वरच्या भूभागाला भूकंपाचे केंद्र (epicenter) असे म्हणतात. भूकंपाच्या केंद्रापासून जसजसे दूर जावे तसतशी भूकंपाची तीव्रता कमी होत जाते. जमिनीपासून सुमारे ७० किलोमीटर खोलीपर्यंतचा केंद्रबिंदू उथळ केंद्रबिंदू म्हणून धोकादायक पातळीत गणला जातो. दरवर्षी आठशेहून अधिक भूकंप होतात. पण त्यांची तीव्रता वेगवेगळी असते. रिश्टर स्केल या परिमाणात भूकंपाची तीव्रता मोजली जाते. दोनपेक्षा कमी रिश्टर स्केलचे भूकंप जाणवत नाहीत. २ ते ३ मधील भूकंप जाणवण्याची संभावना असते. ३ ते ४ मधील भूकंप काहींना जाणवू शकतात. तर ४ रिश्टर स्केलच्या पुढचे भूकंप मात्र सगळ्यांना जाणवतात. ५ च्या पुढचे भूकंप हे परिणामकारक असतात. ७ ते ८ च्या दरम्यानचे भूकंप हे मोठे हानीकारक ठरतात तर ८ च्या पुढील रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे अतिशय जास्त प्रमाणात हानी होते.
भूखंडांच्या सीमेपासून (fracture zone) जसजसे दूर जावे तसतसा प्रदेशांवर असणारा भूकंपांचा धोका कमी होत जातो. सर्वात कमी धोका असणारा झोन एक ते सर्वात जास्त धोका असणारा झोन पाच अशा पाच प्रकारांत भूकंपप्रवण क्षेत्राची विभागणी केली जाते.
जागतिक स्तरावर भूकंपाच्या दृष्टीने तीन पट्टे सक्रिय मानले जातात.
१) प्रशांत महासागराच्या कडेवर असणारे क्षेत्र.  २) अटलांटिक महासागराच्या मधोमधचे क्षेत्र.  आणि  ३) हिमालय.
प्राथमिक लहरी (primary waves) आणि दुय्यम लहरी (secondary waves) असे भूकंपाच्या लहरींचे वर्गीकरण करण्यात येते. प्राथमिक लहरी या दाब लहरी म्हणून ओळखण्यात येतात. या लहरींचा वेग इतर लहरींपेक्षा जास्त असल्याने त्या भूकंपलेखनयंत्रापर्यंत सर्वात आधी पोहोचतात. या लहरी कोणत्याही द्रव किंवा इतर साहित्यातून वहन करू शकतात. दुय्यम लहरी या भूकंप धक्क्यानंतर लगेच निर्माण होऊन प्राथमिक लहरीनंतर यंत्रापर्यंत पोहोचतात. त्या इतर कोणत्याही माध्यमातून वहन करू न शकल्याने जास्त हानीकारक ठरतात.

 नेपाळच्या भूकंपाची तीव्रता कशी मांडता येईल?
हिमालयाच्या कुशीत वसलेले नेपाळ हे एका प्रमुख सक्रिय भूकंप पट्टय़ात येते. ७.९ रिश्टर स्केलचा हा भूकंप अतिशय तीव्र प्रकारच्या भूकंपात मोडतो. अमेरिकी जिऑलॉजिकल सव्‍‌र्हेने दिलेल्या माहितीनुसार लामजुंग येथे सुमारे १५ किलोमीटर खोलीवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. केंद्रबिंदू जमिनीपासून फारच जवळ असल्याने त्याचा परिणाम जास्त जाणवला.

भूकंपांच्या परिणामांचे वर्गीकरण कसे करता येईल? नेपाळच्या पाश्र्वभूमीवर भूकंपाचे झालेले परिणाम?
भूकंपाच्या घटनेनंतर, तात्काळ परिणाम आणि दूरगामी परिणाम अशा दोन गटांमध्ये परिणामांचे वर्गीकरण करता येईल. भूकंपामुळे होणारी जीवित आणि वित्त हानी मुख्यत: तात्काळ परिणामांमध्ये मोडते. तर भूरचना आणि भौगोलिक घटकांमध्ये होणारे बदल हे दूरगामी परिणामांमध्ये अभ्यासले जातात. नेपाळच्या पाश्र्वभूमीवर सांगायचे झाले तर आत्तापर्यंत मृतांची संख्या चार हजार नोंदवण्यात आली आहे. (मुलाखत घेण्यात आली तेव्हापर्यंत) तर एक ते दहा अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी वित्तीय हानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य भूकंपाच्या हादऱ्यानंतर पुढचे काही दिवस बसणारे भूकंपाचे लहान मोठय़ा क्षमतेचे हादरे (aftershocks) तात्काळ परिणामांमध्ये गणले जातात. यामध्ये साठून राहिलेली ऊर्जा पुन्हा कमी अधिक प्रमाणात बाहेर टाकली जाते. अनेकदा मुख्य हादऱ्यांनंतरची जमिनीची स्थिरता पुन्हा योग्य पातळीवर येण्यासाठी असे कमी अधिक क्षमतेचे भूकंप होतात. नेपाळच्या उदाहरणात आतापर्यंत ५०हून अधिक असे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे.
दूरगामी परिणामांबद्दल बोलायचे झाले तर, भूस्खलनाची (landslides)) भीती प्रामुख्याने समोर येते. भूकंपानंतर मातीमध्ये वेगाने कंप निर्माण होतो आणि त्यामुळे तिची अस्थिरता वाढते व भूरचना, भौगोलिक घटकांमध्ये बदल होतात, यामुळे भूस्तर खचून भूस्खलनाचे प्रमाण वाढते. नेपाळच्या उदाहरणात जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टच्या परिसरात सध्या असे परिणाम जाणवून आले आहेत.
भूकंपासारख्या घटनांमुळे दरी किंवा खोऱ्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन तात्पुरते नैसर्गिक बांध तयार होण्याचा धोकाही संभवू शकतो. पुढील काही काळात हे बांध फुटून पूरसदृश परस्थितीचा धोका उद्भवतो.

भूकंपाचे भाकीत करणे कितपत शक्य आहे? असल्यास तशा काही सुविधा आहेत का?
भूकंप ही अशी नैसर्गिक घटना आहे ज्याचे भाकीत करणे सध्यातरी शक्य नाही. जागतिक पातळीवर याविषयी काम चालू आहे तरी अपेक्षित असे निकाल हाती आलेले नाहीत. टोटल इलेक्ट्रॉन कन्टेन (Total electron contain -TEC) नावाचा एक प्रकल्प सध्या कार्यरत आहे, ज्या अंतर्गत भूकंपाच्या भाकितांचा दावा केला जातो. या प्रकल्पाच्या मानण्यानुसार पृथ्वीच्या वातावरणात ८० ते १०० किलोमीटर उंचीवर ‘आयनोस्फिअर’ ऊर्जाभारीत कणांची संख्या भूकंप काळात दुप्पट किवा तिप्पट होते. या वाढलेल्या कणांच्या संख्येमुळे भूकंपाचे भाकीत करता येऊ  शकते. नेपाळच्या उदाहरणात गेला पूर्ण आठवडाभर दुप्पट प्रमाणात हे कण आढळले होते असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भूकंपाच्या अनुमानाचे हे तंत्र जरी उपलब्ध असले तरी त्याला अजून जागतिक पातळीवरचा ठोस पुरावा नाही. तसेच अनुमानाची मर्यादा आठवडय़ाभरापुरतीच असल्याने मोठी हानी टाळण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग नाही. भूकंपाच्या पूर्वी पशू-पक्ष्यांच्या वर्तनामध्ये होणारे बदल हा भूकंप अनुमानाचा सर्वात भरवशाचा मार्ग म्हणता येईल. पक्ष्यांचे वेगळ्या दिशेला उडणे, कुत्र्यांचे विचित्र भुंकणे अशा काही लक्षणावरून भूकंपाचे भाकीत करण्यात येऊ  शकते.
नेपाळमध्ये ८० वर्षांपूर्वी म्हणजे १९३४-३५ मध्ये एवढय़ा मोठय़ा भूकंपाची नोंद झाली होती. त्यानंतर गेली अनेक वर्षे या भागात स्ट्रेस (ऊर्जेचा ताण) साठलेला होता. त्यामुळे अशा प्रकारचा भूकंप येथे अपेक्षितच होता. पुढच्या काही काळामध्येही अशा घटना पुन्हा घडण्याची दाट शक्यता आहे

 नेपाळच्या पाश्र्वभूमीवर या पुढे काय सुरक्षा प्रणाली अमलात आणता येईल?
कोणत्याही विकासाला विरोध न करता निसर्गाभिमुख विकास कसा करता येईल याकडे आता लक्ष दिले पाहिजे. जपानला आदर्श मानून उपयोजना केल्या तर मोठय़ा प्रमाणात हानी टाळता येऊ  शकेल. अतीदक्षता परिसरामध्ये बांधकामे न करणे किंवा अशा ठिकाणी बांधकामांसाठी भूकंपविरोधी पर्यायांचा मार्ग अवलंबणे हा महत्त्वाचा उपाय सध्या प्रामुख्याने करणे गरजेचे आहे.
जपानप्रमाणे बांबूच्या बांधकामांना प्रोत्साहन दिले तर भूकंपानंतर होणाऱ्या जीवित आणि वित्त हानीचे प्रमाण कमी होऊ  शकते. भूकंप, पूर अशा नैसर्गिक घटकांचा विचार करून देशाची आर्थिक तरतूद करण्यात आली, प्रादेशिक धोरणे ठरवण्यात आली तर आपत्ती व्यवस्थापन जास्त सोयीस्कर होण्यास मदत होईल.
भूकंपविरोधी बांधकाम नेपाळच्या उदाहरणाने सांगायचे झाल्यास, पशुपतीनाथ मंदिराचे उदाहरण घेता येईल. एवढय़ा मोठय़ा धक्क्य़ानंतरही या मंदिराला धक्का न पोहोचता ते सुरक्षित असणं ही बाब तत्कालीन स्थापत्यकलेची साक्ष आहे. त्या ऐतिहासिक शास्त्राला आदर्श मानून सध्या स्थापत्य कलेचे शिक्षण देण्यात यायला हवे. तरच अशा आपत्तींवर काही प्रमाणात का होईना मात करता येऊ शकेल.

 कोयना आणि नेपाळच्या भूकंपाचे काही संबंध लावता येतील का?
नेपाळमधील भूकंपाइतक्या तीव्रतेचा भूकंप महाराष्ट्रात होण्याची शक्यता फारच कमी आहे. याला कारण हिमालयाची भूरचना आणि महाराष्ट्रातील दख्खनच्या पठाराची भूरचना निराळी आहे. मात्र, महाराष्ट्रातील कोयना-वारणा परिसर हा भूकंपाच्या धक्क्यांसाठी ओळखला जातो. १९६२ मध्ये कोयना धरण बांधून झाल्यावर १९६७ मध्ये या भागाला भूकंपाचा मोठा धक्का बसला. तेव्हापासून कोयना परिसरात कमी-अधिक तीव्रतेचे धक्के ही तशी नित्याची बाब आहे. या धक्क्य़ांना कोयनेचा जलाशय कारणीभूत असावा असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे. सर्वसाधारणपणे भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १५-२० किलोमीटर खोलीवर असते. कोयनेच्या क्षेत्रात मात्र ते दहा किलोमीटरपेक्षा कमी खोलीवर असल्याचे आढळून आले आहे. कोयना परिसरातील धक्के हे जलाशयामुळे होतात की भूकवचाखालील हालचालींमुळे याचे कोडे लवकरच सुटण्याची शक्यता त्या भागात उभारल्या जाणाऱ्या प्रयोगशाळेमुळे निर्माण झाली आहे. जमिनीखाली बोअर घेऊन भूकवचाखालील घडामोडींचा अभ्यास केल्याचे अनेक फायदे असतील. एकतर यामुळे आपल्याला भूकंपाची नेमकी प्रक्रिया समजेल. तसेच, जलाशय आणि भूकंपाचा संबंध त्यातून अधोरेखित झाला तर भविष्यात असे जलाशय बांधताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत स्पष्टता येईल. भूकंपापासून होणारे जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान टाळण्यासाठी हा प्रकल्प नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
हा भूकंप ही संपूर्ण नेपाळसाठीच घटना दु:खदायक आहे. परंतु निदान आता तरी नेपाळमधली नैसर्गिक आपत्ती आणि त्याचा समाजावर झालेला दूरगामी परिणाम याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. विकसनशील देशांसाठी ही घटना एक उत्तम आव्हान आहे. निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्याला समजावून घेऊन उपाययोजना करण्याची आता गरज आहे. विज्ञानाची कास धरतानाच निसर्गाचे महत्त्वही जाणून घेणे हेच आता प्रमुख आव्हान आहे. एका भूकंपामुळे ५० वर्षे मागे गेलेल्या नेपाळच्या अनुभवाने हेच दाखवून दिले आहे.

– डॉ. रमेश बडवे