सर्वसाधारण निरोगी मोठय़ा माणसांना दर दिवशी आठ ते वीस वेळा वारा सरतो. म्हणजे दिवसभरात मिळून अर्धा ते दीड लिटर अपानवायू सरतो. तितक्या साहजिक गोष्टीचा बाऊ होता नये. साधा वारा तो! त्याचं वादळ होऊ देऊ नये.

‘‘धनमलजी, हवा खुली?’’
‘‘नही साब, नही खुली!’’
एका फार नावाजलेल्या, तज्ज्ञ डॉक्टरांनी धनमलच्या पोटाचं गुंतागुंतीचं ऑपरेशन केलं होतं. उघडून बंद केलेल्या त्या पोटाच्या पोतडीत सगळं आलबेल असल्याची खात्री पटण्यासाठी पेशंटला वारा सरणं आवश्यक होतं. त्यामुळे रोज सकाळी मोठे डॉक्टर धनमलच्या ‘हवा’मानाची आवर्जून चौकशी करत. त्याने ‘नहीं साब’ म्हटलं की सारं वातावरण खिन्न होई. असं दहा दिवस चाललं. अकराव्या दिवशी, डॉक्टरांनी प्रश्न विचारण्यापूर्वीच धनमल लाजत म्हणाला,
‘‘जी साब, आज खुली!’’
त्या खुल्या हवेने डॉक्टरांच्या चिंतेवर सुटकेची फुंकर घातली. सर्वत्र आनंदीआनंद पसरला. निवासी डॉक्टरांनी फटाके उडवायचेच बाकी ठेवले.
पण ती इतकी महत्त्वाची खुली हवा बहुधा जनसामान्यांच्या चिंतेचाच विषय असते.
अभिजित सरंजामे हा पंचविशीचा, होतकरू अभिनेता मेटाकुटीला येऊन म्हणाला,
‘‘काही खाल्लं की पोट ढरढरून फुगतं आणि मोठय़ाने गुरगुरतं. परवा नाटकाच्या रंगीत तालमीच्या आधी जेवून घ्यावं लागलं. प्रयोग चालू असताना पोटातली हवा भलत्या वाटेने निसटू नये म्हणून जिवाचा आटापिटा केला मी! पण अत्यंत दु:खद, गंभीर प्रवेश चालू असतानाच मला िशक आली. त्याबरोबर आतडय़ाचा सगळा संयम सुटला. आता बरोबरच्या पात्रांच्या तोंडाकडे बघायचीसुद्धा लाज वाटते.’’
बाविशीच्या, नाजूक, देखण्या जाईचे आईवडील तर रडकुंडीला आले होते.
‘‘डॉक्टरसाहेब! अहो, लग्नाची मुलगी ही! सारखा अपानवायू सरतो हिला! ऐकू येत नाही. पण आम्ही आईबाप असून आमच्या नाकातले केस जळून जातात! सासरी गेल्यावर कसं व्हायचं हिचं?’’
नामांकित ऑफिसात सेक्रेटरी असलेल्या, पस्तिशीच्या रीटाला रिकाम्यापोटीसुद्धा लागोपाठ चाळीस-पन्नास ढेकर येतात!
गॅस कशाने होतो?
थोडी हवा अन्नपाण्याबरोबर, पेप्सीसारख्या फसफसणाऱ्या पेयांबरोबर गिळली जाते. ती बहुधा ढेकराच्या रूपाने वर येते. आपल्या अन्ननलिकेत हवेचा बुडबुडा अडकला तर अस्वस्थ वाटतं. ढेकर दिल्याने बुडबुडा वर येऊन बाहेर पडतो आणि बरं वाटतं. ढेकर देण्यासाठी इतके स्नायू हलवावे लागतात की बऱ्याच वेळा त्या भागातल्या स्नायूंचा बारीकसारीक इतर ताणही ढेकराने दूर होतो आणि आराम वाटतो. म्हणून छाती-पोटात काहीही गडबड वाटली तरी ढेकर मुद्दाम काढला जातो. अशा वेळी हवा तोंडातून अन्नलिकेत ओढून ती तिथूनच, आवाज करून, बाहेर ढकलली जाते. ती जठरापर्यंत पोचतही नाही. मानसिक ताणाखाली असलेल्या माणसांत त्याच प्रवृत्तीचा अतिरेक होतो आणि रीटासारखे सतत ढेकर येत राहतात. मग त्यांना त्या ढेकरांचीही काळजी वाटायला लागते. मुख्य ताण शोधून तो दूर केला की ढेकरही आपोआप थांबतात.
पण त्या गिळलेल्या हवेहून अधिक हवा आपल्या पोटातच बनते. ती कशी?
अन्न पचवायचं बहुतेक काम लहान आतडय़ात होतं. दुधातली लॅक्टोज नावाची साखरही तिथेच पचते. फळं-पालेभाज्या-धान्याचा कोंडा वगरेंतल्या फायबरसारखे, तिथे न पचलेले अन्नपदार्थच मोठय़ा आतडय़ात पोचतात. ज्यांच्या लहान आतडय़ात दुधातली लॅक्टोज-साखर पचवणारी रसायनं नसतात त्यांच्यात ती साखरही मोठय़ा आतडय़ापर्यंत पोचते. मोठय़ा आतडय़ात अनेक सूक्ष्म जंतू कायम वस्तीला असतात. ते तो आधी न पचलेला अन्नभाग खातात आणि त्या प्रक्रियेचा भाग म्हणूनच ते मिथेन, कार्बन डायॉक्साइड वगरे वायूही बनवतात. तशी बनलेली बरीचशी ताजी हवा खायला दुसरे काही ‘पोटभाडेकरू’ जंतू तत्पर असतात. शिवाय काही हवा रक्तात शोषून घेतली जाते. त्या पोषणा-शोषणाच्या नंतर जी उरते तेवढीच हवा दक्षिणवाटेने बाहेर पडते.
बाजारात मिळणाऱ्या स्किम्ड दुधाच्या भुकटय़ांत लॅक्टोज साखरेचं प्रमाण अधिकच असतं. वजन कमी करू इच्छिणारे लोक स्किम्ड दूध आणि भाज्या-फळं असाच आहार घेतात. त्यामुळे हवाबनवू जंतूंना भरपूर शिधा पोचतो. मग तर काय? हवाखाऊ जंतूंच्या प्रयत्नांची शिकस्तही अपुरी पडते. म्हणूनच वजन घटवायला डाएट सुरू केलं की दक्षिणवाताचं प्रमाण वाढतं.
प्रत्येकाच्या पोटातल्या जंतूंच्या जाती आणि त्यांची प्रमाणं वेगवेगळी असतात. हवाखाऊ जंतूंचं प्रमाण हवाबनवू जंतूंहून फार कमी असलं तर त्या दक्षिणवातांचा जोर वाढतो. ज्या भाग्यवंतांत ते प्रमाण उलटं असतं त्यांना गॅसेसचा त्रास क्वचित होतो. भाज्या-फळं वगरे सात्त्विक आहाराने होणाऱ्या वायुगर्जनांना सहसा दरुगधी येत नाही. त्या प्रदूषणासाठी कानफाटे ठरले आहेत ते पावटे! इतर कडधान्यंही कमीअधिक प्रमाणात फूसलावीच असतात. कॉलिफ्लॉवर, कोबी, नवलकोल वगरे भाज्याही त्यात हातभार लावतात. पण कांदा-लसूण, मांस-मासे-अंडी यांच्यासारखा तामसी आहार या बाबतीतला सर्वात मोठा खलनायक आहे. त्या सगळ्या खाद्यपदार्थात सल्फरची म्हणजेच ‘गंध’काची मात्रा भरपूर असते आणि तीच दरुगधीजनक असते.
म्हणून आपल्या वातप्रवृत्तीच्या गणितात आपल्या जंतुप्रकृतीची आणि आहारवृत्तीची बेरीज-वजाबाकी महत्त्वाची असते.
तशा साध्या कारणांनी वारा धरला तर पोट तात्पुरतंच फुगतं. ते सतत फुगलेलं, तडसलेलं राहात नाही. ते जर सतत वाढून ताणलेलं राहात असेल तर इतर कारणांचा विचार करायला हवा. अशा पोटफुगीत आतडय़ात अडथळे निर्माण होणं, पोटात पाणी होणं, कॅन्सरची वाढ असणं वगरे गंभीर आजारांची शक्यता संभवते. एक्सरे, अल्ट्रासाउंड, कॅट स्कॅन वगरे तपास करून त्या आजाराचं कारण शोधणं गरजेचं असतं. कधीकधी हार्ट-अ‍ॅटॅकचं दुखणंही ‘गॅसच आहे’ म्हणत अंगावर काढलं जातं. त्याबाबतीत सावधगिरी बाळगायलाच हवी.
नेहमीचे दक्षिणपंथी वारे मात्र क्वचितच विकारी असतात. एका जागी तासन्तास बसून राहिलं किंवा झोपलं की मोठय़ा आतडय़ात हवेचे मोठाले बुडबुडे साठतात. त्यानंतर शरीराची हालचाल झाली की आतडी घोळतात. मग बुडबुडेही हालतात आणि एकजुटीने, मोठा आवाज करून, एकाएकी बाहेर सरतात. सतत चलनवलन चालू ठेवलं, िहडत-फिरत राहिलं तर साठेबाजी होत नाही; वेळेला थोडीथोडी हवा बिन‘बोभाट’ सरते. पालेभाज्यांचा अतिरेक न करता त्यांचं नियमितपणे सेवन केलं तर पोटही साफ राहतं आणि हवेचं उत्पादनही आटोक्यात राहतं. अपानवायूची दरुगधी टाळायला कडधान्यं, कांदा-लसूण, सामीष भोजन पूर्णपणे वज्र्य करणं योग्य नाही. आपल्या शरीरातली प्रथिनं बनवताना, इतरही कित्येक आवश्यक प्रक्रियांना त्या पदार्थातल्या सल्फरची गरज असते. शिवाय प्रत्येकाच्या जिभेची आवडही निरनिराळी असते. तिचेही चोचले कधीना कधी पुरवायला हवेतच. हे सारं थोडय़ा प्रमाणात, संतुलित आहाराचा योग्य भाग म्हणून खाल्लं तर गंधप्रसार टळतो. ज्यांना लॅक्टोज पचत नाही त्यांनी दुधाची तहान आंबट ताकावर भागवावी.

अपानवायूचा त्रास कमी करण्यासाठी आपल्या आहारातल्या चुका हेरून त्या दुरुस्त कराव्यात.

काही माणसांची आतडी अधिक संवेदनशील असतात. आतडय़ांची साधीशी हालचाल किंवा आतडय़ातून वाट काढणारी छोटीशी झुळूकदेखील त्यांना बेचन करते. अशा माणसांना कधी पोटाच्या व्यायामांनी फायदा होतो तर कधी केवळ आहारपालटाने आराम वाटू शकतो. सायमेथिकोनच्या गोळ्यांनी जठरातल्या हवेचे बुडबुडे मोठे होऊन फुटायला मदत होते. अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोलच्या गोळ्या पोटातली हवा शोषून घेतात. अशा साध्या उपायांनी काहींना आराम पडतो. जाई किंवा अभिजितसारखं अगदी जिणंच हराम झालं असलं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने, मोजकेच दिवस, एखाद्या अ‍ॅण्टिबायॉटिकचा वापर केला तर हवाबनवू जंतूंची शिरजोरी घटवता येते. आंबट दह्यसारख्या पदार्थात हवाखाऊ जंतू अधिक असतात. तसे पदार्थ रोजच्या जेवणात घेतले तर आतडय़ातल्या हवाबनवू जंतूंच्या वसाहती हटून हळूहळू हवाखाऊंची वस्ती वाढायची शक्यता असते. तरीही, हवाबाणावर रामबाण उपाय अद्याप तरी नाही. ‘जातस्य हि ध्रुवो वायु:’ हेच खरं.
पण त्या वायूकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर तर इलाज आहे ना!
छोटय़ा बंटीला वारा सरला. खोलीत हशा पिकला. सगळ्यांनी त्याची चेष्टा केली. त्यातच मधूकाकांना जोराचा ढेकरही आला. त्यांना मात्र कुणीच हसलं नाही.
‘‘म्हणजे ढुंगणाने ढेकर दिला तरच हसायचं असतं का?’’ बंटीने निरागसपणे विचारलं.
केवळ स्थानसंसर्गामुळे अपानवायूला अपवित्र मानलं गेलं. त्याच्याकडे बघण्याची दृष्टी सदासर्वदा अशीच दूषित नव्हती. कॅनडातल्या आदिवासींच्या पुराणांत दक्षिणवाताचा मांत्रिकशक्तीशी संबंध जोडला होता. युरोपात तर त्या दक्षिणवाताची शीळ घालून गाणी वाजवणारे कलाकार होते. तशा दक्षिणगीतांच्या जाहीर मफिलींचे उल्लेख इसवीसनाच्या पाचव्या शतकापासून वरचेवर आढळतात. संस्कृतींचा शिष्टपणा जसजसा वाढत गेला तसतसा त्या क्रियेवरचा ओवळेपणाचा आळ अधिक पक्का होत गेला. समाजात त्या वायुविजनाचा उल्लेख तिटकाऱ्याने, उपहासाने झाला. त्याच्यावरून क्रूर म्हणता येतील असे विनोद झाले. सार्वजनिक शिष्टाचारांतून त्या क्रियेची हकालपट्टी झाली. सदाचारी अभिजित कानकोंडा झाला तो त्यामुळेच! चारचौघांत वारा सरला की ओशाळं वाटतं. काहीजण त्यामुळे समाजात मिसळायला घाबरतात. त्यांचा भयगंड वाढतो. काहींना काळजी, चिंता पछाडते तर काहीजणांवर गंभीर नराश्याची छाया पडते. अभिजितसारखे लोक कानकोंडे होतात आणि नोकऱ्याही बदलतात तर काही रांगडे मर्द मर्दानगीच्या सबबीखाली तो सोवळेपणा धाब्यावर बसवतात. कुलशीलवान बायकांना तसली पळवाट लाभणं कठीण आहे. वारा सरणं त्यांच्या बाबतीत लांच्छनास्पदच मानलं जातं. म्हणून तर जाईचे आईवडील जिकिरीला आले.
जपानी भाषेत, १९९४ साली, ‘आपल्याला सरणारा वारा’नावाचं एक पुस्तक लहानग्यांसाठी लिहिलं गेलं. त्याच्या इंग्रजी भाषांतराच्याच आजवर कोटय़वधी प्रती खपल्या आहेत. तशी पुस्तकं वाचून मुलं तर शहाणी होतीलच, पण आईवडील आणि आजीआजोबाही बरंच काही शिकतील.
त्याच्यात अगदी सोप्या शब्दांत मूलभूत माहिती आणि मोलाचा सल्ला दिला आहे :
अपानवायू सगळ्यांनाच होतो. वारा सरण्याचं प्रमाण कमी करायला प्रत्येकाने आपापल्या आहारातल्या चुका हेरून त्या दुरुस्त कराव्या, पोट साफ ठेवावं आणि पुरेसं चलनवलनही आवर्जून करावं. इतकं सगळं करूनही, सर्वसाधारण निरोगी मोठय़ा माणसांना दर दिवशी आठ ते वीस वेळा वारा सरतो. म्हणजे दिवसाभरात मिळून अर्धा ते दीड लिटर अपानवायू सरतो. तितक्या साहजिक गोष्टीचा बाऊ होता नये. ती हवा दाबून ठेवता नये. ती क्रिया िशक, उचकी, जांभई यांच्याइतकीच नसíगक आहे. तिच्यावरून कुचेष्टा होऊ नये. साधा वारा तो! त्याचं वादळ होऊ देऊ नये.