01khadiwaleवेगवेगळ्या चवींची, वेगवेगळ्या गुणधर्माची फळं ही निसर्गाने प्राणीसृष्टीला बहाल केलेली एक महत्त्वाची देणगी आहे. ही फळं वेगवेगळ्या विकारांमध्ये गुणकारी आहेतच शिवाय आरोग्यवान होण्यासाठीही ती उपयुक्त आहेत.

अननस
काही फळे एकटा-दुकटा माणूस खाऊ शकतो. केळी, द्राक्षे, संत्री, मोसंबी, चिक्कू ही अशी फळे आहेत. पण काही फळे संपूर्ण कुटुंबाला मिळून खावी लागतात. अननस, पपई, फणस, कलिंगड ही फळे एकटय़ा व्यक्तीला खाऊन संपविता येत नाहीत.
अननस हे सायट्रस फळांच्या जातीतील राजा फळ आहे. हल्ली अननस खूप मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. रस्त्यावर, विशेषत: मुंबई शहर व उपनगरांत उघडय़ावर कापलेल्या अननसाच्या फाकी मिळतात. त्या खाव्यात किंवा न खाव्या हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.
अननस फार लांबट नसावा. तो गोल व रुंद असावा. अननस अरुची दूर करण्याकरिता प्रसिद्ध आहे. अननस व किंचित मिरेपूड किंवा कणभर मीठ व चवीला साखर अशा फाकी खाल्ल्या की तोंडाला चव येते. जेवणावर वासना येते. अधिक जेवण जाते. अननसाचा आणखी गुण असा की, त्याच्यातील भरपूर पाचक रसामुळे खाल्लेल्या अन्नाचे पूर्ण पचन होते. व वारंवार मलप्रवृत्ती टळते. आहारापासून बनलेल्या रसधातूचे चांगल्या दर्जाच्या रक्तात रूपांतर होते. तात्काळ रक्तवर्धन करणाऱ्या पदार्थात अननस हे अग्रक्रमाचे फळ आहे. अननसाच्या सेवनाने पोटातील सर्व प्रकारचे जंत, लहान, मोठे सुतासारखे किंवा सुतळीसारखे, चपटे, गोल पाणी होऊन नाहीसे होतात. त्याकरिता मोठय़ा मात्रेने अननस खावा लागतो. अननसाच्या जोडीला पपई फळाचे सेवन केले तर यकृताचे कार्य चांगलेच सुधारते. आंबा, पपई, अननस असे एकत्र उत्तम रायते जेवणाला काही वेगळीच खुमारी आणते. इथे फोडणी मात्र मेथीची हवी व जोडीला गूळ वापरावा हे सांगावयास नकोच.
अननस खूप उष्ण आहे. गर्भिणीला देऊ नये. गर्भपाताची शक्यता असते. ज्यांचे तोंड येण्याची, जिभेला फोड येण्याची खोड आहे त्यांनी तसेच मधुमेही व्यक्तींनी अननस खाऊ नये.
आंबा
हा ‘फळांचा राजा’ दिवसेंदिवस सर्वसामान्य माणसाच्या आटोक्याच्या बाहेर गेला आहे. तरीपण औषध म्हणून काही महाग पडणार नाही, इतके श्रेष्ठ दर्जाचे गुण अंब्यात आहेत.
ज्यांना वजन वाढवायची नितांत गरज आहे. बारीक छातीच्या, खुरटय़ा स्तनाच्या, अशक्त, दुर्बल, ओज गमावलेल्या, शुक्राणू कमी असलेल्या सर्वाकरिता, नियमितपणे आंबा संपूर्ण सिझनभर खाणे लाभदायक ठरेल. आंबा खायचा झाला तर तास दोन-तास पाण्यात भिजत टाकावा त्यामुळे त्यातील चीक बाधत नाही. आंबा चोखून खाल्ला तर बाधत नाही. रस बाधतो. आमरसाबरोबर मिरेपूड व चांगले तूप अत्यावश्यक आहे.
आंब्याचे विविध प्रकार- दशहरा, लंगडा, पायरी, तोतापुरी, केशर, मलगोवा, रायवळ.
पांडुता, अल्पार्तव, कष्टार्तव या विकारांत आंबा अत्यंत गुणकारी आहे. क्षय विकारात महागडय़ा टॉनिकपेक्षा आंबा दूध किंवा तुपाबरोबर घ्यावा.
आंबा खाऊन अजीर्ण झाले तर आंब्यातील कोय हा निसर्गानेच योजलेला उत्तम उतारा आहे. स्त्रियांच्या धुपणी, पांढरे जाणे या विकारात तसेच सर्वसामान्यांच्या जुलाब, अतिसार, अजीर्ण, पोटदुखी, आमांश या तक्रारीत आंब्याची कोय फारच उपयुक्त आहे. आंब्याची कोय वरचे टरफल काढून बारीक तुकडे करून वाळवावी. चूर्ण करून वापरावे. हे औषध जास्त दिवस टिकत नाही. आंब्याच्या कोयीचे बारीक तुकडे करून एक दिवस मीठ पाण्यात भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी वाळवावे. सुपारीसारखे चघळायला उपयोगी पडतात. आंब्याच्या अजीर्णावर आलुबुखार हाही उत्तम उतारा आहे.
आंब्याची कोवळी पाने उलटीवरचा उत्तम उपाय आहे. आंब्याच्या मोहराचे तीळ तेलात उकळून सिद्ध केलेले तेल मऊ व बळकट केश संभाराकरिता उपयुक्त आहे. मधुमेही व्यक्तींनी आंबा पूर्ण वज्र्य करावा, सॉरी!
अंजीर
एकेकाळी अंजीर फेब्रुवारी-मार्चमध्ये मिळत. आता वर्षांतील सहा महिने अंजीर मिळतात. रूक्ष, कृश, स्निग्धतेचा अभाव असणारे, चिडचिड स्वभाव झालेले, अकाली वजन घटणाऱ्यांकरिता अंजीर हे वरदान आहे. अंजीर सारक आहे. विशेषत: जागरण, रात्रपाळय़ा, अति चहा किंवा धूम्रपान, दारू पिणे या कारणांनी आतडय़ांचा क्षोभ होत असेल तर रोज सहा ताजे अंजीर खावे. एका आठवडय़ात बराच फरक पडतो. अंजीर सेवनाने आतडय़ांना आतमध्ये पडलेले चर भरून येतात. रक्ती मूळव्याध विकारांत अंजीर सेवन उत्तम उपाय आहे. ताज्या अंजिराअभावी सुके अंजीर दुधात कुस्करून घ्यावे. मात्र त्यात कीड नाही याची खात्री करून घ्यावी. बालक व वृद्धांच्या मलावरोधात अंजीर उत्तम कार्य करते.
कलिंगड
एक काळ कलिंगड फक्त मार्च, फेब्रुवारीमध्ये मिळायला लागायची त्यावेळेस जी चव असायची त्या चवीची कलिंगडे ऑक्टोबरपासून सतत आठ महिने मिळूनही आता दुर्मीळ झाली आहेत. कलिंगडाचे तहान कमी करणे, रसधातू वाढविणे, लघवी साफ करणे हे गुण मात्र गोड कलिंगडातच सापडणार. कलिंगड जरी कितीही गोड असले तरी अतिरेकाने खाऊ नये. जुलाब होतात.
कुपथ्य : बाळंतीण, गर्भिणी यांनी कलिंगड बिलकूल खाऊ नये. त्यांच्याकरिता कलिंगड म्हणजे ‘पॉयझन’ आहे. विशेषत: गर्भिणीने व नवजात बाळंतिणीने किमान तीन महिने कलिंगड खाऊ नये. कलिंगडाऐवजी उन्हाळय़ात टरबूज (पांढऱ्या सालीचे, पांढरट पिवळसर गर असलेले) खावे. ते उत्कृष्ट तृषाहर आहे. चांगले टॉनिक आहे.
करवंद
एककाळ उन्हाळ्याच्या सुरुवाती सुरुवातीला पुणे-मुंबई-नाशिक या शहरांत खंडाळा, लोणावळा, कसारा अशा विविध घाटांतील करवंद या रानमेव्याची खवय्या मंडळी मोठय़ा आतुरतेने वाट पहायची. आता क्वचितच करवंदे बाजारात येतात. पहिल्यासारखी चव नाही. हे नवीन पिढीचे दुर्दैव.
कच्चा करवंदाची चटणी तोंडाला चव आणते. करवंदे माफक प्रमाणात खाल्ली तर तहान भागते. अधिक खाल्ली तर शोष वाढतो. तसेच करवंदे खूप खाऊन त्यावर सोसासोसाने पाणी प्यायलो तर तीच करवंदे बाधतात. याकरिता या उन्हाळय़ात अधाशाप्रमाणे बोरे, करवंदे खाण्याचे टाळा! कच्च्या करवंदाचे लोणचे अप्रतिम चवीचे होते.
आवळा
हरितकी जयेत व्याधीस्तांतांश्च कपवातजान।
तद्वत आमलकं शीतम्॥
आवळय़ाचे गुणधर्म सांगताना आयुर्वेदात हिरडय़ाचे गुणधर्म सांगून त्याप्रमाणे आवळा काम करतो, असे सांगितले आहे. फक्त फरक एवढाच की आवळा हा थंड आहे. त्यामुळे पार्वतीच्या एका डोळय़ाची उपमा असलेला हा आवळा कोणत्याही रोगावर, कोणाही व्यक्तीला निधरेकपणे द्यावा. ताज्या आवळय़ापासून ते थेट आवळय़ाच्या वेस्ट प्रॉडक्ट, आवळा सुपारीपर्यंत आवळा किती प्रकारे नाना प्रकारच्या विकारांवर उपयोगी पडतो हे बघितले तर जगात इतर औषधांची गरजच भासणार नाही. इतके आवळय़ाचे औषधी महत्त्व आहे.
आवळा हा विविध प्रकारे वापरता येतो, त्याचा ताजा रस, लोणचे, वाळवून केलेले चूर्ण, तेच चूर्ण चांगल्या तुपावर परतून केलेला आवळय़ाचा मावा, आवळा सरबत, मोरावळा, तेल, केसांकरिता आवळकाठी, तोंडात धरण्याकरिता आवळा सुपारी, आवळय़ाच्या बियांतील बियांची पूड अशा एक ना अनेक तऱ्हेने आवळा सर्वसामान्य माणसाच्या रोगनिवारणाकरिता वापरता येतो. आवळा तूप, मीठ, मध, हळद, साखर अशा विविध अनुपानाबरोबर वापरता येतो.
आवळा हा अग्निवर्धक, पाचक, बुद्धिवर्धक, आयुष्यवर्धक, मलप्रवृत्ति साफ करणारा, आयुष्य, बुद्धी व इंद्रिये यांचे बल वाढविणारा, कुष्ठविकार, त्वचेतील रंगातील कमीअधिकपणा, आवाज बसणे, डोके व डोळे यांचे विकार, रक्त कमी असणे, हृद्रोग, कावीळ, ग्रहणी, शरीर सुकत जाणे, सूज, जुलाब, फाजील चरबी, मोह, उलटी, जंत, दमा, खोकला, तोंडाला पाणी सुटणे, मूळव्याध, प्लीहा, उदर विकार, शरीरातील वहन यंत्रणेतील अडथळे, गोळा किंवा टय़ूमर, मांडय़ा जखडणे, अरुची, लघवी लाल होणे, केस गळणे व पिकणे, त्वचेला सुरकुत्या पडणे, अकाली वार्धक्य, विषविकार इत्यादी नाना पित्त व वातकफ विकारात विशेषत: धातूंच्या क्षयाच्या विकारात उपयुक्त आहे.
अग्निमांद्य विकारात आवळा चूर्ण, ताजा रस, वाळलेली आवळकाठी, आवडीनिवडीप्रमाणे मीठ किंवा जिरेपुडीबरोबर वापरावी. अजीर्ण विकारात आवळा सरबत, लोणचे, चूर्ण, मिठाबरोबर घ्यावे. पित्तज अजीर्णात मोरावळा उपयुक्त आहे. कृश माणसाच्या अर्धाग विकासाच्या अ‍ॅटॅकनंतर तुपावर परतलेला आवळय़ाचा मावा इंद्रियांना बल देतो. अम्लपित्त विकाराकरिता आवळा हे एकमेव औषध असू शकते. आमाशयातील उसळणारे पित्त आवळय़ाच्या रूक्ष गुणाने शांत होते. आवळय़ाचा रस, आवळा चूर्ण व साखर किंवा मोरावळा हे अम्लपित्तावरचे हुकमी शस्त्र आहे. कफप्रधान आम्लपित्तावर मधाबरोबर आवळा वापरावा. अ‍ॅलर्जी विकारात नियमाने आवळकाठी चूर्ण पोटात घ्यावे. अंगाला आवळकाठी चूर्ण दुधात कालवून लावावे. एवढेच काय अंगावर खूप खराब डाग असले तर आवळय़ाच्या बियांतील बियांचे चूर्णाचा लेप त्वचेला लावावा. त्वचेचा रंग पालटतो. त्वचेतील विवर्णता आवळय़ाच्या आंतर-बा उपचाराने बरी होते. काँग्रेस गवताच्या किंवा निरनिराळय़ा तेल उद्योगात काम करणाऱ्यांच्या त्वचेवरील काळे डाग सल्फा औषधांच्या अतिरेकाने पडलेले त्वचेतील डाग, नियमाने आवळकाठी चूर्ण किंवा आवळय़ाच्या रसात शिजवून सिद्ध केलेले तूप घेतल्याने बरे होतात. शरीराचा आंतर-बा होणारा दाह आवळकाठी चूर्ण पाण्यात कालवून अंगाला लेप लावून तसेच आवळय़ाचा रस किंवा आवळा चूर्ण दुधाबरोबर घेऊन बरा होता, आमांश विकारात रूक्ष गुणामुळे आवळा उपयोगी पडतो.
आमवात या विकारांत ज्यांना उष्ण तीक्ष्ण उपचार चालत नाहीत त्यांना आवळा हे वरदान आहे. आवळकाठी चूर्ण किंवा ताज्या आवळय़ाचा रस व त्यासोबत सुंठ चूर्ण किंवा आल्याचा रस भोजानानंतर नियमित घ्यावा. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचा आम बनत नाही. शौचाला चिकटपणा येत नाही. किमान महिनाभर आवळा व सुंठचूर्ण घेतल्यास आमांश कमी होऊन आमवाताचे मूळ कारण दूर होते.
पांढरी आव, विशेषत: ज्यांचा कोठा दुर्बल आहे, ज्यांना मुंबईसारख्या शहरात हॉटेलात एकवेळ जेवावे लागते, नाइलाजाने अध्र्याकच्चा आटय़ाची पोळी, पुऱ्या, बटाटा, न शिजलेली कडधान्ये किंवा आंबवलेले पदार्थ इडली, डोसा, वडापाव खावा लागतो त्यांनी वरीलप्रमाणेच जेवणानंतर सुपारी तंबाखूऐवजी आवळा व सुंठ चूर्ण मिश्रणाची चिमूट चिमूट पूड तोंडात टाकावी. वातानुलोमन होते व सूक्ष्म तसेच स्थूल पचन सुधारते.
भारतीय कष्टकरी स्त्रिया, विशेषत: पस्तीस, चाळीस वयाच्या स्त्रियांमध्ये फार मोठय़ा प्रमाणावर अंगावर पांढरे जाणे, श्वेत प्रदर, धुपणी, कंबर दुखणे हे दुखणे आढळून येते. अशा स्त्रियांनी नियमितपणे आवळाकाठी चूर्ण, जिरेपूड, पाणी व चांगल्या तुपाबरोबर घ्यावी. पंधरा दिवसांत गुण येतो.
उदर विकारात पित्तप्रधान लक्षणे असल्यास, तीव्र जुलाबाची औषधे रोग्याला सोसवत नसल्यास एरंडेल किंवा रेचल औषधे कशी द्यावीत हा प्रश्न पडतो. आतडय़ांच्या अंत:त्वचेला इजा न पोचवता मुलानुलोमन कसे होईल, पोटातील पाणी कसे कमी होईल, असा यक्ष प्रश्न असतो. विशेषत: मद्यपानाच्या अतिरेकाने ज्यांचे यकृत, प्लीहा हे अवयव बिघडले आहेत त्यांच्याकरिता आवळकाठी चूर्ण व सोबत गाईचे दूध किंवा गोमूत्र द्यावे.
उलटी, तोंडाला पाणी सुटणे, मळमळ या विकारांत आवळा सुपारी सर्वजण वापरतात. आवळय़ाचा रूक्ष गुण व तुरट रस गर्भवतीच्या सकाळच्या उलटय़ांवर फारच उपयोगी पडतो. ज्यांच्या पोटात वायू धरतो त्यांनी उलटय़ांकरिता सोबत जिरे व सुंठ चूर्ण मिसळून आवळा सुपारी करावी. उलटी थांबते, आहार वाढतो, खाल्लेले अंगी लागते. कंडू या विकारात विशेषत: मधुमेह व पित्त वाढलेल्या काविळीत आवळकाठी चूर्ण किंवा आवळय़ाचा रस पोटात घ्यावा. बाहेरून आवळा चूर्ण दूध किंवा पाण्यात कालवून खाज सुटत असलेल्या भागी चोळून लावावे. खाज थांबते. कफ विकारात आवळा चूर्ण मधाबरोबर घ्यावे किंवा ताजा आवळा नुसता चघळावा. खूप कफ, श्वास, खोकला, सर्दी, मधुमेह विकारात आवळकाठी व हळदीचे चूर्ण एकत्र करून घ्यावे. ओळी हळद व ताजा आवळा यांची चटणी खावी.
केसांचे गळणे व अकाली पिकणे या विकारांत तसेच कोंडा, खाज, खवडे या तक्रारीत ताजा आवळा नियमितपणे खावा. त्याअभावी आवळकाठी चूर्ण घ्यावे. केस व डोके धुण्यासाठी आवळकाठी चूर्ण पाण्यात उकळून वापरावे. कोंडा हा विकार नव्हे पण तरी त्यावर इलाज हवा. ज्यांचे कोड दीर्घकाळाचे आहे, खाण्यापिण्याची आबाळ आहे. नाइलाजाने बाहेरचे जेवावे लागते. पथ्यपाणी पाळता येत नाही, त्यांनी नियमितपणे आवळाकाठी चूर्ण खावे.
कॅन्सर हा दुर्धर विकार आहे. भल्याभल्यांनी हात टेकले आहेत. अशा कष्टसाध्य किंवा असाध्य अवस्थेत ताजा आवळा मिळाल्यास त्याचा रस किंवा त्याचे सावलीत वाळवून केलेले चूर्ण घ्यावे. वर गाईचे दूध प्यावे, रुग्णाच्या शरीरातील चयापचय सुधारते. आयुष्यमान वाढते. एक किलो ताजे आवळे घेऊन कापून किंवा किसून स्टेनलेस स्टीलच्या ताटात किंवा काचेच्या प्लेटमध्ये सावलीत वाळवून त्याचे चूर्ण केले तर खूप महाग असले तरी त्या चूर्णासारखे टॉनिक नाही. विशेषत: एड्स, राजयक्ष्मा, कोणताही कॅन्सर, अल्सर, दुर्धर ग्रहणी रोग अशा गंभीर विकारांत हा उपाय जरूर करून पाहावा. अतिकृश माणसाने असे वाळलेले तुकडे तुपात तळून सांडग्यासारखे कुरकुरीत झाले की खावेत. कोरडी ढास, ढांग्या खोकला, पित्तप्रधान खोकला, थुंकीतून रक्त पडणे, आवाज बसणे यावर ताज्या आवळय़ाचा रस, आवळकाठी व खडीसाखर फारच उपयुक्त आहे. गरमी, परमा, उपदंश, या विकारांत आवळकठी चूर्ण, जिरे व गाईच्या दुधाबरोबर घ्यावे.
गोवर, कांजिण्या, लहान मुलांच्या गंडमाळा, शय्यामूत्र, हातापायांच्या काडय़ा व पोटाचा नगारा, मुडदूस अशा बालविकारात आवळा चूर्ण, गाईचे दूध, खडीसाखर किंवा मध असे मित्रण म्हणजे बालकांना मोठे टॉनिकच आहे.
ग्रीष्म व शरद ऋतूत तसेच कडक उन्हाळय़ात खूप घाम येणे स्वाभाविक आहे. पण शीत ऋतूतही जेव्हा खूप घाम येतो व त्या घामाला घाण वास मारतो तेव्हा आवळय़ाचा रस किंवा चूर्ण, धने व जिरे मिश्रणाबरोबर घ्यावे. कृश माणसाच्या छातीत दुखणे, जुनाट जखमा व जळवात या विकारांत ताज्या आवळय़ाचे सावलीत वाळवलेले चूर्ण चांगल्या तुपावर परतून घ्यावे. पित्तप्रधान, डोकेदुखी, हातापायांची, डोळय़ांची आग, नागीण, निद्रानाश या तक्रारीत नियमितपणे मोरावळा खावा. ताज्या आवळय़ाचा सिझन असल्यास आवळय़ाच्या रसात सिद्ध केलेले तूप नियमितपणे खावे. तसेच त्या तुपाने कानशिले, तळहात, तळपाय यांना हलक्या हाताने मसाज करावे.
फिटस् येणे विकारांत बहुतेक सर्व रुग्ण आधुनिक औषधे घेतात. त्यांनी मेंदू झोपविण्याचे कार्य होते. त्यामुळे रुग्ण, विशेषत: तरुण मुले मुली यांची स्मरणशक्ती कमी होते. साध्या साध्या गोष्टी आठवत नाहीत. अशांनी या विदेशी औषधांचा दुष्परिणाम टाळण्याकरिता ताज्या आवळ्याचा रस किंवा त्यात सिद्ध केलेले तूप नियमितपणे, संपूर्ण सिझन संपेपर्यंत घ्यावे. मेंदूला नवीन बळ मिळते. उन्माद या विकारांत त्याचा उपयोग होतो.
काही तरुण मुले-मुली कौटुंबिक परिस्थितीमुळे मनात कुढत असतात. न्यूनगंड निर्माण होतो. धास्ती वाटते. पुढाकार घेऊन काम करण्याचा उत्साह नसतो. जीवनांतील चांगल्या आलेल्या संधीचा फायदा घेता येत नाही. अशा ठिकाणी मनाचे बल, आत्मबल, आत्मविश्वास वाढविण्याकरिता आवळ्याचा रस सिद्धतूप मोरावळा, आवळा व मध अशा वेगवेगळय़ा प्रकारे वापरता येईल. सुदैवाने हल्ली आवळ्याचा सिझन ऑगस्टपासून फेब्रुवारीपर्यंत दीर्घकाळ असतो.
शरीरामध्ये दर क्षणाला शारीरिक हालचालीमुळे काही झीज होत असते. घाम व लघवी यांच्या मार्गाने शरीरांतील सात धातूंतील कार्यकारी द्रव्य कमी होत असते. त्याची वाजवी भरपाई आवळ्याचा ताजा रस करतो. घामाचा घाण वास, घाम खूप येणे, लघवीचा लाल रंग, लघवीला जळजळ, खर पडणे, बहुमूत्रप्रवृत्ती यांवर आवळकाठीची पूड अतिशय उपयुक्त आहे.
शरीराचे फाजील पोषण झाल्याने विशेषत: फाजील चरबी, पिष्टमय किंवा खूप खारट व गोड पदार्थ खाण्याने शरीरास पन्नाशीनंतर अनेक व्याधी घेरतात अशा वेळी रक्तदाबवृद्धी, मधुमेह, स्थूलपणा, अंगाला खाज सुटणे, शरीरावर सूज येणे, भगंदर, मूतखडा, आळस, अनुत्साह, नपुंसकत्व, हृद्रोग या विकारांत आवळा हा एक मोठा आधार आहे. शरीराला नेमकी लागणारी ऊर्जा देणे व फाजील मल न वाढू देणे हे कार्य आवळा करतो. इथे मात्र आवळ्याबरोबर तूप न वापरता आवळा रस, चूर्ण, वाळवलेले तुकडे किंवा सोबत मध अनुपान म्हणून वापरावा.
तोंड येणे, तंबाखू, मशेरी किंवा सिगारेट पिऊन तोंडात, गालात, जिभेला फोड येणे, रक्ती मूळव्याध, भगंदर या विकारांत तोंडात आवळकाठी धरण्यापासून तो विविध प्रकारे परिस्थितीनीरूप आवळा वापरावा.
मधुमेह, जुनाट सर्दी, नाकांतून शेंबूड वाहणे, खूप पातळ कप पडणे, कफाला घाण वास मारणे या विकारांत आवळा व हळद चूर्ण एकत्रित करून मधाबरोबर घ्यावे. स्त्रियांच्या धुपणीच्या विकारांत तसेच अंगावरून लाल विटाळ खूप जात असल्यास केवळ आवळकाठी चूर्ण मधाबरोबर घ्यावे. पित्तप्रधान मलावरोधात आवळकाठी चूर्णामुळे सौचावाटे पित्त पडून जाते व आराम पडतो.
औषधांची नावे- त्रिफळा चूर्ण, आमलक्यादी चूर्ण, रसायन चूर्ण, आमलक्यादी तेल, च्यवनप्राश, धात्री रसायन, मोरावळा इ.इ.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
Why HbA1c test important for diabetes diagnosis Who should do it and how consistently
विश्लेषण : HbA1c चाचणी मधुमेह निदानासाठी महत्त्वाची का आहे? ती कुणी आणि किती सातत्याने करावी?