‘हैदर’ हा सिनेमा विशाल भारद्वाजचा असल्यामुळे त्याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. पण, सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सिनेमा न आवडणाऱ्यांपैकी एक आहे ‘अग्निवीर’ ही संस्था. सिनेमात भारतीय सैन्याबाबत रेखाटलेल्या चुकीच्या चित्रणामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विशाल भारद्वाज हे चांगले दिग्दर्शक म्हणून सगळ्यांना माहीत आहेतच, पण त्याहून ते जास्त माहीत आहेत ते त्यांनी केलेल्या शेक्सपियरन ट्रॅजेडीजच्या भारतीयीकरणामुळे. ‘मॅकबेथ’ आणि ‘ऑथेल्लो’ जेव्हा ‘मकबूल’ आणि ‘ओंकारा’च्या माध्यमातून इथल्या मातीतले बनून आपल्यासमोर आले तेव्हा मानवी भावभावनांबद्दल, माणसाच्या जगण्याबद्दल शेक्सपियरने चारशे वर्षांपूर्वी जे सांगून ठेवलंय ते वैश्विक सत्य भारतीय मातीत देखील जसंच्या तसं लागू पडतं ते आपल्याला उमगलं. त्यामुळेच विशाल भारद्वाज ‘हॅम्लेट’ करणार म्हटल्यावर सगळ्या जाणत्या सिनेरसिकांचं लक्ष लागून राहिलं होतं. शेक्सपीयरचा ‘हॅम्लेट’ इथल्या मातीतला ‘हैदर’ बनून आला खरा, पण ‘मकबूल’ आणि ‘ओंकारा’ बघितल्यावर सगळ्यांकडूनच आला तसा ‘व्वा..’ काही आला नाही.

कुणाला शाहिद कपूर आवडला तर कुणाला तब्बूचं काम आवडलं, कुणाच्या मनावर इरफान खानने छाप टाकली तर कुणाच्या के. के. मेनननं. सिनेमावर टीकाही होत होतीच. त्यात आता भर पडली आहे, देशभक्ती, स्त्रियांचे हक्क, पर्यटन, जातीयवाद असे सामाजिक विषय सर्वसामान्य लोकांपर्यंत नेऊन भिडवणाऱ्या ‘अग्निवीर’ नावाच्या संस्थेच्या प्रतिसादाची. या संस्थेने तर या सिनेमातल्या तपशिलातल्या अनेक गोष्टींवरच आक्षेप घेतला आहे. या संस्थेच्या मुख्य टीममध्ये असणारे आठ ते दहा जण हे आयआयटी आणि आयआयएमचे पदवीधर आहेत. ‘अग्निवीर’चे भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी या संस्थांचे जवळपास हजार कार्यकर्ते आहेत. हे सगळेचजण देशभक्तीने प्रेरीत असल्याचे संस्थेचे समन्वयक वाशिमंत शर्मा सांगतात. भारतीय सैन्याचं चुकीचं चित्रण केलं म्हणून ‘हैदर’वर ते नाराज आहेत. तसा कानपूरच्या आयआयटीत व्हिजिटिंग फॅकल्टी असलेल्या संजीव नेवार यांनी लिहिलेला लेखच त्यांनी त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित केला आहे..

‘हैदर’ हा सिनेमा खूप एकांगी असून सिनेमात भारतीय सैन्याला खलनायकी छटा असल्याचं संस्थेचे समन्वयक वाशिमंत सांगतात. दहशतवाद्यांनाही मन असतं, भावना असतात हे सिनेमातून दाखवलं आहे, पण हे सगळं दाखवताना भारतीय सैन्याला मात्र दिग्दर्शकाने खलनायक ठरवलंय, असं त्यांचं म्हणणं आहे. सिनेमात खलनायक दाखवलेला नायकाचा काका हा सैन्यासोबत काम करतो आहे. ‘‘सिनेमातल्या पहिल्याच प्रसंगात नायकाचं घर उडवल्याचं दाखवलं आहे. नायकाचे वडील डॉक्टर असतात. ते एका दहशतवाद्याला दुखापत झालेली असल्यामुळे त्याला घरात आणून त्यावर उपचार करतात. हे सैन्याला कळतं म्हणून ते त्याचं घर उडवतात असं दाखवलंय. हे चुकीचं आहे, असं कधीच होत नाही. यावरून भारतीय सैन्याला काश्मिरी लोकांच्या आयुष्याशी काही देणं-घेणं नाही असा चुकीचा संदेश जातो’’, असं शर्मा सांगतात. तसंच सिनेमात जे जे भारतीय सैन्यासोबत काम करताना दाखवले आहेत ते फितूरच दाखवले आहेत. भारतीय सैन्याचा या सगळ्याबाबतचा दृष्टिकोन, त्यांचे विचार ही बाजू सिनेमात आलेली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

संस्थेच्या साइटवरच्या या लेखाला सध्या सेवेत असलेल्या तसंच अनेक निवृत्त सैनिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं ते सांगतात. वेगवेगळ्या माध्यमांमधूनही या लेखावर चर्चा झाली आहे. तर काहींनी ‘‘सिनेमा करणं ही एक कला आहे. त्याकडे त्याच दृष्टीने बघितलं पाहिजे’’, ‘‘सिनेमा बघून सोडून द्यावं’’, ‘‘वेगळा आणि बोल्ड सिनेमा आहे. चांगला आहे’’ अशा वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्याचं वाशिमंत सांगतात. साइटवर असलेल्या लेखात सिनेमाच्या लेखकावर जास्त टीका आहे. नेवार यांचं म्हणणं असं आहे की, ‘‘या सिनेमाचे लेखक बशरत पीर यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, भारताशी माझा काही संबंध नाही. मी फक्त काश्मिरी आहे.’’

भारतीय सैन्य काश्मिरी लोकांसोबत चुकीची वर्तणूक करतं असं सिनेमात दाखवलं आहे. यावरून काश्मिरी लोकांची भारतीय सैन्याला पर्वाच नाही असा आणि यामुळे वेगळा काश्मीर हवा या मुद्दय़ाला प्रोत्साहन देणारा चुकीचा संदेश पोहोचतो, असं समन्वयक शर्मा यांचं म्हणणं आहे. त्यांना सिनेमात खटकलेली आणखी एक गोष्ट म्हणजे ‘‘सिनेमातलं ‘बिसमिल बिसमिल’ हे गाणं काश्मीरमधल्या अनंतनाग इथल्या मरतड मंदिरामध्ये शूट झालंय. सैतानासारखा वेश परिधान करून सिनेमाचा नायक शाहिद कपूर मंदिरात नाचतो. इतर लोक चपला घालून आत बसलेले दाखवले आहेत. तिथेच गाण्यानंतर गोळीबार होतो. हे सगळं न पटणारं आहे.’’ असं ते सांगतात. नायक अनंतनागला इस्लामाबाद म्हणतो. हाही काश्मीर वेगळं करण्याच्या मुद्दय़ाला प्रोत्साहन देणारा संदेश असल्याचं ते सांगतात.

संस्थेच्या साइटवर प्रकाशित झालेल्या लेखामधले काही मुद्दे:

’ ‘चुत्स्पा’ या शब्दाचा सिनेमात उल्लेख आहे. AFSPA (Armed Forces Special Powers Act)  चाही उल्लेख केला गेलाय. आणि एका प्रसंगात हा शब्द म्हणजे अफ्स्पा आणि चुत्स्पा यात फारसा फरक नाही असंही म्हटलंय. खरं तर या अफ्स्पा मुळेच हा सिनेमा शूट होऊ शकला याचा सोयीस्कररीत्या विसर पडतोय.

’ एका प्रसंगात नायक हैदर श्रीनगरच्या लाल चौकात भाषण करत असतो. भारताने काश्मिरी लोकांना कसा दगा दिलाय. त्यांच्यावर कसा अन्याय केलाय वगैरे असं भाषण करत असतो. पण खरं तर भारताच्या विरोधातलं हे दृश्य सिनेमाचं सौंदर्य म्हणून समोर येण्याची ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

’ सिनेमाचा लेखक बशरत पीर हा काश्मिरी अलगवादी असून तो आता न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाला आहे. तो तिथूनच त्याच्या तथाकथित स्वातंत्र्याची लढाई लढतोय. तो जन्माने भारतीय, इथेच शिकला तरी तो भारताच्या विरोधातच बोलतोय. भारतीय पासपोर्ट असणं हा आपला नाईलाज असल्याचंही त्याचं मत आहे, काश्मीरबद्दल लिहिणाऱ्या बशरत पीरचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित आहे, हेच ते या लेखातून सुचित करतात.

’ हा सिनेमा भारतीय लष्कराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो.

’ हा सिनेमा बनवणारे स्वत:ला काश्मीर प्रश्नाचे प्रवक्ते समजतात असा प्रश्नही या लेखात उपस्थित करण्यात आला आहे. हैदरची कथा भारताकडे असलेल्या काश्मीरमध्ये सुरू होऊन तिथेच संपते. मग लेखक आणि दिग्दर्शक पाकव्याप्त काश्मीरमध्ये काय चाललंय त्यावर कॉमेंट का करत नाही? विशाल भारद्वाज पाकिस्तान किंवा चीनमध्ये जाऊन तिथल्या सैन्यावर अशी कॉमेंट करू शकतात का? यातच त्यांचे हेतू स्पष्टपणे दिसतात असं या लेखाचं म्हणणं आहे. भारतीय सैन्याने यांना शूटिंगची परवानगी दिली आणि त्या सैन्यावरच या लोकांनी टीका केलीय.

’ संपूर्ण सिनेमाभर दहशतवाद्यांमधली माणुसकी दाखवली आहे. भारतीय सैन्य त्यांच्यावर कसा अन्याय करतं ते दाखवलं आहे. पण १९८९ मध्ये, तीन-चार लाख हिंदू-शिखांची हत्या झाली, बलात्कार झाले हे एकदाही दाखवलं नाही किंवा सांगितलंही नाही. उलट सिनेमात दहशतवाद आणि अलगवादाला प्रोत्साहन देण्यात आलंय. पण तिथल्या अल्पसंख्याक असलेले हिंदू-शीख यांच्यावर अत्याचार होतोय, याबाबत एकही प्रसंग दाखवला नाही. हेच पाकिस्तानचंही मिशन नाही का, असा सवाल हा लेख उपस्थित करतो.