हिंदी सिनेमाने वेळोवेळी स्त्रीची बदलती रूपं मांडताना काळ बदलला तरी भारतीय स्त्रीची घुसमट मात्र पूर्वी होती तशीच आहे किंवा यांसारख्या भारतीय स्त्रीच्या वास्तववादी रूपाचे चित्रण केले आहे. लेखक-दिग्दर्शक महेश भट यांनी स्त्री-पुरुष संबंधांचे चित्रण करणारे चित्रपटही केले असून त्यामध्ये भारतीय स्त्रीची निरनिराळी रूपं दाखविण्याचाही प्रयत्न केला आहे. ‘आशिकी’सारख्या चित्रपटातून तरुणाईचे प्रेम दाखविण्याबरोबरच ‘सारांश’, ‘अर्थ’, ‘डॅडी’, ‘जख्म’ यांसारखे राष्ट्रीय तसेच अन्य पारितोषिके पटकाविलेल्या हिंदी चित्रपटांचे लेखन-दिग्दर्शनही महेश भट यांनी केले आहे. 

आता बऱ्याच कालावधीनंतर महेश भट यांनी दिग्दर्शक म्हणून नव्हे तर लेखक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. १२ जून रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटाचे लेखन महेश भट यांनी शोगुफ्ता रफिक यांच्या बरोबरीने केले आहे. भट कॅम्पचा दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण झालेला ‘आशिकी २’फेम दिग्दर्शक मोहित सुरीने ‘हमारी अधुरी कहानी’चे दिग्दर्शन केले असून भट कॅम्पचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट गणला जात आहे.
वसुधा या प्रमुख भूमिकेत विद्या बालन चमकणार असून भट कॅम्पचा अभिनेता इम्रान हाश्मी पुन्हा एकदा भट कॅम्पसोबत या चित्रपटातून झळकणार आहे.
या चित्रपटाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे महेश भट यांचे वडील नानाभाई भट आणि त्यांची महेश भट यांची सावत्र आई शिरीन मोहम्मद अली यांच्या प्रेमकथेवर ‘हमारी अधुरी कहानी’ हा चित्रपट आधारलेला आहे.
धाडसी लेखक-दिग्दर्शक म्हणून महेश भट यांचे नाव घेतले जाते. परंतु, आपल्याला जे दिग्दर्शक म्हणून सांगायचे होते ते आता सांगून झाले आहे. मात्र आपल्याला माहीत असलेली प्रेमकथा आजच्या भारतातील पिढीसमोर मांडायची असल्यामुळे त्याचे दिग्दर्शन आपण केले नाही, असे भट यांनी माध्यमांना सांगितले होते. या चित्रपटाची संपूर्ण कथा भट यांची असून संवादलेखन व पटकथा विस्तार शोगुफ्ता रफिक यांनी केला आहे.
वसुधा प्रसाद हिचे आरव रुपारेल या आघाडीच्या हॉटेल व्यावसायिकाशी प्रेम जमते, पण तिचा भूतकाळ तिला आठवतो तेव्हा ती घाबरून जाते. आरव रुपारेल ही व्यक्तिरेखा इम्रान हाश्मीने साकारली असून वसुधा प्रसादच्या नवऱ्याची हरी ही व्यक्तिरेख राजकुमार राव या कलावंताने साकारली आहे.
‘हमारी अधुरी कहानी’ हा चित्रपट वसुधा या मध्यमवयीन विवाहित स्त्रीची कथा सांगतो. वसुधाची कथा ज्या विचारातून जन्माला आली ते विचार खरं म्हणजे ते संवाद हे खाणीवर काम करणाऱ्या मजूर महिलांचे आहेत, असे वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतींमध्ये भट यांनी सांगितले आहे.
‘मांग मेरी सिंदूर तुम्हारे नाम का? कोख मेरी, खून मेरा, दुध मेरा, बच्चा तुम्हारे नाम का? हे संवाद माझे नाहीत. असे काही लिहिण्याची ताकद माझी नाही. मजूर स्त्रियांबरोबर संवाद साधताना त्यांनी तक्रार केली होती. आम्हाला मुक्ती हवी आहे. दिवसभर काम करून घरी आल्यानंतर आमचा नवरा आम्हाला मारतो. लाथाडतो. तरीही आम्ही त्यांना सांभाळतो. ‘करवा चौथ’सारखं व्रत करून पुन्हा त्याच्याकडेच ‘सदा सौभाग्यवती’ राहण्याचा आशीर्वाद मागतो. ही कसली परंपरा आहे, हा प्रश्न त्या स्त्रियांनी विचारलेला आहे. पण हा प्रश्न फक्त माझ्या घरात काम करणारी मोलकरीण विचारते असं नाही. आज जीन्स-कुर्ता घालून फिरणारी आजच्या काळातील स्त्रीसुद्धा हाच प्रश्न विचारते. याचाच अर्थ, विवाहाचा हा संस्कार स्त्रीच्या रोमारोमांत इतका भिनला आहे,’ असे मत या सिनेमाविषयी बोलताना महेश भट यांनी व्यक्त केले आहे.
वसुधा ही चित्रपटाची नायिका आजच्या काळातील आहे. कथा आधीच्या काळातील प्रेमकथेवर बेतलेली असली तरी दिग्दर्शक आणि कलावंत हे आजच्या काळातील रंग भरून ही प्रेमकहाणी मांडणार आहेत, असेही भट यांनी म्हटले आहे.
स्त्री-पुरुष संबंधांवरचा आणि भारतीय स्त्रीच्या दृष्टिकोनावर प्रकाशझोत टाकणारा हा सिनेमा असेल असा अंदाज करायला हरकत नाही.
मोहित सुरी दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमध्ये लोकप्रिय झाले असून ‘द डर्टी पिक्चर’, ‘घनचक्कर’ आणि आता ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटातून विद्या बालन आणि इम्रान हाश्मी यांची जोडी तिसऱ्यांदा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
ट्रेलर्सना मिळत असलेला प्रतिसादाबरोबरच भट कॅम्पच्या सिनेमांचे संगीत हाही चर्चेचा विषय ठरत असतो. हा चित्रपट प्रेमकथापट रूढार्थाने नसला तरी प्रेम हा विषय यात आहेच. त्यामुळे लव्ह स्टोरी म्हटली की प्रेक्षकांनाही अपेक्षित असलेले संगीत आणि गाणी या चित्रपटातही आहेत. मिथुन, जीत गांगुली, अमी मिश्रा या त्रिकुटाने चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. हमारी अधुरी कहानी हे शीर्षकगीत अरिंजित सिंगच्या आवाजात आहे.
भारतीय मध्यमवयीन स्त्री ही चित्रपटाची नायिका असल्याने या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय स्त्रीचे आधुनिक रूप वेगळ्या कोनातून मांडण्याचा प्रयत्न महेश भट यांनी चित्रपटाच्या लेखनातून केला असावा अशी अपेक्षाही करायला हरकत नाही.
सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com