आपल्या आहारातल्या फळभाज्या, शेंगभाज्या हे नुसते तोंडी लावणे नसते. या भाज्या आपल्या पोषणासाठी महत्त्वपूर्ण हात भार लावतातच शिवाय त्या बहुगुणी आहेत. विविध विकारांमध्ये त्या गुण देणाऱ्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या रोजच्या आहारात धान्ये, कडधान्ये यांचे जसे महत्त्व आहे तसेच महत्त्व फळभाज्यांना आहे. त्यांना नुसते ‘तोंडीलावणे’ असे न म्हणता मुख्य अन्नाबरोबर साहाय्यक अन्न म्हणून वाजवी सहभाग द्यायला हवा. गहू, भाताबरोबर फळभाज्या, शेंगभाज्या असल्या तरी मानवी शरीराचे सम्यग् पोषण होते. फळभाज्यांमुळे आपल्या मोठय़ा आतडय़ात फायबरयुक्त पुरेसा मळ तयार होतो.
कटरेली
कटरेली, ककरेटी, कंकेली या नावाने झुडपाच्या आश्रयाने पावसाळय़ात वेल वाढतात. त्या वेलांवर सुरेख, हिरव्या रंगाची काटेरी फळे येतात. चवीला तिखट पण रुची आणणारी फळे चातुर्मासात धार्मिक महत्त्व म्हणून आवर्जून खाल्ली जातात. ही फळे अग्निमांद्य दूर करतात. स्वादिष्ट व पथ्यकर भाजी होते. पोटमुखी, वायुगोळा, कृमी, जंत, त्वचेचे विकार, दमा, खोकला, वारंवार लघवी होणे या विकारात कटरेली हे फळ विशेष उपकारक आहे. मलप्रवृत्ती सुखकर होते.
करांदा
करांदा किंवा काटे कणंगचे कांदे शिजवून खावे. ते पौष्टिक नाहीत पण मूळव्याध, रक्त पडणे, पोट बिघडणे, अरुची, मंदाग्नी यावर उपयुक्त आहेत.
कारले
वीस-पंचवीस वर्षांच्या मागे कारले खाणारी महाराष्ट्रात फार थोडी माणसे भेटत. उत्तरेत, विशेषत: दिल्ली, राजस्थान, कानपूर या ठिकाणी पंजाबी डिशमध्ये मात्र आवर्जून ‘कारेला’ भाजी लोक आवडीने खाताना दिसायचे. गेल्या पंचवीस वर्षांत आपल्यात खूप ‘सुधारणा’ झाली असे लोक म्हणतात. समृद्धी, पैसा, आराम आला. त्याबरोबर त्याचे रोगही आले. सर्व रोगांचा या जगातील राजा म्हणजे मधुमेह, त्याचा प्रचार, प्रसार जसा वाढतोय तसतसे कारले या भाजीचा महिमा, मागणी, किंमत, वापर वाढत चाललाय.
कारले फळ, पाने, फळाची पावडर, रस अशा विविध स्वरूपात वापरले जाते. कारले खूप कडू असते. तशा अनेक भाज्या कडू आहेत. पण ‘संतर्पणोत्थ’ व्याधी म्हणजे जास्त खाऊ शकू अशी दुसरी भाजी नाही. कडू रसाचे पदार्थ, स्वत:ची चव खराब असली तरी अरुची, कृमी, विषविकार, खूप तहान लागणे इत्यादी कफ विकारात उत्तम काम देतात. कारले बहुमूत्र प्रवृत्ती, थकवा, ग्लानी, कृमी, जंत, मोठे जंत कृमीमुळे सर्दी, खोकला, खाज, त्वचारोग, डोळे जड होणे, जीभ पांढरी होणे, जखमा चिघळणे, जखमांतून पू वाहणे, यकृत-प्लाहा वृद्धी, विषमज्वर, पांडू, अजीर्ण, शोथ, पित्तप्रकोप, आमवात इत्यादी विविध तीनही दोषांच्या तक्रारीत काम करते. मधुमेह, मधुमेही जखमा, स्थौल्य व स्तनांचे विकार यावरती कारले विशेष प्रभावी कार्य करते. औषध म्हणून चांगल्या कारल्याची निवड असावी. सरळ आकाराची, फार जून नाही अशी कारली उपयोगी आहेत. लहान बालकांच्या मधुमेहात शक्यतो कारले हे फळ वापरू नये.
कारल्याच्या पानांचा रस विषमज्वर व यकृत प्लीहावृद्धीमध्ये परिणामकारक उपाय देतो. विषमज्वर किंवा टायफाईड हा खराब पाणी व त्यातील जंतूंमुळे उद्भवणारा विकार आहे. अन्नवह महास्रोतसांत हे जंतू पुन:पुन्हा ज्वर उत्पन्न करतात. ताप नॉर्मल येऊ देत नाहीत. त्याकरिता कारल्याच्या पानांचा रस प्यावा. यकृत प्लीहा वाढलेली नसताना अग्नीचे बल कमी पडते. रक्तातील श्वेत कण वाढतात. अशा वेळी कारल्याचा पानांचा रस यकृत व प्लीहेच्या उत्तेजनाचे काम करतो. त्यामुळे नवीन जोमाने रक्त बनू लागते. बालकांचा कफ ही एक समस्या असते. त्यांना ओकारी सहजपणे झाली तर बरे वाटते. त्याकरिता कारल्याच्या पानांचा चमचा दोन चमचे रस उत्तम काम देतो. लहान बालकांचा दमा, यकृत-प्लीहा शोथ, हातापायाच्या काडय़ा या विकारात पानांचा रस फार प्रभावी उपाय आहे. बालकांचे पोट साफ होते. मुले वाढीला लागतात. मधुमेहात तळपायांची आग होते. त्याकरिता कारले पानांचा रस प्यावा. रातांधळे विकारात डोळय़ावर बाहेरून कारल्याच्या पानांचा रस व मिरपूड असा लेप लावावा.
मधुमेहाकरिता कारले रस, पावडर, भाजी यांचा सर्रास प्रचार चालू आहे. इथे थोडय़ा तारतम्याची गरज आहे. ताज्या कारल्याचा रस फार प्रभावी आहे. तरुण बलवान, भरपूर रक्तशर्करा वाढलेल्या मधुमेही रुग्णाला पहिले चार-आठ दिवस कारल्याचा पाव अर्धा कप रसाने बरे वाटते. त्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी रक्तशर्करा तपासावी. ती खूप कमी असेल तर कारले रसाचे प्रमाण कमी करावे. कारल्याचा रस घेऊन ज्यांना गरगरू लागते, त्यांनी रस घेणे लगेच थांबवावे. अर्धा चमचा साखर किंवा खडीसाखरेचा खडा खावा. वृद्ध रुग्णांनी, आठ वर्षांच्या वरच्या मधुमेंहींनी कारल्याच्या फळीचे सावलीत वाळवून केलेल्या चूर्णाचा वापर करावा. त्याचे प्रमाण कमी-जास्त करता येते. लघवीला वास येणे जोपर्यंत आहे, लघवी गढूळ आहे तोपर्यंत कारले चूर्ण नियमित घ्यावे. लघवीचा वर्ण निवळला की प्रमाण कमी करावे.
रक्तातील साखरेचे नियंत्रण झाल्यावर कारल्याचे लोणचे, कमी गूळ घालून केलेले पंचामृत, कारल्याचा कडूपणा कमी करून तयार केलेली भजी असा वापर चालू ठेवावा. पित्तविकार, सांधेदुखी, मधुमेहात वजन घटणे या तक्रारी असणाऱ्यांनी कारले खाऊ नये. पंजाबी ढंगाची भरपूर तेल, डालडा असलेली भाजी काहीच गुण देणार नाही.
कोबी
कृश व्यक्ती, दमछाक झालेले रुग्ण, थोडय़ाशा श्रमाने फाफू होणारे, थकवा, गळाठा, खूप घाम येऊन विश्रांती घ्यावीशी वाटणाऱ्यांकरिता कोबीचा रस किंवा कच्च्या कोबीची कोशिंबीर फार उपयुक्त आहे. कोबी तुलनेने स्वस्त भाजी आहे. मजूर माणसांकरिता कोबी हे उत्तम टॉनिक आहे. तोंड कोरडे पडणे, चेहऱ्यावर टापसा, चिडचिडेपणा, राग येणे, भय, निराशाग्रस्त, रसक्षय झालेल्या रुग्णाकरिता कोबी हे सोपे औषध आहे. छातीत धडधड होणे, उगाचच उमासे येणे, तोंड येणे या तक्रारीत कोबी भाजी नियमित खावी. कोबीमध्ये कीड नाही याची मात्र काळजी घ्यावी लागते. कारण कोबी प्रत्येक पान वेगळे करून चिरला जात नाही. कोबीला भोक पाडून कीड खोलवर गेलेली असू शकते. मूतखडा विकार किंवा लघवी कमी होण्याची तक्रार असणाऱ्यांनी कोबी खाऊ नये.
कोहळा
कुष्मांड या नावाने कोहळा आयुर्वेदात ओळखला जातो. पांढऱ्या जाड सालीचा, भरपूर बिया असलेला व जून कोहळा अधिक चांगला असे शास्त्रवचन आहे. कोवळा कोहळा भाजी म्हणून चांगला असला तरी आयुर्वेदशास्त्राप्रमाणे तो हितकारक नाही. उलट विषसमान आहे. शरीरातील आद्यधातू रसधातू होय. धातूच्या कमतरतेमुळे शरीरात रुक्षता येते. श्रम सहन होत नाही. शरीर शुष्क होते. ग्लानी येते. रसधातूच्या क्षीणतेमुळे जरासा कमी-जास्त शब्द सहन होत नाही. माणसाला चटकन राग येतो. बारीकसारीक गोष्टीत दोष दिसतात. नको तेथे माणूस चिडचिड करतो. अशा रसक्षय विकारात कोहळय़ाचा रस विलक्षण गुण देतो. ताज्या कोहळय़ाचा रस, त्याबरोबर गरजेप्रमाणे मध किंवा साखर मिसळून घ्यावा. किंवा कोहळय़ाच्या वडय़ा, कोहळेपाक घ्यावा. विशेषत: डिहायड्रेशन किंवा जुलाब, कॉलरा या विकारातील बलक्षयावर कोहळा फारच प्रभावी उपाय आहे.
भाजल्यामुळे शरीराला अपाय झाल्यास, त्वचा लवकर सुधारावी म्हणून कोहळा रस पोटात घ्यावा, चोथा त्वचेवर थापावा. त्वचेचा नैसर्गिक रंग परत येतो. कृश बालके, बल गमावलेले वृद्ध, नेत्रक्षीणतेचे रुग्ण, अनिद्रा, पांडुता या विकारात कोहळय़ाचा रस किंवा भाजी अतिशय उपयुक्त आहे. कष्टाने किंवा कमी प्रमाणात लघवी होत असल्याने कोहळा रस नियमाने घ्यावा. लघवी मोकळी सुटते.
कांदा
कांदा श्रीमंतांपासून गोरगरिबांकरिता रोजच्या जेवणातील आवश्यक पदार्थ आहे. काही धार्मिक कारणांकरिता काही जण कांदा खात नाहीत. पण ज्यांना औषधाशिवाय ताकदीकरिता उपाय हवा, त्यांना कांद्याचा आश्रय करावयास हवा. गोरगरिबांकरिता विशेषत: मोलमजुरी, श्रमाची कामे, हमाली, खाणीतील, समुद्रातील किंवा शेतीकाम करणाऱ्यांना इतके स्वस्त दुसरे टॉनिक मिळणार नाही.
कांदा वजन वाढवावयास मदत करतो. तो थंड का उष्ण हा वादाचा भाग आहे. तरीपण कफ व पित्त दोन्ही प्रकारच्या विकारांत तो सारखाच उपयुक्त आहे. कांदा उष्ण, तीक्ष्ण, कफवर्धक, पित्तवर्धक असला तरी बलवर्धक नक्कीच आहे. कांद्यामुळे रुची येते. तो शुक्र धातूचे पोषण करतो, वीर्य वाढवते. स्त्री-पुरुषांनी गमावलेली ताकद भरून आणण्याकरिता कांद्याची मदत फार मोलाची आहे. कांदा फाजील प्रमाणात घेतला तर पोटात वायू धरण्याची खोड उत्पन्न होते. कांद्याचे अजीर्ण बरे करणे अवघड आहे. त्याकरिता धर्मशास्त्राने पावसाळ्यात कांदा चार महिने खाऊ नये असे सांगितले असावे. पावसाळ्यात अग्निमंद असतो. आधुनिक मताप्रमाणे कांद्यात तिखट चवीचे, उग्र गंध असलेले तेल व गंधक असते. नवीन मताप्रमाणे कांदा उत्तेजक, मूत्रजनक उष्ण व कफघ्न आहे. कांदा खायला लागल्यापासून कफ मोकळा होऊन सुटतो. नवीन कफ होणे बंद होते. तसेच आतडय़ाची ताकद सुधारून शौचास साफ होते. याकरिता अंग बाहेर येणे, कफप्रधान मूळव्याध व काविळीमध्ये कांदा वापरावा असे एक मत आहे.
आम्हा वैद्य लोकांच्या अनुभवात मात्र कांदा अजीर्णाचे कारण आहे. ज्यांचा अग्नी अगोदरच मंद झालेला आहे त्यांनी कांदा खाल्ला की अजीर्णाचे रूपांतर मलावरोध, उदरवात, पोटफुगी, पोटदुखी, जुलाब, मूळव्याध, आम्लपित्त, गुदभ्रंश अशा नाना विकारांत होते. कांदा खायचा असला तर पेण, अलिबाग येथील माळेचा कांदा खावा. तो बाधत नाही. सांबार करण्याकरिता खूप छोटय़ा आकाराच्या लाल कांद्याचा वापर करावा. तो दक्षिण भारतातून येतो. चवीने गोड असतो.
नेत्रक्षीणता किंवा डोळ्यांचे विकार झालेल्या रुग्णांनी कांदा जरूर खावा. विशेषत: पांढरा कांदा नियमित खावा. डोळ्यांची भगभग थांबते. डोळ्यांत तेज येते, डोळे आले असताना कांद्याचा रस व मध असे मिश्रण डोळ्यात काही थेंब टाकावे. थोडे झोंबते, पण नंतर बरे वाटते. तीव्रवेगी तापाकरिता हातापायाला, कानशिलाला कांदा वाटून चोळण्याचा प्रघात आहेच. बाह्येपचार म्हणून तीव्र उन्हाळ्यात कांदा वाटून चोळण्याचा प्रघात आहेच. बाह्येपचार म्हणून तीव्र उन्हाळ्यात कांदा फार उपयुक्त आहे. फार पूर्वी दुपारी कडक उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून टोपीत कांदा बाहेर पडायचा प्रघात होता. ऐन उन्हाळय़ात आलेल्या पांथस्थाला गूळ-पाणी देण्याचा जरा प्रघात आहे, तसा प्रघात म्हणून तळपायाला कांद्याचा रस चोळला तर उष्माघात होणार नाही. तापाचे प्रमाण वाढल्यास, डोक्यात ताप जाऊ नये म्हणून कांद्याचा रस तळहात, तळपाय, डोळे यांना चोळावा. तापाचे प्रमाण कमी होते. कांदा टोचावा व तो मधात बुडवून ठेवून सात दिवसांनी खावा. शुक्रधातू मजबूत होतो. त्याकरिता रोज एक कांदा थोडय़ा मधात, आठवडय़ाने खाण्याकरिता तयार करावा. घुसमटणाऱ्या कफविकारात विशेषत: लहान बालके व वृद्ध यांना कांदा किसून त्याचा रस द्यावा. कफ मोकळा होतो. अंगातील कडकी दूर होण्याकरिता कांदा उपयुक्त आहे. कॉलरा, पटकी या विकारांत एकदोन उलटी जुलाब झाल्याबरोबर कांद्याचा रस द्यावा. बहुधा उतार पडतो. कृश व्यक्तींना झोप येण्याकरिता रात्रौ कांदा खाणे हा उत्तम उपाय आहे. ज्यांना फिट्चे झटके नेहमी येतात त्यांनी रोज सकाळी नाकात कांद्याचा रस दोन थेंब टाकावा. फिट्स येत नाहीत.
काकडी
काकडीचे देशपरत्वे खूप प्रकार आहेत. सर्वात चांगली काकडी म्हणजे मावळी काकडी होय. त्याच्या खालोखाल नेहमीच्या मिळणाऱ्या काकडय़ा व तीन क्रमांकाच्या काकडय़ा म्हणजे तवसे म्हणून लांबलचक मोठय़ा काकडय़ांचा प्रकार होय. मावळी काकडी गोड आहे. त्याच्या अधिक सेवनाने कफ, सर्दी, खोकला सहसा येत नाही. विशेषत: कोणत्याही आजारपणानंतर ‘लघुआहार’ सुरू करताना ही काकडी (सिझन असल्यास) जरूर खावी. त्या काकडीमुळे आतडय़ांचा क्षोभ कमी होतो. कमीअधिक औषधांनी जेव्हा आतडय़ांना दाह होतो, मुलायमपणा कमी होतो तेव्हा काकडी आपल्या स्निग्ध गुणाने आतडय़ांचे रोपण किंवा संधानकार्य करतात.
काकडी ही मूत्रल आहे. पण त्याच्या बारक्या बिया या मूतखडय़ाचा पाया होऊ शकतात. म्हणून कॅल्शिअम ऑक्झलेट या काटा असणाऱ्या मूतखडय़ात काकडी निषिद्ध-कुपथ्यकारक आहे. कमी बियांची किंवा काकडी किसून पिळून त्याचा रस मूत्रल म्हणून घ्यावयास काहीच हरकत नाही. गरमी, परमा, हातापायांची जळजळ, तीक्ष्णोष्ण खाण्यापिण्याने, दारू, तंबाखू, धुम्रपान सेवनाने जेव्हा शरीरात उष्णता वाढते तेव्हा एकवेळ काकडीच्या रसावर राहावे. काकडी शुक्रवर्धक आहे.
एड्स या महाभयंकर विकाराच्या जागतिक लढाईत तवशासारख्या काकडीचा, त्याच्या मुळांचा उपयोग जगातील अनेक शास्त्रज्ञ प्रयोग म्हणून करू पाहत आहेत. आपण किमान रोजच्या आहारात पित्तशामक म्हणून जरूर वापरावी.
गाजर
‘गाजराची पुंगी’ हा वाक्प्रचार लक्षात न घेता सर्वसामान्य माणसाने ताकदीकरिता आठवडय़ातून एक वेळा तरी गाजर जरूर खावे. गाजर हे घोडय़ांकरिता मोठे अन्न आहे हे आपणा सर्वाना माहीत नाही. गाजर कितीही महाग असले तरी किंमतवान घोडय़ाच्या आहारात ते आवश्यक आहे. गाजर रुचीवर्धक व पाचक आहे. दिल्ली गाजर व गावरान गाजर अशा दोन जाती येतात. गावरान गाजर गुणांनी श्रेष्ठ आहे. गाजर रस, कच्चे, शिजवून किंवा किसून तयार केलेली खीर किंवा गाजरहलवा अशा नाना प्रकारे गाजराचा वापर करता येतो. गाजराचा रस पिऊन रक्त वाढते. हाडे मजबूत होतात. गाजराची भाजी खाऊन दात बळकट होतात. हिरडय़ा मजबूत होतात. शरीराला स्थैर्य, टिकाऊपणा, काटकपणा गाजर सेवनाने येतो.
गोवार
पथ्यकर पालेभाज्यांत विशेषत: कफप्रधान विकारात गोवारीच्या शेंगांना वरचे स्थान आहे. गोवार रूक्ष, वातवर्धक आहे. सर व दीपन गुणांमुळे मलावरोध, मधुमेह, रातांधळेपणा विकारात गोवारीचे महत्त्व सांगितले आहे. रोग निवारण्याकरिता गोवारीची भाजी तुपावर परतून सैंधव मिसळून खावी. गोवारीची भाजी फार तेलकट बनवू नये. औषधी गुण जातात. मेदस्वी माणसाने गोवारीच्या शेंगा नुसत्या वाफारून खाव्यात. जून गोवार खाऊ नये. गोवारीची कडू जात म्हणजे बावची होय.
श्रावणघेवडा
श्रावणघेवडा ही थंड गुणाची, वातवर्धक व पित्तशामक भाजी आहे. मलमूत्र साफ होत नसले तर ताज्या व कोवळ्या घेवडय़ाची एक वेळ भरपूर भाजी खावी. एक टाइम पोट साफ होते. लघवी सुटते.
घोसाळी
घोसाळी भज्यांकरिता प्रसिद्ध आहेत. याशिवाय घोसाळय़ाची कडू चवीची जात जास्त उपयुक्त असते. घोसाळय़ाची भाजी खाऊन लघवी साफ होते. छातीत खूप कफ झाल्यास उलटी करवण्याकरिता घोसाळय़ांचा रस प्यावा. त्रास न होता उलटी होते. जीर्ण, जुनाट, चिघळलेल्या जखमा असणाऱ्या रुग्णांनी घोसाळय़ाची भाजी खावी. जखमा लवकर भरून येतात. यकृत किंवा प्लीहा हे अवयव वाढल्यामुळे पोट मोठे झाल्यास घोसाळय़ाची शिजवून बिनतेला-तुपाची भाजी किंवा नुसता रस प्यावा. पोटाची सूज कमी होते.
वजन कमी करण्याकरिता घोसाळी उकडून त्याचे तुकडे मोठय़ा प्रमाणावर खावेत. पोट फुगणे, खडा होणे, स्वप्नदोष, लघवी अडखळत किंवा तिडीक मारून होणे, उष्णतेच्या कामामुळे थकवा येणे या तक्रारीत घोसाळी ही पथ्यकर पालेभाजी आहे.
टिंडा
ही एक पथ्यकार भाजी आहे. टिंडे कोवळे असतील, जून बिया त्यात याची काळजी घ्यावयास हवी. टिंडय़ाची भाजी घेवडय़ाप्रमाणेच पित्तशामक, शीत गुणाची, रुची उत्पन्न करणारी आहे. आजारी माणसांनी टिंडा भाजी अवश्य खावी. टिंडा भाजीसोबतची पोळी अंगी लागते. आहार वाढवते. क्षुद्बोध उत्पन्न होतो.
टोमॅटो
टोमॅटोला फार पूर्वी कोणी बेलवांगे म्हणत. का? त्याचा कार्यकारणभाव लागत नाही, पण शरीराच्या सार्वत्रिक वाढीकरिता वांग्यासारखाच टोमॅटोचा उपयोग होतो, याबद्दल दुमत नाही. टोमॅटोमुळे रुची उत्पन्न होते. अग्निवर्धन होते. शरीर सुकले असताना टोमॅटोचा रस हा एक सहारा आहे. ज्यांना कोणत्याच पदार्थावर वासना नाही, पांडुता आहे, त्यांना टोमॅटोचा रस उत्तम काम देतो. रक्त बिघडणे, दातातून रक्त येणे, हिरडय़ा झिजणे, रक्त येणे या तक्रारीत टोमॅटो द्यावा. सोबत आल्याचा तुकडा द्यावा.
मांसाहार करणाऱ्यांकरिता टोमॅटो फार उपयुक्त आहे, नव्हे आवश्यक आहे. मांसाहारामुळे होणारी जळजळ, लागणारी खूप तहान, पोट जड होणे याकरिता जोडीला टोमॅटो ‘माफक’ प्रमाणात हवा. सुका खोकला, मेदस्वी शरीर याकरिता रसधातू वाढविण्याकरिता टोमॅटो खावा. गर्भवती स्त्रीने १००/२०० ग्रॅम टोमॅटो नियमित खावा. गर्भाचे उत्तम पोषण होते. मानसिक श्रम, अशांत झोप असणाऱ्यांनी टोमॅटो नियमितपणे खावा. पोटात वायू धरण्याची खोड ज्यांना आहे, मूतखडा असणाऱ्यांनी टोमॅटो वज्र्य करावा. टोमॅटोसोबत हिंगपूड व मीठ वापरावे. टोमॅटो बाधत नाही. आंबट टोमॅटो वज्र्य करावा.
आपल्या आहारातल्या फळभाज्या, शेंगभाज्या हे नुसते तोंडी लावणे नसते. या भाज्या आपल्या पोषणासाठी महत्त्वपूर्ण हात भार लावतातच शिवाय त्या बहुगुणी आहेत. विविध विकारांमध्ये त्या गुण देणाऱ्या आहेत.
तोंडली या वेलाची फळे, पाने व मूळ औषधी उपयोगाची आहेत. तोंडल्याच्या मुळांचा रस सैंधव चूर्ण मिसळून घ्यावा. मधुमेहावर उपयुक्त आहे. मधुमेही रोग्यांकरिता भाजी उपयुक्त आहे. पोटभर खावी. गरोदर स्त्रियांना क्वचित अंगावरून जात असल्यास लगेच तोंडल्याची भाजी खावी. जिभेला कात्रे पडले असल्यास पानांचा रस जिभेला लावावा. पानांचा रस व्रणरोपणाचे काम करतो. पाने वाटून जखमेवर बांधावीत. पोटात रस घ्यावा. बाळंतिणीला भरपूर दूध येण्याकरिता तोंडल्याची भाजी उपयोगी पडते. पातळ जुलाब होत असल्यास, तोंडाला चव नसल्यास तोंडल्याची उकडून भाजी खावी. सोबत सुंठपाणी घ्यावे. काविळीत तोंडल्याची भाजी पथ्यकर आहे. मधुमेहात पायांची आग होते. ती थांबवण्याकरिता तोंडल्याची भाजी खावी. मार, मुरगळा, सूज याकरिता तोंडल्याचे वाटून शिजवून पोटीस करून बांधणे. तोंडली खाल्ली तर बुद्धी कमी होते हा समज चुकीचा आहे. स्त्रियांच्या धुपणी या विकारात तोंडल्याच्या मुळांचा काढा घ्यावा. जननेंद्रियांच्या विकारात व्रणरोपण, रक्तसंग्रहणाच्या कार्यात तोंडल्याची भाजी उपयुक्त आहे.

More Stories onऔषधेMedicine
मराठीतील सर्व औषधाविना उपचार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health care
First published on: 03-04-2015 at 01:22 IST