01khadiwaleचटण्या-कोशिंबिरी यांचा वापर आपण तोंडीलावणे म्हणून करत असलो तरी त्यांचा उपयोग फक्त चवीसाठी नाही तर त्यातले अनेक घटक विविध विकारांमध्ये गुणकारी आहेत. म्हणून रोजच्या आहारात चटण्या-कोशिंबिरी हव्यातच.

कढिलिंब
कढिलिंब थंड गुणाचा, विषनाशक व शरीराचा दाह कमी करणारा आहे. पालक, मेथी या भाज्यांपेक्षा कढिलिंबात रक्तवर्धक व वजन वाढविण्याकरिता अधिक गुण आहेत. काबरेहायड्रेट व प्रोटीन कढिलिंबात भरपूर आहेत. जखम सडू नये, लवकर भरून यावी म्हणून कढिलिंब मधुमेही माणसाने अवश्य वापरावा. त्याची चटणी खावी किंवा रस प्यावा. कढिलिंबाच्या पानांच्या लेपाने विषारी किडय़ाची किंवा नागिणीची सूज कमी होते.
वर वर्णन केलेले कढिलिंबाचे गुणधर्म आता मंडई किंवा भाजीबाजारात मिळणाऱ्या, तथाकथित कढिलिंबाच्या पानात आहेत का याबद्दल माझ्या मनात दाट शंका आहे. आमच्या दाराशी उत्तम स्ट्राँग वास असणाऱ्या कढिलिंबाच्या फांद्यांना, मंडईतील एक ठेकेदार आठवणीने न्यायचा. ती पाने वर्णाने काळसर व आमटी, भाजीच्या चवीला काही विशेष रंगत आणत असत. आत्ता मिळणारी कढिलिंबाची पाने स्वयंपाकात अजिबात वापरू नयेत असे माझे प्रामाणिक मत आहे. त्या पानांना ना वास, ना औषधी गुण!
कोकम
आंबट पदार्थात कोकम हे आवळ्यासारखेच अपवादात्मक फळ आहे. चिंचेपेक्षा सौम्य पाचक असून तुलनेने अधिक स्निग्ध आहे. चिंचेचा रस जास्त उष्ण आहे. त्याच्या अति वापराने तो आतडय़ांचा क्षोभ करतो. शरीरातील नाजूक आतडय़ांना चिंचेच्या अधिक वापराने इजा पोहचू शकते. त्यामुळे अल्सर, व्रण, आम्लपित्त, मूळव्याध या विकारांत रोजच्या जेवणात आंबट पदार्थ खाणे मुश्कील होते. अशा वेळेस अमसूल निधरेकपणे वापरावे. शीतपित्त किंवा गांधी या विकारात कोकमचे सरबत घेऊन तोच चोथा अंगाला बाहेरून लावण्याचा प्रघात आहे. कृश व्यक्तीने नियमित कोकमसाखर सरबत घेतले तर वजन वाढते.
कोकम फळांच्या आतील बियांचा गर आव, आमांश, रक्ती आव, लहान मुलांचे जुलाब, दात येत असताना होणाऱ्या विकारांवर उत्तम व तत्काळ गुण देणारे औषध आहे. जळवात, हातापायांची साले सुटणे, थंडीत गाल, ओठ, पाय कुटणे यावर याच बियांच्या गरापासून तयार केलेले ‘कोकम तेल’ वापरावे. उत्तम नितळ चेहरा ज्यांना हवा त्यांच्याकरिता कोकम तेलासारखे सुरक्षित औषध नाही. एक काळ कोकम तेलाबरोबर अत्यल्प प्रमाणात चंदन तेल मिसळून मी शीतल मलम बनवत असे. चंदनतेल खूप महाग झाल्याने ते औषधीकरण थांबवले. हे मलम तारुण्यपीटिका, जळवातग्रस्त रुग्णांना वरदानच होते.
कोथिंबीर
कोथिंबीर भाजी का तोंडी लावणे हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवू या. कोथिंबिरीचा जास्त करून वापर खाद्य पदार्थाची चव वाढवायला म्हणून प्रामुख्याने केला जातो. चटणी, कोशिंबीर, खिचडी, पुलाव, भात, विविध भाज्या, आमटी, सूप या सर्वाकरिता कोथिंबीर हवीच. बहुधा सर्व घरी, सदासर्वदा, सकाळ-सायंकाळी पोळी, भाकरी, भात सोडून सगळ्या पदार्थात कोथिंबीर वापरली जातेच. कोथिंबीर ताजीच हवी. तरच त्याचा स्वाद पदार्थाची खुमारी वाढवतो. भाजीबाजारात काही वेळा कोथिंबीर खूप स्वस्त तर उन्हाळ्यात सर्वसामान्य माणसाच्या आटोक्याच्या बाहेर असते. कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रुची टिकवणारी आहे. जेवणात अधिक तिखट जळजळीत पदार्थ खाणाऱ्यांना उष्णता, पित्त यांचा त्रास होऊ नये याची काळजी कोथिंबीर घेते. जेव्हा विविध स्ट्राँग औषधांची रिअ‍ॅक्शन येते, अंगावर पित्त, खाज किंवा गळवांचा त्रास होतो त्या वेळेस कोथिंबीर स्वच्छ धुऊन वाटावी. त्याचा रस पोटात घ्यावा. चोथा त्वचेला बाहेरून लावावा. बिब्बा, गंधकयुक्त औषधे, स्ट्राँग गुग्गुळ कल्प यांच्या वापरामुळे काही उपद्रव उद्भवल्यास कोथिंबिरीचा सहारा घ्यावा. रक्तशुद्धी, रक्तातील उष्णता कमी करणे, तापातील शोष हा उपद्रव कमी करायला ताज्या कोथिंबिरीच्या रसाचा वापर करावा. कोथिंबिरीची भाजी ही पथ्यकर भाज्यांत अग्रस्थानी आहे.
चिंच
चिंच ही पाचक गुणाचे आरोग्य टिकविण्याकरिता खूप चांगले कार्य करू शकते. चिंच सर्वत्र सहज मिळते. तोंडाला चव आणणे, कमीजास्त खाल्ले तरी त्याचे पचन करणे, पोटात गुबारा धरून राहिलेला वायू मोकळा करणे, जेवणानंतर होणारी लगेचची मलवृत्ती थांबवणे, पाण्यासारख्या होणाऱ्या पातळ जुलाबांना आळा घालणे, कॉलरा, हगवण, अग्निमांद्य, विषुचिकासारख्या पोटांत कळा मारून होणाऱ्या विकारांत चिंच अतिशय उत्तम व तात्काळ काम देते. चिंचेचा कोळ करून त्यात मीठ मिसळून सरबत घेतल्याबरोबर उतार पडतो.
चिंचेच्या झाडाच्या सालीचे चूर्ण पोटदुखीवर उत्तम उपाय आहे. अंगावर पित्त उठल्यास चिंचेच्या पाल्याचा रस पोटात घ्यावा. उठलेल्या गांधीवर चोथा घासून लावावा. खाज, आग लगेच थांबते. बिब्बा, जमालगोटा किंवा सल्फा ड्रग अशा तीव्र औषधांनी अंगावर रॅश उठल्यास चिंचेच्या पाल्याचा बाह्योपचार व पोटात घेण्याकरिता उपयोग होतो. चिंचेचे पाणी कणभर मीठ, गोडेतेल यांच्या एकत्र मिश्रणाने ‘चिंचालवण तेल’ नावाचे एक अप्रतिम औषध, शौचाला होणे, तीव्र मलावरोध, उदरवात याकरिता घरच्याघरीसुद्धा करता येते.
कुपथ्य : कोड, शिबे, इसब, गजकर्ण, खरूज, नायटा, अम्लपित्त, सोरायसिस, सर्दी, पडसे, खोकला, दमा, हातापायांची व डोळ्यांची आग, कंड, केस गळणे, केस पिकणे, कोड, कृशता, गरमी, परमा, गोवर, कांजिण्या, घाम खूप येणे, जखमा, डोळ्यांचे विकार, तोंड येणे, नागीण, मूळव्याध, भगंदर, अल्सर, रक्ताचे विकार, सूज, महारोग या विकारांत आहारांत चिंच कटाक्षाने वज्र्य करावी. चिंचेच्या अम्लाच्या अति वापराने आतडय़ांना इजा पोहोचते.
जवस (आळशी)
जवस किंवा आळशी या नावाने ओळखले जाणारे कडधान्य आपणास फक्त पोटिसाला उपयुक्त एवढेच माहीत आहे. संस्कृतमध्ये उमा या नावाने जवसाचे वर्णन, उष्ण व त्वचारोग तसे कफपित्ताचे रोग वाढविणार असे केले आहे. आळशी किंवा जवसाच्या पाठीचे किंवा बिया पाण्यात वाटून पळीत गरम करून त्याचे पोटीस मार, मुरगळा, संधिवाताची किंवा आमवाताची सूज, वेदना असलेल्या फोडावर लावावे. फोड असले तर ते पिकून फुटतात. नुसती सूज किंवा ठणका असेल तर तात्पुरता ठणका थांबून सूज ओसरते.
लघवीच्या तक्रारीत जवसाचा लहान प्रमाणात घेतलेला काढा, लघवी साफ करून किडणीची सूज कमी करावयास मदत करतो. जवसाचा काढा मोठय़ा प्रमाणावर घेतल्यास त्यापासून जुलाब होतात. लघवीच्या इंद्रियाची आग होत असल्यास जवसाचा काढा प्यावा. खडतर खोकल्यामध्ये, विशेषत: वृद्धाच्या खोकल्यात, कफ मोठय़ा मुश्किलीने सुटतो. अनेक औषधे काम करत नाहीत. अशा वेळी पंचवीस-तीस ग्रॅम जवसाचा चार कप पाण्यांत काढा करून आटवून एक कप एकदा प्यावा. कफ पातळ होऊन खोकल्यास उतार पडतो.
त्वचा विकारात, विशेषत: महारोग्यासारख्या पू असणाऱ्या, फोड, सूज असणाऱ्या विकारांत जवसाच्या बिया वाटून त्यांचा लेप बाहेरून लावावा. जवसाच्या बियांचा पाक पौष्टिक आहे.
जवसाचे तेल मसाजाकरिता उपयुक्त आहे. तेल गरम करून किंचित मीठ मिसळून मसाजाकरिता वातविकारात वापरावे. याच तेलाची पिचकारी अर्धागवात, संधिवात, पाठदुखी, कंबरदुखी या तक्रारींकरिता उपयुक्त आहे. लघवीच्या इंद्रियांची सूज पू, फोड या ठिकाणी जवसाच्या तेलाची पट्टी वारंवार ठेवावी. पू कमी होतो. सूज कमी होऊन ठणका थांबतो. वारंवार लघवी होत असल्यास सकाळी व सायंकाळी जवसाचे तेल दोन चमचे प्यावे.

पुदिना
पुदिना वात व कफ विकारात फार उपयुक्त आहे. सर्दी, पडसे, खोकला, कफ, दमा, फुप्फुसाचे विकार, टीबी, तीव्र श्वास लागणे या विकारांत नियमितपणे पुदिना चटणी खावी. जोडीला आले, लसूण किंवा ओली हळद वापरावी वा नुसता पुदिना रस प्यावा. छातीतील कफ मोकळा होतो. पुदिना पाचक आहे. पोटात वायू धरत असल्यास कमी होतो. पुदिन्याचे सरबत करावे. त्यात जिरेपूड व गूळ वापरावा.
पुदिना अरुची दूर करतो. उन्हाळय़ात खूप तहान लागते व अन्न नकोसे होते त्याकरिता पुदिना सरबत घ्यावे. उलटय़ा, कॉलरासारखे जुलाब याकरिता पुदिना उपयुक्त आहे. स्त्रियांचे दूध सुधारले की लहान बालकाला जुलाब होत नाहीत. त्याकरिता बाळंतिणींनी पुदिना चटणी अवश्य खावी. पोटदुखी, आतडय़ांचे विकार, कृमी या विकारांत नियमितपणे पुदिना रस घ्यावा. गोवर, कांजिण्या व नियमित येणाऱ्या तापात पुदिना अवश्य वापरावा. ताजा पुदिना न मिळाल्यास पुदिन्याची वाळवून सुकलेली पाने वापरावी. औषधी बाजारात पुदिना अर्क किंवा मेन्थॉल क्रिस्टल या नावाने केमिकल मिळतात. या केमिकलला पुदिन्यासारखा वास येतो. एवढाच त्याचा पुदिन्याशी संबंध जोडता येईल.
लसूण
लसूण ही पाच रस असलेली मधुर, लवण, तिखट, कडू व तुरट अशी समजली जाते. पण आपल्या वापरात असलेल्या लसणीत फक्त तिखट रसच आहे. इतर रस त्याच्या डेखात, काडीत व वरच्या टरफलात असतात. लसणीमध्ये एक विशेष तेल आहे. चटकन उडून जाणाऱ्या या तेलात नाना विकारांचा विशेषत: कफ व वातप्रधान विकारांचा सामना करण्याचे सामथ्र्य आहे.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे लसूण उष्ण, तीक्ष्ण, स्निग्ध, गुरू, बुळबुळीत, सर, बल्य व वृष्य गुणांची आहे. आधुनिक शास्त्राप्रमाणे लसूण उत्तेजक, कुजणे क्रिया थांबवणारी, कफघ्न, मूत्रल, कृमिघ्न आहे. आधुनिक शास्त्रज्ञ हृद्रोग, फुप्फुस व मूत्रपिंडाच्या काही विकारांत लसणीची फार प्रशस्ती करतात. लसणीतील तेल फुप्फुस, मूत्रपिंड व त्वचेत काम करते. श्वसननलिकांतील कफ शिथिल करणे व कफाची दरुगधी कमी करणे ही कामे लसूण करते. सायटिका, पाठदुखी, तोंड वाकडे होणे, अर्धागवात, संधिवात, मांडय़ांचे जखडणे या विकारांत लसूण उपयुक्त आहे. आधुनिक शास्त्राप्रमाणे लसूणसिद्ध दूध व लसणीचा वाटून लेप वातविकारावर उत्तम उपाय आहे. मात्र पित्तप्रकृतीच्या रोग्यांना वगळून इतरांकरिता लसूण चांगली हे सतत लक्षात हवे. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना लसूण द्यायची तर अळणी जेवण सांगावे.
आयुर्वेद ग्रंथाप्रमाणे लसूण वातानुलोमन व कफनाशकाचे काम करते. लसूण योग्य तऱ्हेने वापरली तर शरीर पुष्ट होते. वजन वाढते, शुक्रधातू, अस्थी व रक्तवर्धक अशी लसणीची विशेष कार्ये आहेत. लसूण बुद्धी व धारणशक्ती वाढवते. डोळे, स्वर व वर्ण विकारांत उपयुक्त आहे. हृद्रोग, जुनाट ताप, पोटदुखी, पोटफुगी, वायुगोळा, अजीर्ण, जांघाडय़ातील दुखावा, हर्निया प्रोस्टेट ग्रंथी, मोडलेली हाडे, अरुची, खोकला, कफ, शोषविकार, क्षय, कफप्रधान मूळव्याध, कफप्रधान त्वचाविकार, कृमी, जंत, समस्त वातविकार इत्यादींकरिता लसूण फारच उपयुक्त आहे.
लसूण कच्ची, त्याचा रस, वाळवून केलेले चूर्ण, ताकात भिजवून व तुपावर परतून अशा विविध प्रकारे लसूण उपयुक्त आहे. लसूण वापरताना तोंड येणे, डोळय़ांची, शौचास व लघवीची आग होत नाही याची काळजी घ्यावी लागते. त्याकरिता तारतम्याने दूध, तूप, ताक, लिंबू, मध यांचा अनुपान म्हणून वापर करावा.
अजीर्ण, अपचन, पोटात वायू धरणे, हर्निया, प्रोस्टेट, भूक नसणे, कफप्रधान मूळव्याध या विकारांत ताकात कुस्करून लसूण खावी. ज्यांना वजन वाढवायचे आहे किंवा मोडलेली हाडे जुळून यावयास हवी त्यांनी लसूण तूप किंवा दुधाबरोबर घ्यावी. क्षय किंवा शोष विकारांत लसूणसिद्ध दूध उत्तम टॉनिक आहे. सायटिका, खांदा जखडणे, गुडघेदुखी या विकारांत लसणीचा वाटून लेप उत्तम काम देतो. मात्र पुरळ येणार नाही याची काळजी घ्यावी.
lp24ज्यांना दीर्घायुषी व्हायचे आहे त्यांनी रोज दोन-तीन पाकळय़ा नियमित खाव्या. त्यांचे सातही धातू उत्तम
तऱ्हेने पोसले जातील. विशेषत: म्हातारपण लांब राहील, दृष्टी सुधारेल, त्वचेवर सुरकुत्या येणार नाहीत. केस गळणार नाहीत, स्मरणशक्ती सुधारेल. आवाज स्पष्ट राहील. याकरिता लसूण थंड ऋतूत, पावसाळा व हिवाळय़ात जरूर खावी, लसणीच्या जोडीला तूप, मध, आले रस घेतल्यास वजन निश्चित वाढते.
आयुर्वेदीय औषधात लसणीचा प्रामुख्याने वापर लसणादी वटी व पाराशुद्धीकरिता केला जातो. बाजारात व्यापारी लोकांनी उगाचच एककांडी लसूण- काश्मीरमध्ये होणाऱ्या लसणीचे बंड माजवून ठेवले आहे. ती प्रचंड महाग असते. गुणाने आपल्याकडे मिळणारी लसूण किती तरी श्रेष्ठ असते.
लिंबू
प्राचीन काळापासून लिंबाच्या अनेक प्रकारांचा वापर, त्यांच्या उपलब्धतेनुसार चालू आहे. आताचे कागदी लिंबू हे सर्वश्रेष्ठ पाचक व वातानुलोमक आहे. तोंडाला रुची नसली तर किंचित लिंबूरसाने लगेच चव येते. कणभर मीठ, लिंबू व जोडीला आले तुकडा यामुळे जुलाब, अरुची, अग्निमांद्य या विकारांतील ‘अन्न नकोसे वाटणे’ या तक्रारीवर आराम पडतो. लिंबाच्या पाचक रसामुळे पिष्टमय पदार्थ उदा. बटाटा, भात, हरभरा, डालडातील मिठाई, जड मांसाहार यांचा आमाशयाला भार होत नाही. पोट डब्ब होऊन राहत नाही. लिंबूरस नियमित घेतल्याने आहार वाढतो. अग्निमांद्य, अजीर्ण, आव, वातामुळे पोटदुखी, पोटफुगी, वायगोळा या विकारांत लिंबूरस, आलेरस व किंचित मीठसाखर असे मिश्रण गरम करून जेवणाअगोदर घ्यावे. कोणत्याही जुलाबात लिंबूसाखर, मीठ यांचे सरबत ‘जगमान्य’ आहे. इलेक्ट्रॉल पावडरीपेक्षा लिंबू हजारपट चांगले. डोकेदुखी विकारांत साखरेचे प्रमाण वाढवून लिंबाचे सरबत घ्यावे. वात व
कफप्रधान आम्लपित्तात लिंबूरस उपयोगाचा आहे. केसांतील खवडे, नायटा, कोंडा या विकारांत लिंबूरस किंवा त्याच्या सालीचे चूर्ण केस धुण्याकरिता उपयुक्त आहे. आसाम व पूर्वाचल राज्यांमध्ये आपल्याकडील कागदी लिंबापेक्षा काही वेगळय़ाच जातीची लिंबे मिळतात. ती झाडे तिकडील जंगलात निसर्गत: उगवत असतात, वाढत असतात.
कुपथ्य : बहुतेक सर्व त्वचाविकार, हातापायाची व डोळय़ांची आग होणे, कंडू विकार, सोरायसिस, मूळव्याध, भगंदर, मलावरोध, कान वाहणे, गरमी, परमा, तोंडातील उष्णता व फोड, गांधी उठणे, जखमा, ताप, महारोग, हाडांचे विकार, संधिवात, गुडघेदुखी, कंबर व पाठदुखी, अतिकृशता या विकारांत लिंबू वज्र्य करावे.
शेंगदाणे
प्रोटिन किंवा प्रथिन असणाऱ्या पदार्थात भुईमुगाचे स्थान फार वरचे आहे. ऑलिव्ह तेलाचे एक काळ फार मोठे स्तोम माजले होते. त्या तुलनेत भुईमूग वातानुलोमन, व्रणरोपण, वर्णप्रसादन व पौष्टिक गुणाचे आहे. दूध, सोयाबिन या पदार्थातही भरपूर प्रोटिन आहेत, पण भुईमूग नीट चावून खाल्ला किंवा भाजून खाल्ला तर अंगी चटकन लागतो. दूध व सोयाबिन तुलनेत शेंगदाणे खाणे परवडण्यासारखे टॉनिक आहे. तुम्ही-आम्ही शेंगदाण्यांना ‘मराठी बदाम’ असे गमतीने संबोधितो.
शेंगदाण्याच्या स्वयंपाकात वापर रुची आणणे याकरिता होतो. सर्व खाद्यतेलांत सर्वाना आवडणारे, परवडणारे असे हे गोडेतेल आहे. मलावरोध, मलावष्टंभ, खडा होणे, पोटात वायू धरणे इत्यादी तक्रारींत खूप चूर्णे, लॅक्सेटिव्ह, सोनामुखी जमालगोटा इत्यादी घेण्यापेक्षा पुढील पद्धतीत गोडेतेल प्यावे. सात ते पंधरा दिवसांत गुण दिसतो. तीन चमचे गोडेतेल, थोडेसे मीठ, थोडी चिंच, कोळून त्याचे पाव कप पाणी असे एकत्र मिश्रण उकळावे. आटवावे. तेल उरल्यावर गाळून सकाळी रिकाम्यापोटी व सायंकाळी पाच वाजता घ्यावे. प्रत्येक वेळी चहासारखे हे तेल ताजे तयार करावे. वायगोळा कमी होतो. खडा मोडतो. भूक चांगली लागते.
शेंगदाण्याचे तेल, किंचित मीठ असे मिश्रण कालवून पायाच्या बोटांतील भेगांमधील चिखल्यांना घासून लावावे. चिखल्या रात्रीत बऱ्या होतात.
शेंगदाणे पित्तकारक आहे. त्वचाविकार, इसब, गजकर्ण, नायटा, सोरायसिस, आम्लपित्त शीतपित्त, पोटदुखी, अल्सर, मूळव्याध, भगंदर, जखमा, कावीळ, जलोदर या विकारांत खाऊ नये. मधुमेह विकारात रक्तातील साखर खूप वाढली असल्यास शेंगदाणे वज्र्य करावे. शेंगदाण्यांच्या देठात खूप खूप पित्त असते. ती देठे काढली असल्यास, शेंगदाणे पित्त वाढवत नाही.
फार पूर्वी अतिशय गोड चवीचे देशी, पांढऱ्या वर्णाचे शेंगदाणे मिळायचे. त्या शेंगांच्या टरफलांना वर सुरकुत्या असावयाच्या. ते शेंगदाणे खाऊन पित्त होत नसे. त्या प्रकारच्या शेंगांचे प्रति एकरी पीक भरपूर येत नाही म्हणून शेतकरी त्याची लागवड करीत नाहीत.

अमृतधारा
पुदिना अर्क किंवा मेन्थॉल क्रिस्टल, ओवा फूल व भीमसेनी कापूर यांच्या समभाग मिश्रणातून अमृतधारा नावाचे एक अजोड ‘लाइफ सेव्हिंग ड्रग’ एका मिनिटात तयार होते. जुलाब, अतिसार, हगवण, सर्दी याकरिता हे अमृतधारा औषध आहे.

हृदयरोगावर रामबाण!
हृद्रोगी व आमांश या विकारांनी ग्रस्त असणारांनी नियमित लसूण खाल्ली तर अ‍ॅन्जिओग्राफी, बायपास सर्जरी व हार्ट अ‍ॅटॅक यांची फिकीर करायची गरज नाही. रक्तवाहिन्यांत जागोजागी असलेले अडथळे लसणीतील तेल दूर करते. चमका, निस्तेज चेहरा, रातांधळेपणा, उचकी, दमा या विकारांत लसूण नियमित खावी. उपयोग होतो.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य